
देशभरात भाजपची सदस्य नोंदणी सुरू आहे. महाराष्ट्रात भाजपने एक कोटी सदस्य संख्या पूर्ण केली आहे. कर आणखी 50 लाख सदस्यांची नोंद करा, असे आवाहन देवेंद्र फडणवीस यांनी पक्षाला केले आहे.
महाराष्ट्रात भारतीय जनता पक्षाने पुन्हा एकदा आपली ताकद दाखवून दिली आहे. विधानसभा निवडणुकीनंतर पक्षाने सदस्य नोंदणी मोहीम गतिमान केली होती. आता त्याचा भव्य परिणाम समोर आला आहे. भाजपने तब्बल एक कोटी सदस्य संख्या पूर्ण करत महाराष्ट्राच्या राजकीय पटावर आपली मजबूत उपस्थिती सिद्ध केली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्वात भाजपचे एक कोटी सदस्यपूर्तीचे उद्दिष्ट जवळपास पूर्ण झाले आहे. आता आणखी 50 लाख सदस्य करणे डोळ्यासमोर असल्याने दररोज पाच लाख सदस्य करा, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. भाजप कार्यकर्त्यांच्या संघटनात्मक बैठकीला ते संबोधित करत होते.

पाच लाखांचे Target
देवेंद्र फडणवीस म्हणाले, भारतीय जनता पक्षाने देशभरात सदस्यता नोंदणी अभियान चालवले आहे. या सदस्य नोंदणी अंतर्गत दीड कोटी सदस्य करण्याचे महाराष्ट्राने ठरवले आहे. निवडणुकांमुळे काही दिवस लांबवली गेलेली ही सदस्यता मोहीम 15 फेब्रुवारीला संपणार आहे. त्याआधी दररोज पाच लाख सदस्य करणे हे आपले ध्येय असायला हवे. संघटनात्मक बांधणी उत्तम असेल तर पक्ष प्रभावीपणे काम करू शकतो. सरकारची कामगिरीही उत्तम प्रकारे जनतेपर्यंत पोहोचू शकते, असेही त्यांनी यावेळी नमूद केले.
भाजपचे काही आमदार या सदस्यता नोंदणी मोहिमेपासून दूर असल्याचेही फडणवीस यांनी सांगितले. प्रत्येक आमदाराला 50 हजार सदस्य करण्याचे उद्दिष्ट दिले आहे. ते पूर्ण करणारे बरेच आमदार आहेत. आज जे आमदार कोणतेही कारण न देता किंवा पूर्वपरवानगी न घेता गैरहजर राहिले. त्यांच्या अनुपस्थितीची दखल घेत प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी या सदस्यांची नावे असलेली यादी तयार करावी, असेही देवेंद्र फडणवीस यांनी नमूद केले.
https://fb.watch/xFHv27SGHu/
लोकसंपर्क मोहिमेचा प्रभाव
या मोहिमेसाठी भाजपने राज्यभरात “संपर्क से समर्थन” आणि “एक बूथ, 100 सदस्य” असे अभियान राबवले. शहरांपासून ग्रामीण भागांपर्यंत पोहोचण्यासाठी सोशल मीडिया, सभा, पदयात्रा, तसेच कार्यकर्त्यांची थेट भेट असे विविध मार्ग अवलंबले गेले. यामुळे केवळ पारंपरिक भाजप मतदारच नाही, तर नवीन तरुण मतदार, महिला, आणि शेतकरी वर्गही पक्षाकडे आकर्षित झाल्याचे पक्षाच्या अंतर्गत अहवालात नमूद केले आहे.
विधानसभा निवडणुकीनंतर पक्षाने आपल्या संघटनेला बळकट करण्यासाठी राज्यभरात सदस्य नोंदणी अभियान गतिमान केली. डिजिटल आणि प्रत्यक्ष अशा दोन्ही माध्यमांतून सदस्य नोंदणीला गती देण्यात आली. घरोघरी संपर्क, डिजिटल प्रचार, व्हॉट्सअॅप संदेश, आणि बूथ पातळीवरील कार्यकर्त्यांची मेहनत या सगळ्याचा परिणाम म्हणून भाजपने एक कोटी सदस्यसंख्येचा टप्पा पार केला.
ताकद वाढली
भाजपच्या या सदस्य वाढीमुळे आगामी स्थानिक निवडणुकीत पक्ष अधिक मजबूत होणार आहे. आगामी महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांमध्ये भाजप मोठ्या संख्येने उमेदवार उभे करू शकतो. याशिवाय, महाराष्ट्रात भाजपचा कार्यकर्ता वर्ग मोठ्या प्रमाणात विस्तारल्यामुळे विरोधी पक्षांसमोर मोठे आव्हान निर्माण झाले आहे.
या ऐतिहासिक टप्प्यामागे भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची मोठी भूमिका राहिली. मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्ष आणि इतर प्रमुख नेत्यांनी स्वतः मोहीम राबवून लोकांशी संवाद साधला. विविध जिल्ह्यांत बैठकांचे आयोजन करून अधिकाधिक नागरिकांना भाजपच्या विचारधारेशी जोडण्याचे काम झाले.