
अकोल्यात उद्धव ठाकरे यांची शिवसेना फुटीच्या वाटेवर आहे. महापालिका निवडणुकीच्या पूर्वी ठाकरे यांचे तीन मशालधारी मुंबईत तळ ठोकून असल्याने शिवसेनेतील घडामोडींना वेग आला आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून अकोल्याच्या शिवसेनेत घडणाऱ्या हालचालींनी राजकीय वर्तुळात खळबळ उडवली आहे. शेअर बाजारात जसे चढ-उतार सुरू असतात, तसेच चढ-उतार अकोल्याच्या शिवसेनेत सुरू आहे. सध्या संपर्क प्रमुख माजी आमदार गोपीकिशन बाजोरिया एकीकडे आणि उर्वरित शिवसेना दुसरीकडे असल्याचे चित्र आहे. शिवसेनेतील या अंतर्गत वादामुळे शिंदे सेनेत दोन गट निर्माण झाले आहेत. अशात ‘मातोश्री’चे तीन पदाधिकारी मुंबईत दिसल्याने नेमकं चाललंय काय? असा प्रश्न अनेकांना पडला आहे.
नुकतेच भाजपचे माजी आमदार नारायण गव्हाणकर आणि चंद्रशेखर पांडे यांनी शिवसेनेत प्रवेश केला. त्यामुळे आधीपासून पक्षासाठी कार्यरत असलेल्या स्थानिक शिवसैनिकांमध्ये नाराजीचं वातावरण तयार झालं आहे. त्यानंतर माजी आमदार आणि संपर्क प्रमुख गोपीकिशन बाजोरिया यांच्या विरोधात बंड सुरू झालं आहे. अशातच काही दिवसात अकोल्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शहर प्रमुख राजेश मिश्रा शिंदे गटात येण्यासाठी आता उंबरठ्यावर उभे आहेत.

सध्या समुद्रकिनारी
चर्चेत असलेले राजेश मिश्रा, तरुण बगेरे आणि गजानन चव्हाण मुंबईत मुक्कामी आहेत. मिश्रा मुंबईत दिसताच अकोल्यातील राजकीय वर्तुळात पुन्हा केव्हा प्रवेश होतोय, कोणते पद मिळणार या चर्चा सुरू झाल्या आहेत. मिश्रा मुंबईत आणि चर्चा अकोल्यात असे चित्र सध्या आहे. त्यामुळे अनेक जण सध्या त्याच्यावर ‘जीपीएस’ सारखे लक्ष ठेऊन आहेत. राजेश मिश्रा यांना कोणते पद मिळणार, याची उत्सुकता ताणली जात आहे.
अकोल्यातील शिवसेनेतून मिश्रा यांच्या संभाव्य प्रवेशाला विरोध आहे. अनेक ‘स्पीड ब्रेकर’ मिश्रा यांच्या मार्गावर येत आहेत. मात्र माजी आमदार गोपीकिशन बाजोरिया आणि मिश्रा यांचे संबंध चांगले असल्याने त्यांना इकडच्या शिवसेनेत आणण्याचे प्रयत्नही सुरू आहेत. या सगळ्या उलथापालथीत मागील दोन दिवसांपासून राजेश मिश्रा अकोल्यातून गायब होते. आता ते मुंबई फिरत आहेत. त्यामुळे हे तीन मशालधारी नेमके गेले कशासाठी, असा प्रश्न अनेकांना आहे.
Akola Police : अर्चित चांडक यांचा निर्धार ; जिथे गुन्हे, तिथे प्रहार
राजेश मिश्रा यांच्याबाबत सध्या वेगळेच सस्पेन्स तयार झाले आहे. मिश्रा येणार असतील तर युती करणार नाही, असे भाजपकडून शिवसेनेला सांगण्यात आले आहे. त्यामुळे मिश्रा की अकोला महापालिकेत सत्ता, याची निवड शिवसेनेला करावी लागणार आहे. ठाकरे गटात असताना मिश्रा यांनी भाजपशी उघड पंगा घेतला. भाजपच्या विरोधात अनेक आंदोलनं केली. आपल्या आंदोलनातून स्थानिक संबंधात मिश्रा यांनी कडू कारल्याचा रस ओतून घेतला आहे. अशात त्यांना मित्र पक्षाचा विरोध असताना शिवसेना जवळ करेल का? हा प्रश्न आहे.
अकोल्यात संपर्क प्रमुख गोपीकिशन बाजोरिया यांची नाव टायटॅनिक करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. अशात त्यांच्या भरवशावर मिश्रा राजकीय पुराच्या पाण्यात उतरणार असतील तर त्याच्यावर ‘गई भैस पानी में’ असे म्हणण्याची वेळ येणार नाही याची जोरदार फिल्डिंग त्यांना लावावी लागणार आहे.
Akola : वर्दीतला विषारी धूर, अर्चित चांडक यांनी फुंकर घालून विझवला