राज्यात मराठा आरक्षणाचा मत चोरीचा वाद सुरू असताना, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी शक्तीपीठ महामार्गावरून सत्ताधाऱ्यांवर तोंडसुख घेतले आहे.
महाराष्ट्राच्या राजकीय रंगमंचावर सध्या एक नवा नाट्यमय अध्याय उलगडत आहे. मराठा आरक्षणाच्या आगीतून बाहेर पडत नाही तोच शक्तिपीठ महामार्गाचा वाद पुन्हा एकदा पेटला आहे. नागपूर ते गोवा या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला शेतकऱ्यांचा तीव्र विरोध वाढत आहे. या महामार्गासाठी हजारो हेक्टर सुपीक जमीन गिळंकृत होणार असून, शेतकऱ्यांना मिळणारा कमी मोबदला आणि उपजीविकेच्या संकटाने त्यांचा संताप उफाळला आहे. आधीच राज्यात शेतकऱ्यांना कर्जमाफी न मिळाल्याने शेतकरी संतापले आहेत. बारा जिल्ह्यांतील शेतकरी रस्त्यावर उतरले असून, ‘शक्तिपीठ रद्द करा’चा नारा गगनाला भिडत आहे. यातच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे.
निवडणूक आयोगाच्या प्रवक्त्याचं काम संपलं असेल, तर आता शेतकऱ्यांच्या आक्रोशाकडे लक्ष द्या, असा खोचक टोला सपकाळ यांनी लगावला आहे. या वादाच्या केंद्रस्थानी आहे 86 हजार कोटींचा हा भव्य प्रकल्प, जो फडणवीसांचा ड्रीम प्रोजेक्ट मानला जातो. मात्र, हा स्वप्निल प्रकल्प शेतकऱ्यांसाठी दुःस्वप्न ठरत आहे. कोल्हापुरात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी पंचगंगा नदीजवळ रास्ता रोको आंदोलन करत सरकारला पावसाळ्यातही घाम फोडला होता. शेतकऱ्यांनी हातात फलक, मनात संताप आणि घोषणांनी आकाश दणाणले होते.
Fuel Controversy : नितीन गडकरी यांच्या विरुद्ध रचला जातोय ‘पेड कॅम्पेन’चा कट
विरोधक संतापले
शक्तिपीठ महामार्ग रद्द झालंच पाहिजे, असा निर्धार त्यांनी व्यक्त केला. याचवेळी सपकाळ यांनी शेतकऱ्यांच्या भावनांशी खेळू नका, असा इशारा देत त्यांनी सरकारला धारेवर धरले. जगाच्या पोशिंद्याला त्रास देणं ही मोठी चूक आहे, असं म्हणत त्यांनी शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याची भूमिका घेतली. आंदोलनाची ठिणगी आता बारा जिल्ह्यांमध्ये पेटली आहे. या सगळ्या घडामोडींमध्ये हर्षवर्धन सपकाळ यांनी विरोधकांचा आवाज बुलंद केला आहे.
सपकाळ यांनी फडणवीस सरकारवर मत चोरीचा आरोप करत निवडणूक आयोगाच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. शक्तिपीठ महामार्गाला विरोध म्हणजे विकासाला विरोध नाही, तर शेतकऱ्यांच्या हक्कांचा लढा आहे, असं सपकाळ यांनी ठणकावलं. सरकारने हा विषय प्रतिष्ठेचा बनवू नये, असा सल्ला देत सपकाळ यांनी शेतकऱ्यांच्या भावना समजून घेण्याची गरज व्यक्त केली. एकूणच, शक्तिपीठ महामार्गाचा वाद आता राजकीय आणि सामाजिक पातळीवर तापला आहे. आता सरकार हा प्रकल्प रद्द करणार की शेतकऱ्यांच्या विरोधाला तोंड देणार, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
