
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात राजकीय हालचालींना वेग आला आहे. मात्र, महायुतीचे काही मंत्री केवळ आपल्या मतदारसंघापुरतेच सीमित राहिल्याने चर्चेला ऊत आला आहे.
महाराष्ट्रात सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर लवकरच स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक जाहीर होणार आहेत. साऱ्या राज्यात राजकीय वातावरण तापले आहे. प्रत्येक पक्षात आतापासूनच रणनिती आखली जात आहे. पक्षांचे कार्यकर्ते संघटन मजबूत करण्यासाठी झटत आहेत. नेतेमंडळींचे दौरे, सभांना वेग आला आहे. परंतु याच पार्श्वभूमीवर एक आश्चर्यकारक आणि चर्चेचा विषय समोर येत आहे. महायुती सरकारमधील आणि यवतमाळ जिल्ह्यातील तीन मंत्री केवळ स्वतःच्या मतदारसंघापुरतेच मर्यादित का? अशी चर्चा मतदारांमध्ये आणि राजकीय वर्तुळात सुरू आहे.
राज्याचे मंत्री असूनही आपली उपस्थिती फक्त मतदारसंघात ठेवणारे हे तीन प्रमुख चेहरे म्हणजे आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके, मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड आणि राज्यमंत्री इंद्रनील नाईक. सध्या हे तिघेही मंत्री आपापल्या जिल्ह्यांमध्येच दौरे करताना, सभा घेताना दिसतात. राज्यव्यापी जबाबदारी असतानाही या नेत्यांचा व्याप्ती फारसा विस्तारलेला दिसत नाही. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा रंगू लागली आहे की, मंत्रिपद फक्त सन्मानासाठी आहे की राज्यभर जनतेशी संवाद साधण्यासाठी?

व्याप्ती मर्यादित
भारतीय जनता पक्षाचे नेते आणि राळेगाव (आ.ज.) मतदारसंघाचे आमदार डॉ. अशोक उईके यांनी प्राचार्य पदावरून निवृत्त होऊन थेट राजकारणात उडी घेतली. आदिवासी विकास विभागाची संपूर्ण जबाबदारी सांभाळणारे डॉ. उईके यांची कारकीर्द गुणात्मक असूनही त्यांचे दौरे केवळ यवतमाळ जिल्ह्यातच दिसून येतात. गोंदिया, नंदुरबार, नाशिक किंवा अन्य आदिवासीबहुल भागात त्यांची उपस्थिती अपवादात्मकच वाटते. त्यांनी स्थानिक पातळीवर अनेक उपक्रम हाती घेतले असले, तरी एक ‘राज्य मंत्री’ म्हणून त्यांची राज्यव्यापी उपस्थितीची जनतेला अपेक्षा आहे.
Parinay Fuke : स्वच्छ पाण्याच्या पुरवठ्यासाठी आमदार पोहोचले देवाभाऊंच्या दारी
मतदारसंघापुरतेच सक्रिय
दिग्रसचे आमदार संजय राठोड यांची ‘पूर्वी भेटत नाहीत’ अशी प्रतिमा असताना, आता ते कार्यरत व सक्रिय नेते म्हणून समोर येत आहेत. यंदा राठोड यांचे एक वेगळे रूप जनतेला बघायला मिळत आहे. शिवसेना (शिंदे गट) चे प्रबळ नेतृत्व करणारे राठोड हे मृद व जलसंधारण विभागाच्या माध्यमातून शेतीला नवसंजीवनी देण्याच्या प्रयत्नात आहेत. पण ही धडपड सध्या फक्त यवतमाळ जिल्ह्यात दिसते आहे. सिंचन आणि जलसंधारण ही राज्याच्या सर्व भागांसाठी महत्त्वाची बाब असताना, मंत्री राठोड यांचे दौरे यवतमाळच्या बाहेर फारसे नोंदले गेले नाहीत. अशा महत्त्वाच्या खात्याचे नेतृत्व करत असताना संपूर्ण राज्यात त्यांची ऊर्जा आणि उपस्थिती आवश्यक मानली जात आहे.
उपस्थिती स्थानिकच
पुसदचे आमदार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांच्या जवळ तब्बल सहा विभागांची जबाबदारी आहे. उद्योग, पर्यटन, उच्च शिक्षण, आदिवासी विकास, सार्वजनिक बांधकाम (उपक्रमांशिवाय) आणि मृद व जलसंधारण. ही जबाबदारी त्यांच्यावर असली तरी त्यांचे जास्तीत जास्त दौरे आणि बैठकांचे आयोजन हे फक्त पुसद आणि यवतमाळ जिल्ह्यातच मर्यादित आहे. उद्योग विकासासाठी नागपूर, पुणे, मुंबई या केंद्रांशी थेट संपर्क आवश्यक असताना, त्यांची उपस्थिती मात्र स्थानिक कार्यक्रमांपुरतीच आहे, अशी नागरिकांची भावना आहे.
Amravati : महापालिकेच्या रणभूमीत महायुतीचे दोन सेनापती आमने-सामने
वर्तुळात उमटणाऱ्या प्रतिक्रिया
राजकीय विश्लेषक, पक्षाचे वरिष्ठ नेते, कार्यकर्ते आणि नागरिक यांच्यात एकच चर्चेचा मुद्दा आहे. राज्याचे मंत्री आहेत तर राज्याच्या प्रत्येक कोपऱ्यात त्यांचा प्रभाव, संवादी संपर्क आणि प्रत्यक्ष भेटी ह्या अपेक्षित असतात. मंत्र्यांनी आपल्या मतदारसंघात कार्य करावेच, पण त्यांच्या खात्याचे कार्य राज्यभर विस्तारित आहे. मग ते उद्योग असो, शिक्षण असो, आदिवासी कल्याण असो की जलसंधारण, या सर्व गोष्टी संपूर्ण महाराष्ट्राच्या भविष्यासाठी महत्त्वाच्या आहेत.
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या तोंडावर ही त्रिकूट मंडळी केवळ आपल्या मतदारसंघात गट बैठकांमध्ये रममाण असल्यामुळे त्यांच्या भूमिकेबाबत प्रश्न उपस्थित होणे स्वाभाविक आहे. पक्षाची एकूण प्रतिमा, राज्यातील जनतेचा विश्वास आणि खात्यांचे कामकाज हे सर्व त्यांच्या दौऱ्यांवर आणि संपर्कावर अवलंबून आहे. मंत्रिपद म्हणजे केवळ खुर्चीचा सन्मान नव्हे, तर ती एक प्रवासाची जबाबदारी आहे. राज्याच्या कोपऱ्यातल्या शेवटच्या माणसापर्यंत पोहोचणारी. त्यामुळे मंत्री उईके, राठोड आणि नाईक यांच्यासारख्या अनुभवसंपन्न नेत्यांनी आता आपली व्याप्ती वाढवणे गरजेचे आहे. स्थानिक पातळीवर केलेली मेहनत राज्यात पोहचली पाहिजे, हेच या चर्चेचे सार आहे.