महाराष्ट्र

नागपूर Smart City स्वप्नपूर्ती गेली खड्ड्यात

संत्र्याच्या नव्हे खोदून ठेवलेल्या शहरात लोकांचे स्वागत

Author

नागपूर महानगरपालिकेच्या कारभारावर रस्त्यांच्या दयनीय स्थितीमुळे गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.

नागपूर महानगरपालिका संपूर्ण शहराच्या विकासाची जबाबदारी घेते असा दावा करते. मात्र, समस्या उभी राहिली की दुसऱ्या विभागांवर बोट दाखवण्यास ती मागेपुढे पाहत नाही. रस्त्यांचे प्रश्न चिघळले की, बांधकाम करणाऱ्या ठेकेदारांनाच उपाययोजना करण्याचे आदेश दिले जातात. ठेकेदार मात्र दर-दर ठोकर खाऊन समस्यांचे निराकरण करण्याचा प्रयत्न करत आहेत. याआधी नितीन गडकरींनी देखील याबाबत नाराजी व्यक्त केली होती, मात्र अद्यापही यावर ठोस निर्णय घेतलेला नाही.

शहरातील बहुतांश रस्त्यांची देखरेख आणि पुनर्बांधणीची जबाबदारी मनपाकडे आहे. प्रत्येक वर्षी कोट्यवधी रुपये खर्च करूनही रस्त्यांची दुरवस्था कायम आहे. ठेकेदार कमी दरात कामाचा ठेका मिळवण्यासाठी अधिकारी व नगरसेवकांना कमीशन देतात, परिणामी उन्नत दर्जाचे रस्ते बांधकाम अशक्य होते.

 

खामगांव रेल्वेची Chain Pulling थांबवतील का Akash Fundkar

प्रशासनाची निष्क्रियता 

 

शहराला स्मार्ट सिटी बनवण्याचा दावा करण्यात आला असला तरी रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे स्मार्ट सिटीचे स्वप्न धूसर झाले आहे. खड्ड्यांनी भरलेल्या रस्त्यांवर अपघातांचे प्रमाण वाढले आहे. रस्त्यांच्या गुणवत्तेची तपासणी करणारी समितीही सुस्त असल्याचे दिसून येत आहे. दोषी ठेकेदारांना वाचवण्यासाठी केवळ कागदोपत्री तपासणी केली जात असल्याचा आरोप आहे. ज्या रस्त्यांची पुनर्बांधणी शक्य आहे तेथेच लक्ष केंद्रित केले जात आहे.

मनपाचे अनेक अधिकारी आणि नगरसेवक अप्रत्यक्षपणे ठेकेदारी व्यवसायात गुंतलेले असल्याची माहिती समोर येत आहे. ठेकेदारांना फायदा मिळावा यासाठी नियम झुगारले जात आहेत. खड्डेमय रस्त्यांमुळे वाहतुकीचे अपघात वाढले आहेत. वृद्ध आणि लहान मुले यांना या दयनीय रस्त्यांमुळे आरोग्य समस्यांना सामोरे जावे लागत आहे.

क्रीडा संकुलांची Maharashtra मधील अडथळ्यांची शर्यत संपेना

सक्षम नेतृत्वाची गरज

जवळपास प्रत्येक नगरसेवक व सत्ताधाऱ्यांनी रस्त्यांच्या मुद्द्यावर आक्रमक भूमिका घेतली आहे. मात्र, आगामी मनपा निवडणुकीमुळे या प्रश्नावर चर्चा टाळली जात आहे. प्रशासनाच्या या बेजबाबदार वृत्तीचा त्रास सामान्य नागरिकांना भोगावा लागत आहे.

रस्त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी सक्षम नेतृत्वाची गरज आहे. नागपूरला खरोखर स्मार्ट सिटी बनवायचे असेल तर भ्रष्टाचारमुक्त रस्तेबांधणी ही प्राथमिक गरज ठरते. या समस्यांवर तातडीने उपाययोजना करणे आवश्यक आहे. दोषींवर कारवाई आणि पारदर्शक व्यवस्थापनानेच नागपूरच्या रस्त्यांचे भविष्य उज्ज्वल होईल.

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!