
पक्षशिस्त मोडल्याने युवक काँग्रेसमधून काही पदाधिकाऱ्यांना निष्कासित करण्यात आले. त्यानंतर आता दोशी नसल्यास कारवाई करण्यात येऊ नये, असे नाना पटोले युवक काँग्रेस राष्ट्रीय अध्यक्षांसोबत चर्चेत म्हणाले.
काही दिवसांपूर्वी युवक काँग्रेसमधून साठ पदाधिकाऱ्यांना पदमुक्त केले होते. त्यानंतर चार पदाधिकाऱ्यांना संघटनेतून कायमस्वरूपी निष्कासित करण्यात आले आहे. त्यामुळे सध्या चांगलाच वाद रंगला आहे. त्यामुळे याची दखल काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीसुद्धा घेतली आहे. युवक काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षांसोबत आपण चर्चा केली आणि दोषी नसतील तर कारवाई करण्यात येऊ नये असे, संकेत नाना पटोले यांनी दिले आहे.
सरसंघचालक मोहन भागवत यांच्या विरोधात युवक काँग्रेसच्यावतीने नागपूरमधील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयासमोर आंदोलन करण्यात आले होते. या आंदोलात युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि सचिव सहभागी झाले होते. परंतु या आंदोलनात जेमतेप 50 पदाधिकारी सहभागी झाले होते. त्यामुळे तडकाफडकी 60 पदाधिकाऱ्यांना पदमुक्त करण्याचे आदेश प्रदेश प्रभारी यांनी काढले होते.

पक्षशिस्त मोडल्याने कारवाई
ही कारवाई युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष कुणाला राऊत यांच्या सांगण्यावरून करण्यात आली होती, असा आरोप करण्यात आला होता. त्यांच्या विरोधात दिल्लीत तक्रारी करण्यात आल्या होत्या. यानंतर प्रदेश कार्यकारी अध्यक्ष म्हणून शिवराज मोरे यांची नियुक्ती करण्यात आली होती. परंतु दोन दिवसांपूर्वी पक्षशिस्त मोडल्याचे कारण देऊन चार पदाधिकाऱ्यांना कायमस्वरूपी निष्कासित करण्यात आले. या कारवाईची एक प्रत नाना पटोले यांना देखील पाठविण्यात आली होती. तत्पूर्वी साठ पदाधिकाऱ्यांच्या पदमुक्त केले यावर नाना पटोले यांनी आमच्या पक्षात लोकशाही आहे एवढेत त्रोटक उत्तर दिले होते. युवक काँग्रेसने निष्कासित करण्यात आलेल्या पदाधिकाऱ्यांची अधिकृत नोट पटोले यांना पाठवल्याने त्यांनाही याविषयावर आता मत व्यक्त करावे लागले आहे.
कायमस्वरूपी निष्कासित करण्यात आलेल्यांमध्ये युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष तनवीर विद्रोही, महासचिव अनुराग भोयर, सचिव अक्षय हेटे आणि नागपूर ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष मिथिलेश कन्हेरे यांचा समावेश आहे. या चौघांनाही आता त्यांची बाजू मांडण्यासाठी दिल्लीत बोलाविण्यात आले आहे. मीडियाला बाईट दिला म्हणून निष्कासित करण्यात आले होते, असे सांगण्यात येत आहे. पक्षातून कोणालाही कायम स्वरुपी निष्कासित करण्यापूर्वी नोटीस पाठवावी लागते. पक्षशिस्त पालन समितीकडे तक्रार करावी लागते. समिती सुनावणी नंतर आपला अहवाल अध्यक्षांकडे सादर करते. त्यानंतर कारवाई कारवाई करण्यात येते, अशी नियमावली युवक काँग्रेसच्या घटनेमध्ये आहे. त्यामुळे निष्काशनाची कारवाई बेकायदेशीर आहे, असा दावा करण्यात येत आहे.