
कधी काळी दुबळ्या समजल्या गेलेल्या मुली आज आपल्या स्वप्नांसाठी सज्ज होत आहेत, कारण त्यांच्याकडे आता आहे आत्मसंरक्षणाचं प्रभावी शस्त्र, आणि या परिवर्तनाचं नाव आहे “ऑपरेशन प्रस्थान”!
यवतमाळच्या पोलीस कवायत मैदानावर एक अनोखा, सशक्त आणि प्रेरणादायी क्षण घडला. पोलिस अधीक्षक कुमार चिंता यांच्या संकल्पनेतून साकारलेलं हे अभियान आता जिल्ह्याच्या सीमा ओलांडून राज्यभर झेप घेण्याच्या मार्गावर आहे. समारोप समारंभाच्या प्रसंगी उपस्थित राहिलेल्या आमदार संजय राठोड यांनी या उपक्रमाची भरभरून प्रशंसा केली आणि महत्त्वाचं सूतोवाच केलं. ऑपरेशन प्रस्थानचं सादरीकरण राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत केलं जाणार आहे. सर्व मंत्र्यांनी त्यांच्या जिल्ह्यांतही हा उपक्रम राबवावा, अशी विनंती मी करणार आहे, असे राठोड म्हणाले.
अभियानांतर्गत आतापर्यंत एक हजार 700 मुलींना कराटेचं सघन प्रशिक्षण देण्यात आलं. पण पोलिस अधीक्षक कुमार चिंता यांच्या दूरदृष्टीचा हेतू केवळ इथपर्यंत मर्यादित नाही. आता उद्दिष्ट आहे 20 हजार मुलींना आत्मसंरक्षणाचं शास्त्र शिकवण्याचं! या प्रशिक्षणामध्ये मुलींना केवळ शारीरिक डावपेच शिकवले जात नाहीत, तर त्यांना धैर्य, आत्मविश्वास आणि सामाजिक सजगता याचंही बाळकडू मिळतं. कोणतीही संकटपरिस्थिती असो, रात्रीचा अंधार, रस्त्यावरील छेडछाड, कामाच्या ठिकाणी होणारी अवहेलना. या प्रत्येक प्रसंगात मुली आता डगमगणार नाहीत, तर भिडतील, असे संजय राठोड म्हणाले.

रोजगाराचं नवं दालनही उघडलं
ऑपरेशन प्रस्थान केवळ आत्मसंरक्षणापुरतं मर्यादित नाही, तर ते रोजगारनिर्मितीचंही प्रभावी माध्यम ठरलं आहे. आतापर्यंत या उपक्रमाद्वारे सात हजार 600 मुला-मुलींना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. अनेक युवक-युवतींना सिक्युरिटी, ट्रेनी, काउंसलिंग, आणि प्रशिक्षण संस्थांमधील स्थान मिळालं आहे. हे अभियान म्हणजे युवकांच्या हातात रोजगाराचं साधन आणि मुलींच्या मनात आत्मभानाचं तेज निर्माण करणारा उपक्रम ठरणार, असेही राठोड म्हणाले.
Nitin Gadkari : मी मेरिटचा विद्यार्थी नाही, पण संघाने मला घडवलं
या उपक्रमाला मोठ्या प्रमाणावर निधीची गरज असताना, आमदार संजय राठोड यांनी या उपक्रमाला निधीची कमतरता भासू देणार नाही, असा ठाम शब्द दिला. राज्यस्तरीय सादरीकरण करून इतर जिल्ह्यांतही हे अभियान पोहोचवण्याचा त्यांनी संकल्प व्यक्त केला. ऑपरेशन प्रस्थान ही एक सामाजिक क्रांतीची सुरुवात आहे. यवतमाळच्या मातीत अंकुरलेलं हे बीज आता संपूर्ण महाराष्ट्रात वटवृक्ष बनण्याच्या मार्गावर आहे. मुलींचा आवाज आता दबणार नाही, तो गर्जेल. स्वसंरक्षण, आत्मनिर्भरता आणि आत्मसन्मान यांची शिदोरी घेऊन नव्या वाटेवर चालणाऱ्या प्रत्येक मुलीच्या पाठीशी आता ऑपरेशन प्रस्थान आहे, मजबूत, भक्कम आणि प्रेरणादायी.