
नागपूरच्या ट्राफिक व्यवस्थापनात उत्कृष्ट कामगिरी केलेले अर्चित चांडक आता अकोल्याचे नवे पोलीस अधीक्षक म्हणून रुजू झाले आहे. वाहतूक शिस्त आणि अवैध धंद्यांविरोधात कठोर कारवाईला त्यांनी सुरुवात केली आहे.
अकोल्याचे रस्ते, ज्यावर नेहमीच गोंधळ, शिस्तभंग आणि वाहनांच्या कर्कश आवाजांचा कल्लोळ असायचा, तिथे आता आशेचा नवा सूर ऐकू येतोय. याचे श्रेय जाते अर्चित चांडक यांना. नागपूरमध्ये ट्राफिक व्यवस्थापनात क्रांती घडवणाऱ्या अर्चित चांडक यांची अकोल्याचे नवे पोलीस अधीक्षक म्हणून नियुक्ती झाल्यानंतर, शहरात शिस्तीचा नवा अध्याय सुरू होतोय. नागपूरसारख्या धावत्या उपराजधानीत ट्राफिक जाम आणि नियमभंगावर तुटून पडणारे हे अधिकारी, अकोल्यात रुजताच ‘बदल’ हा शब्द इथे प्रत्यक्षात उतरवायला सज्ज झाले आहे. मला फक्त एक महिना द्या, असं ठाम सांगणारे चांडक यांनी अकोल्याच्या रस्त्यांवर गोंधळ नव्हे, तर गती, शिस्त आणि सुरक्षिततेचा अनुभव देण्याची हमी दिली आहे.
चांडक यांनी यापूर्वी नागपूरमध्ये डीसीपी ट्राफिक म्हणून आठ ते दहा महिने जबाबदारी सांभाळली आहे. ट्राफिकमधल्या समस्यांचा त्यांना परिपूर्ण अभ्यास आहे. मग तो वाहतुकीची अनियमितता असो, चुकीचे पार्किंग असो किंवा वाहतूक पोलिसांच्या मनमानीपणावर नियंत्रण असो. नागपूरकरांमध्ये त्यांच्या कामगिरीचं कौतुक ‘ट्रॅफिक मॅनेजमेंटच्या आयकॉन’ म्हणून केलं गेलं. आता अकोल्यातही तसाच लौकिक मिळवण्यासाठी ते सज्ज आहेत. ते अकोल्यात रुजले, आणि तिथल्या नागरिकांनी त्यांच्याकडे पहिलीच तक्रार सांगितली ट्राफिक. चांडक यांनीही यावर तात्काळ कृतीचे संकेत दिले.

रस्त्यांना नवा श्वास
फक्त 30 दिवसांत आपण एक ठोस बदल पाहू, असं सांगत त्यांनी नागरिकांच्या अपेक्षांना उमेद दिली आहे. ट्राफिकसह कायदा व सुव्यवस्थेवरही चांडक यांचा ‘कडक’ दृष्टिकोन दिसून आला आहे. त्यांनी ऑपरेशन प्रहारच्या माध्यमातून अकोल्यातील अवैध धंद्यांवर हल्ला चढवला आहे. पोलिस प्रशासनात दक्षता आणि निर्णयक्षमता या नव्या परिमाणांची नोंद घेतली जात आहे. गोवंश तस्करी, बेकायदेशीर दारू, मटका-जुगाराचे अड्डे यावर त्यांनी तात्काळ कारवाईचे आदेश दिले. पोलीस स्टेशन स्तरावर मोहीम राबवून, शिस्त नव्हे तर सवय व्हावी, असा त्यांचा दृष्टिकोन आहे. 28 मे रोजी, स्थानिक गुन्हे शाखेने चान्नी पोलीस ठाण्याच्या आलेगाव परिसरात वरली मटक्यावर मोठी धाड टाकली.
कारवाईत सहा जणांना रंगेहाथ पकडण्यात आलं. 26 हजार 290 रुपये रोख, तीन महागड्या मोटारसायकल्स, मोबाईल्स, मटका साहित्य असा तब्बल 2 लाख 14 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. हे फक्त सुरुवात आहे. कारण अर्चित चांडक यांची शैली म्हणजे ‘काम बोलतं.’ अकोल्याच्या गोंधळलेल्या रस्त्यांवर आता शिस्तीची शिडी उभी राहत आहे. कायद्याच्या छायेखाली शहर पुन्हा एकदा स्थिर आणि सुरक्षित वाटायला लागलंय. अर्चित चांडक यांच्या आगमनाने अकोल्यात एक नवचैतन्य निर्माण झालं आहे. ट्राफिकपासून ते गुन्हेगारीपर्यंत सर्वच क्षेत्रांत एक सकारात्मक बदल घडवण्याची क्षमता या अधिकाऱ्यात आहे. ती बदलाची पहाट आता अकोल्याच्या प्रत्येक रस्त्यावर दिसू लागली आहे.
Vijay Wadettiwar : मुंबईच्या हृदयात घुसवला अदानीचा रियल इस्टेट बाण