महाज्योती ही बहुजन विद्यार्थ्यांसाठी शिक्षण व सामाजिक प्रगतीचा दीपस्तंभ ठरलेली संस्था आहे. नवनियुक्त व्यवस्थापकीय संचालक मिलिंद नारिंगे यांनी उद्दिष्टांना गती देत पारदर्शकतेसह प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत सेवांचा लाभ पोहोचवण्याचा संकल्प व्यक्त केला.
महात्मा ज्योतीबा फुले व सावित्रीबाई फुले यांनी घडवलेली सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक क्रांती आजही समाजाला प्रेरणा देते. त्यांच्या विचारांचा वारसा पुढे नेणे आणि बहुजन विद्यार्थ्यांच्या कल्याणासाठी कार्यरत राहणे हीच खरी प्रेरणा आहे. महाज्योतीच्या योजनांना अधिक गती देत, पारदर्शकता व प्रगतीशील दृष्टिकोनातून प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत सेवांचा लाभ पोहोचवणे हे नव्याने नवनियुक्त व्यवस्थापकीय संचालक मिलिंद नारिंगे यांचे ध्येय आहे.
महात्मा ज्योतीबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था, नागपूर (महाज्योती) यांच्या व्यवस्थापकीय संचालकपदी सोमवारी मिलिंद नारिंगे यांनी औपचारिकरीत्या पदभार स्वीकारला. यापूर्वी प्रा. व्यवस्थापकीय संचालक तसेच मुख्य लेखा व वित्त अधिकारी प्रशांत वावगे यांनी या पदाची जबाबदारी यशस्वीपणे सांभाळली होती. प्रशासकीय क्षेत्रातील व्यापक अनुभव आणि नेतृत्वगुणांमुळे मा. नारिंगे यांचे योगदान उल्लेखनीय राहणार आहे.
Sajid Khan Pathan : निष्पक्ष तपास नसेल तर अधिवेशनात गाजवू मुद्दा
स्वागत समारंभ
संस्थेच्या प्रशासकीय इमारतीत झालेल्या स्वागत समारंभात मुख्य लेखा व वित्त अधिकारी प्रशांत वावगे यांनी पुष्पगुच्छ देऊन नवनियुक्त संचालकांचे स्वागत केले. प्रकल्प संचालक कुणाल शिरसाठे, प्रकल्प व्यवस्थापक विकास गडपायले, प्रकल्प अधिकारी धम्मा गजभिये, शुभम वैलथरे यांसह संस्थेतील अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थी आणि माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्व उपस्थितांनी महाज्योतीच्या उज्ज्वल भवितव्याच्या दिशेने शुभेच्छा व्यक्त केल्या.
नारिंगे यांनी संस्थेच्या कार्यप्रणाली आणि उद्दिष्टांवर प्रकाश टाकत सांगितले की, ‘महाज्योती’ ही इतर मागासवर्ग व बहुजन कल्याण विभागाच्या अंतर्गत कार्यरत स्वायत्त संस्था असून तिचे कार्य केवळ शासकीय मर्यादांमध्ये मर्यादित नाही. ओबीसी, विमुक्त जाती-भटक्या जमाती (VJNT) आणि विशेष मागास प्रवर्गातील (SBC) विद्यार्थ्यांसाठी ही संस्था एक दीपस्तंभ ठरली आहे.
बहुजन कल्याणात योगदान
महाराष्ट्राच्या लोकसंख्येतील सुमारे 55 टक्के लोकसंख्या या तीन प्रवर्गांत मोडते. या पार्श्वभूमीवर महाज्योतीची कार्यक्षमता आणि राज्याच्या विकासातील योगदान अधिक स्पष्ट होते. यशस्वी वाटचालीमागे इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे मंत्री व महाज्योतीचे अध्यक्ष अतुल सावे यांचे दूरदृष्टीपूर्ण नेतृत्व आहे, असे नारिंगे यांनी नमूद केले. ते पुढे म्हणाले की, संस्थेच्या सर्व योजनांना गतिमान करणे, नव्या उपक्रमांची अंमलबजावणी, संशोधन, प्रशिक्षण व प्रबोधनावर विशेष भर देणे आणि शासनाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार पारदर्शकता टिकवणे ही माझी कार्यदिशा असेल.
विद्यार्थी, अधिकारी, कर्मचारी आणि सर्व हितचिंतकांच्या सहयोगाने महाज्योतीच्या माध्यमातून सामाजिक परिवर्तन, शैक्षणिक उत्थान, जनजागृती आणि क्षमता विकास साध्य होऊ शकतात. विद्यार्थ्यांनी व माजी विद्यार्थ्यांनी अनुभवांतून संस्थेच्या सामाजिक भक्कमपणावर, योग्य मार्गदर्शनावर आणि उपक्रमांच्या उपयुक्ततेवर प्रकाश टाकला. ‘महाज्योती’ ही बहुजन विद्यार्थ्यांसाठी शिक्षण व प्रगतीचा दीपस्तंभ ठरत राज्याच्या सामाजिक-शैक्षणिक उन्नतीसाठी नवी दिशा घडवेल, अशी भावना मिलिंद नारिंगे यांनी व्यक्त केली.
