
ग्वाल्हेर उच्च न्यायालयाच्या प्रांगणात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा उभारण्यावरून जातीय वक्तव्यांचा व विरोधाचा भडका उडाला आहे. या विरोधावर प्रकाश आंबेडकरांनी थेट मनुवादी मानसिकतेवर घणाघात करत तीव्र संताप व्यक्त केला आहे.
ग्वाल्हेरच्या उच्च न्यायालयात थेट भारताच्या संविधानकार बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या स्थापनेला विरोध होत असल्याने नव्या सामाजिक धुमसाला तोंड फुटले आहे. या विरोधाच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीचे नेते आणि बाबासाहेबांचे नातू प्रकाश आंबेडकर यांनी थेट मनुवादी मानसिकतेवरच घणाघात करत संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.
ग्वाल्हेर उच्च न्यायालयाच्या प्रांगणात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा उभारण्याचा प्रयत्न काही आंबेडकरी वकिलांनी सुरू केला. ही मागणी कायदेशीर प्रक्रियेने मांडण्यात आली होती आणि 19 मार्च 2025 रोजी उच्च न्यायालयाच्या माननीय मुख्य न्यायाधीशांनी पुतळा उभारण्याची परवानगी अधिकृतपणे दिली होती. ही परवानगी न्यायालयीन अभिलेखांमध्येही नोंदवण्यात आली.

अपारदर्शक प्रक्रिया
या निर्णयाला ग्वाल्हेरमधील काही वकिलांकडून तीव्र विरोध सुरू झाला. इतकंच नव्हे तर त्यांनी आंदोलनाचाही मार्ग अवलंबला. या वकिलांचा आरोप आहे की, पुतळा उभारण्याची प्रक्रिया अपारदर्शक आहे. निधीचा गैरवापर झाला, बार असोसिएशनची परवानगी घेण्यात आली नाही, बांधकाम समितीचा संमतिक्रम नाही, अशा एक ना अनेक आक्षेप त्यांनी नोंदवले. इतकेच नव्हे, त्यांनी अश्लाघ्य भाषेत बाबासाहेबांविरोधात अपशब्दही उच्चारले आणि पुतळा उभारल्यास “तो वाचणार नाही” अशा धमक्याही दिल्या.
या संपूर्ण घटनाक्रमावर प्रकाश टाकताना प्रकाश आंबेडकर म्हणाले, ही केवळ लज्जास्पद घटना नाही, तर ही एक जातीय विषारी प्रवृत्तीची पुरावादाखल नोंदवावी अशी गोष्ट आहे. ब्राह्मणवादी विचारसरणी आणि मनुवादी डीएनएमधूनच असला आंबेडकरद्वेष उफाळतो. संपूर्ण जग बाबासाहेबांना मान देतं, त्यांचे विचार घेऊन पुढे जातं. पण भारतात अजूनही त्यांच्याच देशात त्यांना अपमानाचा सामना करावा लागत आहे, हे दुर्दैव आहे.
Nana Patole : वकिलीच्या रंगमंचावर फडणवीस, पण न्यायासन अजूनही मूक
सुरुंग लावणारी मानसिकता
प्रकाश आंबेडकरांनी स्पष्ट म्हटले की, हे वकील बाबासाहेबांविरोधात जे काही करत आहेत, ते केवळ द्वेषाने भरलेले नसून एका ऐतिहासिक परिवर्तनाच्या प्रतीकावरच प्रहार करण्याचा प्रयत्न आहे. ही मानसिकता भारतातील लोकशाही मूल्यांना सुरुंग लावणारी आहे. ज्यांनी संविधान घडवलं, त्यांच्याच पुतळ्याला न्यायालयात विरोध? ही केवळ विचारशून्यता नाही, तर जातीय विषाचा कडवा पुरावा आहे, असे म्हणत आंबेडकर यांनी आंबेडकरी वकिलांना ठाम पाठिंबा दर्शवला. ते म्हणाले की, मी त्यांच्या संघर्षात त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे आणि आंबेडकरी समाजानेही याविरोधात एकवटून आवाज उठवला पाहिजे.
26 मार्च 2025 रोजी, ग्वाल्हेर उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांनी स्पष्ट निर्देश दिले की, विरोध करणाऱ्या काही वकिलांकडे दुर्लक्ष करावे आणि पुतळा स्थापनेचा निर्णय सर्वोच्च न्यायालयात उभ्या बाबासाहेबांच्या पुतळ्याच्या धर्तीवर राबवावा. बाबासाहेबांचा पुतळा म्हणजे संविधानाची आठवण, विचारांची जागृती आणि सामाजिक समतेचे प्रतीक. त्याविरोधात उभा असलेला हा विरोध म्हणजे एका नव्या विचाराच्या उगमावरच घाव घालण्याचा प्रयत्न आहे.