
बुलढाणा जिल्ह्यात शासकीय नोकरीचे आमिष दाखवून जवळपास 2 कोटी रुपयांची फसवणूक. बनावटी शिक्के, आणि कागदपत्रे दाखवून दिली होती भुलपाथा.
राज्यात हल्ली फसवणुकीचे प्रकार मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. नोकरीचे आमिष दाखवून लोकांची फसवणूक करण्यात येत आहे. असाच एक प्रकार बुलढाणा जिल्ह्यात घडला आहे. जिल्हा आणि प्रशासनाचे मुख्यालय असलेल्या बुलढाणा जिल्ह्यात शासकीय नोकरीचा महाघोटाळा उघडकीस आला आहे. बोलणे, भपकेबाज वागणूक, मंत्रालयाचे बनावट शिक्के, नियुक्तीपत्रे याचा वापर करीत एका कुटुंबातील चार सदस्यांनी 62 जणांना गंडवले आहे. शासकीय नोकरी लाऊन देतो, असा विश्वास दाखवून जवळपास दोन कोटी रुपयांनी गंडवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
खोट्या प्रतीक्षा यादी आणि बनावट कागदपात्रांच्या आधारे गवळी कुटुंबीयांनी एक कोटी 96 लाख 67 हजार रुपयांची फसवणूक केली आहे. मुख्य आरोपी निलेश गवळी (वय 31) याने वडील विजय, पत्नी कोमल आणि चुलत भाऊ अंकुश या तिघांसह हा नोकरीचा महाघोटाळा केला आहे. यामुळे सर्वसामान्य बुलढाणावासी, प्रशासकीय आणि पोलीसदेखील चक्रावून गेले आहेत.

खोटी Advertisement
2019 ते 2024 या कालावधीत ही फसवणूक अत्यंत चातुर्याने करण्यात आली आहे. नोकरीचे आमिष दाखवून पीडितांकडून वेळोवेळी चेक, रोख व ऑनलाइन व्यवहारांद्वारे पैसे उकळण्यात आले आहेत. या चार कुटुंबीयांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील कनिष्ठ लिपिक, आरोग्यसेवक तसेच इतर सरकारी पदांसाठीच्या खोट्या जाहिराती तयार केल्या होत्या. त्या जाहिरातीद्वारे आरोपींनी लोकांची फसवणूक केली आहे. बनावट नियुक्तीपत्रे, मंत्रालयाचे खोटे शिक्के आणि दस्तावेज तयार करून लोकांना भुलपाथा देण्यात आली. आरोपी निलेश गवळी यांच्यासह चार जणांविरोधात भारतीय दंड संहितेच्या विविध कलमांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. मुख्य तक्रारदार विश्वनाथ गव्हाणे आणि इतर पीडितांच्या म्हणण्यानुसार, आरोपी निलेश गवळी याने मंत्रालयातील सचिव कक्ष अधिकाऱ्यांचे बनावट शिक्के देखील तयार केले होते.
अनेक पीडितांना पैसे भरल्यानंतरही नोकरी न मिळाल्याने मंत्रालयाच्या फेऱ्या माराव्या लागल्या होत्या. अखेर पीडितांना आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले. त्यानंतर विश्वनाथ गव्हाणे यांनी ताबडतोब पोलिसांत तक्रार दाखल केली. या फसवणुकीच्या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक दिनेश मोरे करीत आहेत. फसवणूक झालेल्यांपैकी इतर बेरोजगार युवती, युवक आणि त्यांचे कुटुंबीय यांची नावे अद्याप उघड झाली नाहीत. त्यांची एकूण फसवणूक जवळपास दोन कोटी रुपयांची झाली असल्याची माहिती आहे. गवळी कुटुंबीयांची फसवणूक उघड झाल्याने फसवणूकग्रस्त परिवारासाह संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. या प्रकरणातील पुढील तपास पोलीस करत आहेत.