
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नागपूरमध्ये आयोजित कार्यक्रमात संघातून मिळालेल्या मूल्यांवर आधारित आपले विचार मांडले आणि निर्णय घेण्याच्या धाडसावर भर दिला.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी नेहमीच त्यांच्या थेटपणासाठी आणि नवीन दृष्टीकोनासाठी ओळखले जातात. त्यांच्या भाषणांमध्ये नेहमीच काहीतरी वेगळं आणि समृद्ध ज्ञान असतं. आता त्यांनी पुन्हा एकदा आपल्या धोरणांचा एक ठोस उदाहरण प्रस्तुत केला आहे. नागपूरच्या सांस्कृतिक आणि राजकीय इतिहासात 30 मे रोजीचा दिवस एक महत्त्वाचा ठरला. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी लिहिलेल्या ‘संघातील मानवी व्यवस्थापन’ या पुस्तकाचा भव्य प्रकाशन सोहळा नागपूरच्या वनमति सभागृहात उत्साहात पार पडला. यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय प्रचारप्रमुख सुनील आंबेकर, तसेच ज्येष्ठ संपादक विवेक घालसासी यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमात नितीन गडकरी यांनी आपल्या खास शैलीत समाज, संघ, राजकारण आणि वैयक्तिक आयुष्यातील अनेक पैलूंवर मोकळेपणाने संवाद साधला. त्यांच्या स्पष्टवक्तेपणाची झलक पुन्हा एकदा दिसून आली. मी विचार करत नाही, मी निर्णय घेण्याचे धाडस ठेवतो, या त्यांच्या वाक्याने उपस्थितांची टाळ्यांची थाप मिळवली. गडकरी यांनी या कार्यक्रमात आपल्या विद्यार्थी जीवनातील संघर्षमय काळाचे आठवणीनं चित्र रेखाटले. मी मेरिटचा विद्यार्थी नाही. बारावीमध्ये मला केवळ 52 टक्के गुण मिळाले होते. इंजिनीअरिंगची परीक्षा देखील मी पास झालो नव्हतो. पण आज त्यांना डेहराडून विद्यापीठाकडून डिलिट पदवीने सन्मानित करण्यात येत आहे.

निःस्वार्थ समाजसेवा
त्यांचा हा प्रवास केवळ संघाने दिलेल्या मूल्यांच्या बळावरच शक्य झाला, असे त्यांनी सांगितले. स्वामी विवेकानंदांच्या विचारांचा दाखला देत गडकरी म्हणाले, उपाशी पोटी तत्वज्ञान चालत नाही. त्यामुळेच त्यांनी समाजासाठी ठोस निर्णय घेण्याचा नेहमी आग्रह धरला. मेकॅनिकल ई-रिक्षा या संकल्पनेचा दाखला देताना त्यांनी सांगितले की, मी ठरवलं की सायकल रिक्षा हे मानवी शोषण आहे. मी त्यात बसणार नाही. या निर्णयातून आज दीड कोटी लोक मुक्त झाले, हे त्यांनी अभिमानाने सांगितले.संघातील मानवी व्यवस्थापन’ हे गडकरींचं दुसरं पुस्तक आहे. त्यांनी यामध्ये संघाच्या कार्यपद्धतीचा मानवी दृष्टिकोनातून वेध घेतला आहे.
मी संघाचा अधिकृत पदाधिकारी नाही, म्हणून या पुस्तकात मांडलेले विचार संघाची अधिकृत भूमिका नाहीत, असे स्पष्ट करत त्यांनी अनेक अनुभव, व्यक्तिमत्त्व आणि प्रसंग यामध्ये शेअर केले आहेत. यावेळी बोलताना सुनील आंबेकर यांनीही संघाच्या कार्यपद्धतीवर प्रकाश टाकला. संघात शिकवले जाते ते करताना कळत नाही, पण आयुष्यात जेव्हा ती शिकवण उपयोगी पडते, तेव्हा त्याचा खरा अर्थ कळतो, असे ते म्हणाले. संघ हे केवळ शाखेत बसणारे नाहीत, तर समाजासाठी निःस्वार्थ काम करणारे कार्यकर्ते घडवतो, हे त्यांनी ठामपणे मांडले. गडकरींनी आपल्या भाषणात आणखी एक महत्त्वाचा मुद्दा मांडला.
Manikrao Kokate : कृषिमंत्र्यांच्या तोंडातून निघालं राजीनाम्याचं वादळ
विरोधकांशी मैत्री
मी दिलेल्या विधानांबाबत मला कधीच पश्चाताप वाटत नाही. जे आहे ते मी बोलतो. ही त्यांची स्पष्टवक्तेपणाची शैली आजही लोकांना प्रभावित करते. विरोधकांशी असलेले संबंध असोत की वेगळ्या विचारसरणीच्या लोकांशी असलेली मैत्री गडकरी त्यामागे संघ संस्कार असल्याचे स्पष्टपणे सांगतात. सीपीएमचा मुख्यमंत्री असो वा ममता बॅनर्जी, दोघांनीही मला नेहमी प्रेम दिले, असे सांगून त्यांनी राजकारणात सकारात्मक नातेसंबंधांची गरज अधोरेखित केली. या पुस्तकप्रकाशन सोहळ्याने केवळ एक साहित्यिक कार्यक्रम म्हणून नव्हे, तर संघाच्या विचारविश्वातील मानवी पैलूंना प्रकाशझोतात आणणारा एक महत्त्वाचा क्षण म्हणून स्वतःची छाप पाडली आहे. संघ, कार्यकर्ता घडवणं, व्यवस्थापन आणि समाजकार्य हे सर्व या पुस्तकाच्या माध्यमातून एका नव्या दृष्टिकोनातून समोर आले आहे.