
लक्ष्मण हाके यांना भेट मिळालेल्या फॉर्च्यूनर गाडीवरुन आमदार अमोल मिटकरी यांनी टीका केली होती. त्यावर लक्ष्मण हाके यांनी अजित पवार आणि मिटकरी यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे.
राजकारणात आरोप-प्रत्यारोपाची धग काही नवीन नाही. मात्र, यंदा ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांच्यावर चांगलाच शब्दबाणांचा मारा केला आहे. अजितदादा पोल्ट्री फार्म वाले आहेत, त्यांनी ओबीसींचा संपूर्ण निधी अडवून ठेवलाय, अशी सडकून टीका करत हाके यांनी सरकारवर रोष व्यक्त केला आहे. अमोल मिटकरींनी फॉर्च्यूनर गाडीवरुन केलेल्या टीकेला प्रत्युत्तर देताना, हाके म्हणाले, मी जर तुझ्या भाषेत बोलायला लागलो, तर तू आणि तुझा आका अजितदादा यांच्या अंगावर कपडेही राहणार नाहीत या वक्तव्यानं सत्ताधाऱ्यांमध्ये खळबळ उडवली आहे.
हाके यांनी स्पष्ट शब्दांत मिटकरींना ‘फडतूस’ म्हणत झोडपलं आहे.गेल्या 20 वर्षांपासून अर्थ खात्यावर आपला प्रभाव टिकवणारे अजित पवार हे अर्थविषयाचे तज्ज्ञ नसून पोल्ट्री फार्म चालवणारे व्यापारी आहेत, असा आरोप करत हाके म्हणाले, अर्थ खात्याला चिकटल्याने कुणी अर्थतज्ज्ञ होत नाही. त्यांनी भटके-विमुक्त व मागासवर्गीय महामंडळाला ५० पैसे सुद्धा दिले नाहीत, असे सडकून म्हणत निधीवाटपावरील अन्याय दाखवून दिला आहे. हाके यांना समाजाकडून मिळालेली फॉर्च्यूनर गाडी ही त्यांच्या समाजकार्याची पावती असल्याचे सांगत, गाडीवरून टीका करणारे बाजारू विचारवंत आहेत, असा घणाघात त्यांनी अमोल मिटकरींवर केला आहे.

पुतण्याला काकांचा आधार
मिटकरी हे केवळ अजित पवारांच्या घरी झाडू मारण्याचे काम करत असल्यानेच त्यांना आमदारकी मिळाली, असा आरोपही त्यांनी केला आहे.हाके यांच्या मते, जर त्यांनीही मिटकरींच्या भाषेतच उत्तर द्यायला सुरुवात केली, तर मिटकरींची आणि अजितदादांची स्थितीच उघडी पडेल. मिटकरी, तू विधानपरिषद सदस्य आहेस, पण कधी ओबीसींसाठी बोललास का? असा थेट सवाल करत त्यांनी अजित पवारांनाही धारेवर धरले आहे. वसतिगृह कुठं दिलं? खासगी कारखाने मात्र भरमसाठ उभारले, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
अजित पवार हे स्वतःच्या कर्तृत्वावर नाही, तर आपल्या काकांच्या (शरद पवार) पाठबळावरच पुढे आले आहेत, असा आरोप करत हाके म्हणाले की, ओबीसींच्या महामंडळाला दोन कोटीही देता येत नाहीत, पण इतर महामंडळात हजारो कोटींचा निधी ओतता येतो. अजित पवारांचा हा अन्याय पाहून सामान्य माणसाची आशा आता केवळ देवेंद्र फडणवीस यांच्याकडेच असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.शेवटी, संपूर्ण सरकारच एकाच बाजूला झुकलेलं असून, काँग्रेसमधीलही काही लोक लवकरच भाजपमध्ये जाणार असल्याचा दावा हाके यांनी केला. शरद पवार, सुप्रिया सुळे, रोहित पवार यांचंही भाजपमध्ये जाणं निश्चित असल्याचं सांगत त्यांनी राजकीय भूकंपाचे संकेत दिले.
Ravikant Tupkar : शेतकऱ्यांवर बेताल वक्तव्य करणाऱ्यांना आवर घाला