महाराष्ट्र

Manikrao Kokate : कृषिमंत्र्यांच्या तोंडातून निघालं राजीनाम्याचं वादळ

Mahayuti : मुंडेंच्या रनआउट नंतर कोकाटेंच्या विकेटची तयारी

Author

धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यानंतरही महायुतीतील काही नेत्यांना अद्यापही धडा मिळालेला दिसत नाही; शेतकऱ्यांवर केलेल्या वादग्रस्त विधानामुळे आता त्यांच्यावरही राजीनाम्याची टांगती तलवार लटकू लागली आहे.

राजकारणात वक्तव्यांचे वजन अनेकदा खुर्च्यांवर भारी ठरतं असतं. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते व कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांचं तोंड सध्या त्यांच्याच राजकीय भवितव्यावर घाला घालण्याचं काम करत आहे. नुकत्याच बीड जिल्ह्यात मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात धनंजय मुंडे यांना आपले मंत्रीपद गमवावे लागले. त्याचवेळी कोकाटेही आउट होण्याच्या उंबरठ्यावर पोहोचले होते, पण शेवटच्या क्षणी ते ‘बाल बाल बचावले’. मात्र, कोकाटेंनी आता पुन्हा एकदा बळीराजावर केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे राजकीय पारा पुन्हा एकदा तापलाय.

‘हार्वेस्टिंग झालेल्या पिकांचे पंचनामे करून काय होणार? ढेकळांचे पंचनामे करायचे का?’ असा प्रश्न कोकाटेंनी विचारताच विरोधकांचे कान टवकारले. त्यांचे हे विधान नेमकं बळीराजाच्या जखमांवर मीठ चोळणारे ठरत आहे.कोकाटेंच्या या विधानाने शेतकरी वर्गात रोष निर्माण झाला असून, राज्यात पुन्हा एकदा आक्रमक वातावरण तयार झालं आहे. याआधीही त्यांनी शेतकऱ्यांना ‘भिकारी’ म्हटल्याने आणि कर्जमाफीची रक्कम लग्नासाठी खर्च होते, अशा विधानांमुळे वाद ओढवून घेतला होता. आता त्यांचं ढेकळांचे पंचनामे करायचे का?

Ravikant Tupkar : शेतकऱ्यांवर बेताल वक्तव्य करणाऱ्यांना आवर घाला

वादग्रस्त वक्तव्यांची मालिका

कोकाटेंचं हे वक्तव्य म्हणजे शेतकऱ्यांच्या तळमळीचा अपमान असल्याची भावना व्यक्त होत आहे. असे असतानाच, महायुतीत नुकतेच छगन भुजबळ यांची दमदार एन्ट्री झाली आहे. मुंडेंची विकेट गेल्यावर त्यांचं मंत्रीपद भुजबळ यांच्याकडे गेलेलं आहे. आता कोकाटे जर पुन्हा एकदा वादात गुंतले आणि त्यांच्या वक्तव्यामुळे सत्ताधारी पक्ष अडचणीत आला, तर त्यांच्यावरही राजीनाम्याची टांगती तलवार कोसळू शकते. महायुती सरकारमध्ये सध्या बेलगाम वक्तव्यांचं प्रमाण वाढलंय. आता कोकाटेंचं वक्तव्य त्यांच्यासाठी राजकीय अडथळा ठरण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

खुद्द उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या सर्व नेत्यांना ‘वादग्रस्त विधान टाळा’ अशी स्पष्ट सूचना केली होती. मात्र, अजित पवार गटाचे काही नेते ही तंबी डावलत आहे, हे स्पष्ट दिसत आहे.शेतकरी हा राज्याच्या पाठीचा कणा मानला जातो आणि अशा परिस्थितीत त्यांच्याविषयी सन्मानाने बोलण्याची जबाबदारी सत्ताधारी मंत्र्यांची अधिकच असते. पण कोकाटेंच्या बोलण्याने राज्यातील शेतकऱ्यांमध्ये अस्वस्थता पसरली आहे.सध्या सर्वांचे लक्ष या वादग्रस्त विधानावर विरोधक काय प्रतिक्रिया देतात, याकडे लागले आहे.

Krishna Khopde : नागपूरमध्ये पुन्हा वाढला महापुराचा धोका

राष्ट्रवादी अजित पवार गटासाठी ही परिस्थिती संधी की संकट, हे येणारे काही दिवसच ठरवतील. मात्र इतकं नक्की कोकाटे बोलले की वाद उठतो हे आता राजकारणातली अघोषित घोषणा झाली आहे. राजकीय इनिंग जपायची असेल तर, बोलताना जपून बोलावं हे कोकाटेंनी शिकण्याची वेळ आलेली दिसते. अन्यथा मुंडेंच्या पावलावर पाऊल ठेवून मंत्रिपदाच्या पायऱ्या खाली उतराव्या लागतील, हे निश्चित.

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!