महाराष्ट्र

Washim : भावना गवळींचा वाढदिवस गुमनाम गेला

Bhavana Gawli : कार्यकर्त्यांना होतेय का नेत्याचे विस्मरण?

Author

एकेकाळी कार्यकर्त्यांच्या जयघोषात साजरा होणारा वाढदिवस यंदा शांततेच्या सावटात गेला. नेत्याच्या वाढदिवशी ना पोस्टर्स लागले, ना कार्यक्रम झाले कार्यकर्त्यांनी जणू मौनाचं मत नोंदवलं.

महाराष्ट्राचं 2024 हे वर्ष राजकारणाच्या रंगमंचावर उलथापालथीचं ठरलं, आणि त्या नाट्यमय घडामोडींमध्ये अनेक जुनी नावं मागे पडली, तर काही नव्यानं उदयाला आली. मात्र या सगळ्या राजकीय भूकंपांमध्ये एक नाव पुन्हा चर्चेत आलं, शिवसेना शिंदे गटाच्या तीनदा खासदार  झालेल्या भावना गवळी यांचं. यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघातून तीन टर्म खासदार राहिलेल्या गवळी यांना या वर्षी लोकसभेचं तिकीट नाकारण्यात आलं. त्या निर्णयाने अनेकांना धक्का बसला, पण त्यांना विधानसभेची उमेदवारी मिळाली आणि त्या विजयही झाल्या.

गवळी यांना विजय मिळाल्यावरही त्यांची राजकीय वाटचाल आधीइतकी ठाम आणि प्रभावी राहिली नाही. कुठेतरी त्यांच्या उपस्थितीत एक अनामिक रिकामेपण जाणवायला लागलं. कार्यकर्त्यांमध्येही एक अस्पष्ट नाराजीचं वातावरण तयार झालं. आणि या नाराजीचा धक्कादायक परिणाम पाहायला मिळाला गवळी यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं. साधारणतः कोणत्याही नेत्याचा वाढदिवस म्हटला की, पोस्टर्स, बॅनर्स, मंडप, जल्लोष, रक्तदान शिबिरं, केक कापण्याचे सोहळे आणि सोशल मीडियावर लाखो शुभेच्छांचा वर्षाव होतो. पण भावना गवळी यांच्या बाबतीत मात्र या सगळ्या गोष्टींचा अभाव ठळकपणे जाणवला.

Parinay Fuke : महाराष्ट्राला जापान सारखं करण्यासाठी असा घडला दोन नेत्यांचा संवाद

धूसर झालेला प्रतिबिंब

यंदा गवळी यांचा वाढदिवस पार पडला, पण तो इतक्या शांततेत आणि दुर्लक्षितपणात गेला की अनेकांना तो झालाच नाही, असं वाटावं. पक्षाचे कार्यकर्ते, ज्यांनी पूर्वी त्यांच्या प्रत्येक यशात जल्लोष केला होता, ते या दिवशी कुठेही दिसले नाहीत, असे नागरिकांमधून बोलले जात आहे. ना सोशल मीडियावर फोटो झळकले, ना कुठे पोस्टर्स, ना कार्यक्रम. हा केवळ एक वाढदिवस नव्हता, तर कार्यकर्त्यांच्या भावना आणि समर्थनाचं एक आरसाच होता. या आरशात गवळी यांचं प्रतिबिंब स्पष्टपणे धूसर झालेलं दिसलं.

गवळी यांच्यावर काम ‘प्रायव्हेट लिमिटेड’ पद्धतीने करण्याचे आरोप जुने आहेत. लोकांमध्ये मिसळण्याऐवजी निवडक गटाशीच सल्लामसलत करणे, स्थानिक नेतृत्वाला डावलणे, आणि अचानक उपस्थितीत पडलेला खंड, या गोष्टींमुळे पक्षातही अंतर्गत खदखद वाढली होती. विशेष म्हणजे, यवतमाळ हा त्यांचा पारंपरिक बालेकिल्ला मानला जात होता. मात्र 2024 नंतर ते कार्यक्षेत्र वाशिमकडे वळल्याचं चित्र दिसू लागलं. त्यामुळे यवतमाळमधील जुने कार्यकर्ते स्वतःला बाजूला सारलेलं समजू लागले.

Kirit Somaiya : अमरावतीत बनावट जन्मप्रमाणपत्रांचा ‘धुंद मेला’

मनात घर करणाऱ्या नेत्या

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका आता उंबरठ्यावर आहेत. आणि या निवडणुकांतच हे स्पष्ट होणार आहे की भावना गवळी यांच्या बाजूला कार्यकर्ते उभे राहतील की नाही. वाढदिवसाच्या निमित्तानं कार्यकर्त्यांनी दाखवलेलं ‘मौन’ हे एक राजकीय संदेशच आहे का? की हा त्यांच्या नेतृत्वावरील विश्वासाचा समांतर पडलेला साया आहे? राजकारणात कायमसाठी काहीच नसतं, हेच या वाढदिवसाने पुन्हा सिद्ध केलं. भावना गवळी या एकेकाळी जनतेच्या मनात घर करणाऱ्या नेत्या होत्या. पण कालांतराने लोकप्रतिनिधी आणि लोक यांच्यामध्ये जर संवादाचं अंतर वाढलं, तर तेच अंतर विस्मरणात बदलतं.

आज कार्यकर्ते शांत आहेत, उद्या मतपेटीत काय उमटेल हे सांगणं कठीण आहे. भावना गवळी यांच्यासाठी हे केवळ एक वाढदिवस नव्हता, तर त्यांच्या राजकीय भविष्यासाठी एक चेतावणीही होती. आता पाहावं लागेल, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांत गवळी यांना पुन्हा एकदा कार्यकर्त्यांचा पाठिंबा मिळतो का, की या वाढदिवशी उमटलेली शांतता त्यांच्या राजकीय अस्तित्वावर पडलेली सावली ठरते?

Sudhir Mungantiwar : अहिल्याबाईंच्या पाऊलखुणांवरून चालण्याचा नवा संकल्प

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!