
राज्य सरकारच्या कारभाराविरुद्ध काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले भडकले आहेत. त्यांनी सरकारला चांगलेच धारेवार धरलं.
महाराष्ट्रातील राज्यकर्त्यांचे जनतेकडे काहीच लक्ष नाही. भाजप महायुतीचं सरकार जनतेची लूट करीत असल्याची टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले यांनी केला. एसटी भाडेवाढीच्या मुद्द्यावरही त्यांनी सरकारला धारेवर धरलं. महायुतीनं विधानसभा निवडणुकीत जनतेवर सवलतींचा वर्षाव केला. मात्र आता सत्ता आल्यानंतर महायुती सरकारला लुटण्याचं काम करीत आहे. महागाईवर नियंत्रण मिळवण्यात भाजपा युती सरकार अपयशी ठरलं आहे. आता राज्यातील सर्वसामान्य जनतेची लूट सुरू आहे. एसटीच्या तिकिटदरात 15 टक्के वाढ करण्यात आली आहे. ही दरवाढ रद्द करावी, अशी मागणी नाना पटोले यांनी केली आहे.
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ म्हणजे सामान्य प्रवाशांची जीवनवाहिनी आहे. मात्र एसटीच्या दरात वाढ करून सरकार जनतेला लुटत आहे. एसटी महामंडळाला सेवा व्यवस्थित देता येत नाही. बसेसची दुर्दशा झाली आहे. सामान्यांना प्रवास करताना प्रचंड अडचणींचा सामना करावा लागत आहे. एसटीचे अपघात होत आहेत. अशा परिस्थितीत सरकार केवळ आपली तिजोरी भरण्यात व्यस्त असल्याचं पटोले यांचं म्हणणं आहे. एसटीच्या भाडेवाढीची परिवहन मंत्र्यांनाच माहिती नाही असे स्वतः मंत्रीच सांगतात. यावरून मंत्री पदावर कशाला रहावे, असा प्रश्न पटोले यांनी केला.

विदर्भात Thackeray गटाचा एल्गार! MSRTC भाडेवाढीविरोधात चक्काजाम आंदोलन
प्रचंड गैरसोय
एसटी महामंडळाच्या भोंगळ कारभाराचा फटका राज्यातील सर्वसामान्य प्रवाशांना सहन करावा लागत आहे. ग्रामीण भागात तर एसटी बसची अवस्था पहावत नाही. भंगार गाड्या ग्रामीण भागात देण्यात आल्या आहेत. अनेक एसटी बंद पडतात. आपल्या खात्यात काय चालले आहे, याची माहितीच परिवहन मंत्र्यांना नाही. हा प्रकार आश्चर्यकारक आहे. अधिकारी मंत्र्यांना विश्वासात घेत नसल्याचं यावरून सिद्ध होतं. भाडेवाढीचा निर्णय घेणाऱ्या अधिकाऱ्यांना निलंबित करण्याची मागणी देखील पटोले यांनी केली. जनतेची लूट करणारा हा निर्णय आहे. मंत्र्यांना एसटी महामंडळाची 1 हजार 360 हेक्टर जागा असल्याचं माहिती आहे. ही जागा बिल्डरांच्या घशात घालण्यात येत आहे. त्यामुळं राज्यात काय सुरू आहे, याचा अंदाज येतो असं पटोले म्हणाले.
एसटी महामंडळ हे भ्रष्टाचाराचा अड्डा बनले आहे. भ्रष्टाचार थांबवला तरी भाडेवाढ करण्याची गरज पडणार नाही असेही पटोले म्हणाले. एसटी महामंडळाप्रमाणे राज्यातील आरोग्य विभागही सुस्त असल्याचं पटोले म्हणाले. गुइलेन बॅरे सिंड्रोम आजाराचं थैमान राज्यात वाढत आहे. मात्र सरकारचं याकडेही लक्ष नाही. राज्यात शंभरपेक्षा जास्त रुग्णांना या रोगाची लागण झाली आहे. काही रुग्ण मृत्युशी झुंज देत आहेत. मात्र आराचा प्रादूर्भाव थांबविण्यासाठी प्रयत्न होताना दिसत नसल्याचंही आमदार नाना पटोले यांनी नमूद केलं.