
अमृत पाणीपुरवठा योजनेचे काम आठ वर्षांनंतरही अर्धवट, नागरिकांचे दुःख मात्र पूर्ण. कामाच्या ढिसाळ अंमलबजावणीवरून काँग्रेसने भाजपवर राजकीय नौटंकीचा आरोप करत हल्लाबोल केला आहे.
एकेकाळी घराघरांत शुद्ध पाणी पोहोचवणाऱ्या अमृत योजनेचा जयघोष करत भाजपने चंद्रपूरकरांना स्वच्छतेचे आणि सुबत्तेचे स्वप्न दाखवले होते. पण आता आठ वर्षांनंतरही त्या योजनेचे ‘अमृत’ अजूनही अनेक घरांपर्यंत पोहोचलेले नाही. उलटपक्षी रस्ते उखडले गेलेत, पाइपलाइन अर्धवट राहिल्यात आणि नागरिकांना तहान भागवण्यासाठी अजूनही नळाच्या टाक्यांवर अवलंबून राहावे लागते. यावर आता राजकीय नौटंकीचा आरोप करत काँग्रेसने भाजपवर तोफ डागली आहे.
काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष रितेश (रामू) तिवारी यांनी भाजप आमदार किशोर जोरगेवार आणि भाजपा महानगराध्यक्ष यांच्यावर कडवट शब्दांत टीका केली आहे. ते म्हणाले, ज्यांच्या कार्यकाळात ही योजना सुरू झाली, त्याच लोकांनी आता ती थांबवण्यासाठी मनपा आयुक्तांना निवेदन दिले. हे दुर्दैव नव्हे तर जनतेचा अपमान आहे, असा घणाघात केला.

योजनेचा अर्धवट प्रवास
2017 मध्ये चंद्रपूर महापालिकेने अमृत पाणीपुरवठा योजनेसाठी कार्यादेश दिला होता. ही योजना 2019 पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित होती. मात्र, आज 2025 मध्येही परिस्थिती ‘जैसे थे’ आहे. बहुतांश भागांमध्ये पाइपलाइनचे काम अपूर्ण असून, अनेक घरांपर्यंत पाणी पोहोचलेले नाही. काही ठिकाणी जलमापक काम करत नाहीत, आणि रस्त्यांची अक्षरशः चाळण झाली आहे.
ही योजना अमृत न राहता नागरीकांसाठी एक भस्मासुर ठरली आहे, असे म्हणत तिवारी यांनी भाजपच्या सत्ताधाऱ्यांवर कंत्राटदारांशी संगनमताचे गंभीर आरोप केले. त्यांनी असा दावा केला की, भाजपने मनपामार्फत केवळ निवडक ठिकाणी आणि आपल्या हितसंबंधांना पूरक अशा पद्धतीने कामे करून घेतली आहेत.
Nagpur Airport : आभाळात उडण्याआधी जमिनीवरच जलप्रवासाचा अनुभव
अपयश झाकण्यासाठी नाटक
भाजप आमदार जोरगेवार यांच्या सूचनेनुसार भाजप शिष्टमंडळाने मनपा आयुक्तांना निवेदन दिले की, पावसाळा लक्षात घेता अमृत योजनेची कामे थांबवावीत. त्यासाठी रस्त्यांची स्थिती आणि संभाव्य अडचणी कारणीभूत असल्याचे सांगण्यात आले. मात्र, काँग्रेसचे मत वेगळे आहे. हे केवळ अपयश झाकण्यासाठीचे नाटक आहे. ज्यांनी कामे उशिरा आणि ढिसाळपणे केली, तेच आता जनतेसमोर ‘कर्तव्यनिष्ठ’ असल्याचा आव आणतायत, असा उपरोधिक टोला रितेश तिवारी यांनी लगावला.
अमृत योजनेमुळे शहरातील रस्ते अनेक ठिकाणी उखडून ठेवण्यात आले आहेत. कुठेच नीट डांबरीकरण झालेले नाही. वाहतुकीचा बोजवारा उडालाय. पावसात चिखल, धोकादायक खड्डे, आणि अपघातांची शक्यता यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. हा प्रकल्प म्हणजे एक नियोजनशून्य प्रयोगशाळा आहे. कुठलाही विचार न करता रस्त्यांचे खोदकाम झाले आणि आता त्याच रस्त्यांवरून जनतेचा संयम डळमळतो आहे, असं चित्रण तिवारी यांनी केलं.
आंदोलनाचा इशारा
जर हा प्रकार असाच चालू राहिला आणि जनतेला वेठीस धरले गेले, तर काँग्रेस गप्प बसणार नाही. आम्ही रस्त्यावर उतरणार, असा ठणठणीत इशारा रितेश तिवारी यांनी दिला. तसेच त्यांनी जनतेलाही आवाहन केलं की, या राजकीय नौटंकीला फसू नका, प्रश्न विचारा आणि उत्तर मागा. अमृत योजनेचा उद्देश होता जनतेला शुद्ध पाणी देण्याचा. पण योजनेच्या अंमलबजावणीचा ‘गंध’ही नसलेली व्यवस्था, सत्ताधाऱ्यांचा गोंधळलेला पवित्रा, आणि जनतेच्या सहनशीलतेची घेतली जाणारी परीक्षा, हे सर्व चंद्रपूरकरांच्या अंगलट आले आहे. आता जनता पाण्यासाठी नाही, उत्तरदायित्वासाठी तहानलेली आहे.