
राज्यात खरीप हंगामाच्या तोंडावर गंभीर खतटंचाईचं संकट निर्माण झालं आहे. या पार्श्वभूमीवर अनिल देशमुख यांनी सरकारवर जोरदार टीका करत शेतकऱ्यांच्या व्यथा मांडल्या आहेत.
गेल्या काही महिन्यांपासून राज्यात शेतकरी कर्जमाफीचा मुद्दा चर्चेचा केंद्रबिंदू ठरला आहे. असे असताना आता खरीप पेरणीच्या तोंडावर उभं राहिलेलं खतटंचाईचं संकट शेतकऱ्यांच्या भविष्यावर गडद सावली टाकतंय. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी या मुद्द्यावर सरकारला जोरदार घेरत गंभीर आरोप केलेत.
देशमुख म्हणाले, कर्जमाफी नाही, शेतमालाला भाव नाही, नैसर्गिक आपत्तीमग्न झाल्यानंतरही योग्य ती मदत नाही आणि आता पेरणीच्या वेळी खतांचाही तुटवडा. ही परिस्थिती म्हणजे शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्यासारखी आहे. ते नागपूर येथे पत्रकार परिषदेत बोलत होते.

पुरवठ्याची दयनीय स्थिती
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 2024 मधील विधानसभा निवडणुकीच्या प्रचारसभांमध्ये राज्यात सत्ता आल्यास संपूर्ण कर्जमाफीचं आश्वासन दिलं होतं. मात्र सात महिने उलटून गेले तरी यावर कोणताही ठोस निर्णय झालेला नाही, अशी टीका देशमुखांनी केली. शेतकरी एकीकडे शेतात राबून उत्पादन घेतो. मात्र निसर्गाच्या कोपामुळे नुकसान झालं तरी शासनाकडून मदतीचं रूपडंही दिसत नाही. जो माल बाजारात आणतो, त्याला मातीमोल दर मिळतात. यामुळे त्याच्या खर्चाची भरपाईही होत नाही. आता त्यावर खतटंचाईचं संकट आवासून उभं आहे.
राज्यात डीएपी, युरिया आणि मिश्र खतांचा मोठ्या प्रमाणावर तुटवडा आहे. सध्या सर्वाधिक मागणी डीएपी खताची आहे, मात्र बाजारात तेच उपलब्ध नाही. विदर्भात तर ही टंचाई अधिकच तीव्र आहे. उदाहरणार्थ, नागपूरमध्ये डीएपीची मागणी 23 हजार 252 मेट्रिक टन असून केवळ 8 हजार 940 टन पुरवठा झाला आहे. अमरावतीला 21 हजार 244 टन मागणी असताना फक्त 5 हजार 848 टनचा पुरवठा झाला. बुलढाण्यात मागणी 25 हजार 100 टन असून केवळ 10 हजार 518 टन मिळालेत. गोंदिया, गडचिरोली, यवतमाळसारख्या जिल्ह्यांमध्ये तर 20 ते 25 टक्क्यांपेक्षा जास्त पुरवठा झालाच नाही. धान पिकासाठी युरियाची मोठी मागणी असणाऱ्या चंद्रपूर आणि भंडारा जिल्ह्यांमध्येही याच स्वरूपाची स्थिती आहे.
शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष
देशमुखांनी आणखी एक गंभीर मुद्दा उपस्थित केला. तो म्हणजे, शेतकऱ्यांना दिलासा देण्याऐवजी सरकारने खतांच्या किमतीत वाढ केली आहे. यामुळे उत्पादन खर्च वाढून शेतकऱ्यांच्या खिशाला चांगलाच कात्री बसली आहे. शेतकरी आता पावसाच्या प्रतिक्षेत आहे. पावसाळा सुरू होताच पेरणीसाठी धावपळ सुरू होईल. मात्र खताचाच पुरवठा नसल्याने अनेकजण हतबल होऊन घरी परत जातील.
शेतकऱ्यांचा मुद्दा केवळ निवडणुकीपुरता वापरून मग त्यांना वाऱ्यावर सोडण्याची ही स्थिती म्हणजे सरकारच्या धोरणांवर मोठा प्रश्नचिन्ह आहे. अनिल देशमुख यांनी भाजप सरकारवर शब्द आणि कृतीतील विसंगती दाखवत ताशेरे ओढले. राज्य शासनाने त्वरित पुरवठा साखळी सुरळीत करून खतांचा पुरवठा योग्य पद्धतीने करावा, अन्यथा आगामी काळात शेतकरी आक्रोश उभा राहील, असा इशारा देशमुखांनी दिला आहे.