
माजी मंत्री बच्चू कडू शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी उपोषणाला बसले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी कडू यांना पाठिंबा देत सरकारवर टीका केली आहे.
अमरावती जिल्ह्यातील मोझरीच्या मातीवर सध्या एक असंतोषाचा ज्वाळा धगधगतोय. शेतकऱ्यांच्या व्यथा, आश्वासनांचा भंग आणि दुर्लक्षित गरिबांची वेदना घेऊन माजी मंत्री बच्चू कडू यांनी अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे. तब्बल पाच दिवस झाले तरी त्यांनी ना औषधाचा आधार घेतला, ना थकलेल्या शरीराला विश्रांती दिली. आता हे आंदोलन एकट्याचं राहिलेलं नाही, ते एका जनआंदोलनात रुपांतरित होतंय. राज्याच्या राजकारणात खळबळ उडवत, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी मोझरीला भेट देण्याची घोषणा केली. बच्चू कडू यांच्या आंदोलनाला थेट पाठिंबा जाहीर केला आहे.
बच्चू कडूंचं हे आंदोलन केवळ वैयक्तिक नाही, तर शेतकरी, शेतमजूर, दिव्यांग आणि दुर्बल घटकांच्या न्यायाच्या हक्कासाठीचा लढा आहे, असं म्हणत अनिल देशमुख यांनी सरकारवर सडकून टीका केली. त्यांनी स्पष्टपणे सांगितलं, आम्ही केवळ राजकीय पक्ष नाही, तर शेतकऱ्यांच्या स्वाभिमानाचे रक्षक आहोत. त्यांनी आठवण करून दिली की, नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्येक सभेत शेतकऱ्यांना ‘सातबारा कोरा’ करण्याचं मोठं गाजावाजा असलेलं आश्वासन दिलं होतं. मात्र निवडणुकीनंतर सहा महिने उलटले, तरी ‘कोरं’ झालंय ते आश्वासन, शेतकऱ्यांचं आयुष्य नाही.

Buldhana & Amravati : शिक्षण विभागाचं बॅक टू स्कूल मिशन सुरू
योग्य भाव अपेक्षित
अनिल देशमुख यांनी रोखठोकपणे विचारलं की, फडणवीस जर मुख्यमंत्री नसते, तर आम्ही समजू शकलो असतो की, सत्ता त्यांच्या हातात नाही. पण आता तर सगळी सूत्रं त्यांच्या हाती असूनही कर्जमाफी कुठे आहे? शेतमालाला हमीभाव कुठे आहे? देशमुख यांनी शेतमालाच्या सध्याच्या भावांवरूनही सरकारवर हल्ला चढवला. कापसाला फक्त सात हजार, सोयाबीनला चार हजार, ही शेतकऱ्यांची थट्टा आहे. आमच्या महाविकास आघाडीच्या काळात आम्ही कापसाला 14 हजार, सोयाबीनला आठ हजार रुपये दर दिला होता, असं ते म्हणाले.
शेतकरी अडचणीत
महायुतीचं हे सरकार शेतकऱ्यांसाठी नाही, तर मॉल आणि व्यापाऱ्यांसाठी काम करतंय, असं म्हणत देशमुख यांनी शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव देण्याची गरज अधोरेखित केली. कांदा, धान्य, कापूस, सोयाबीन यांसारख्या पिकांचा उत्पादन खर्चही निघत नसल्याचं वास्तव देशमुख यांनी मांडलं. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे युवा नेते रोहित पवार यांनी सत्ताधाऱ्यांना थेट इशारा दिला आहे. बच्चू कडू यांना काही झालं तर एकाही सत्ताधाऱ्याला रस्त्यावर फिरू देणार नाही. हा इशारा म्हणजे केवळ एक राजकीय प्रतिक्रिया नाही, तर शेतकऱ्यांच्या सहनशक्तीचा उद्रेक आहे. कडू यांच्या आंदोलनाची ज्वाळा आता घराघरात पोहोचू लागली आहे.
Akola : दादांनी वाळलेली झाडं पाहिली अन् अख्ख्या यंत्रणेला पाणी पाजलं
पेटतोय संघर्ष
अखेर देशमुख यांनी अत्यंत भावनिक शब्दांत सरकारला विनंती केली की, कृपया बच्चू कडूंचं उपोषण थांबवण्यासाठी तातडीने त्यांच्या मागण्यांवर निर्णय घ्या. ही लढाई राजकारणाची नाही, तर पोटासाठीच्या न्यायाची आहे. मोझरी हे आता केवळ गाव नाही, तर शेतकऱ्यांच्या लढ्याचं केंद्र बनलंय. बच्चू कडूंचा संघर्ष, देशमुख यांचा पाठिंबा आणि रोहित पवार यांचा इशारा, हे सर्व मिळून एक सत्तेला हादरवणारा संदेश ठरत आहे. आता सत्ताधाऱ्यांनी तरी आपल्या खुर्चीवरून उठून शेतकऱ्यांच्या जखमांकडे लक्ष द्यावं, एवढीच अपेक्षा.