
मुंबईतील हॉटेल ताजी ची जगभरात प्रसिद्धी आहे. तर हॉटेल ताज नागपुरात देखील निर्माण व्हावे, अशी मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली. त्यानंतर ताज ग्रुपकडून या इच्छेला सकारात्मक प्रतिसाद आला आहे.
नागपूरकरांसाठी एक आनंदाची बातमी आहे. लवकरच त्यांना जागतिक दर्जाच्या ताज हॉटेलच्या लक्झरीचा अनुभव घेता येणार आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपुरात ताज हॉटेल उभारण्याची इच्छा व्यक्त करताच, ताज ग्रुपनेही तातडीने सकारात्मक प्रतिसाद दिला. अवघ्या काही क्षणांतच त्यांनी नागपुरात भव्यदिव्य ताज हॉटेल उभारण्याची घोषणा केली. त्यामुळे विदर्भाच्या राजधानीत पर्यटन आणि हॉटेल इंडस्ट्रीला नवसंजीवनी मिळणार आहे.
मुंबईतील वांद्रे येथे भव्य ताज हॉटेल उभारणीच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री फडणवीस प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. या कार्यक्रमादरम्यान, त्यांनी आपल्या भाषणात नागपुरातही अशाच एका आलिशान ताज हॉटेलची उभारणी व्हावी, अशी इच्छा व्यक्त केली. त्यांच्या या सूचनेला ताज ग्रुपने अवघ्या काही मिनिटांतच मान्यता देत नागपुरात ताज हॉटेल आणि आणखी एका जिंजर हॉटेलची घोषणा केली.

नागपुरात नवी उंची
सध्या नागपुरात ताज ग्रुपच्या जिंजर हॉटेलची एक शाखा कार्यरत आहे. मात्र, वाढती मागणी लक्षात घेऊन आणखी एका जिंजर हॉटेलची निर्मिती करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासोबतच, आता आलिशान आणि भव्यदिव्य ताज हॉटेलही नागपुराच्या शानमध्ये भर घालणार आहे. ही घोषणा होताच नागपूरकरांमध्ये उत्साहाचं वातावरण पाहायला मिळत आहे.
या कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्र्यांनी वांद्र्यात उभ्या राहणाऱ्या ताज हॉटेलच्या सौंदर्याची आणि त्याच्या वैशिष्ट्यपूर्ण डिझाईनची स्तुती केली. त्यांनी इंडियन हॉटेल्स कंपनी लिमिटेड (ताज ग्रुप) चे आभार मानत सांगितलं की, “रतन टाटा यांच्या विशेष प्रेमाखातर हे हॉटेल त्यांच्यासाठी खूप महत्त्वाचं होतं. त्याच्या उभारणीत काही अडचणी आल्या होत्या, पण त्या दूर करत आता हे हॉटेल मुंबईच्या सौंदर्यात अधिक भर घालणार आहे.”
जगभरात अस्तित्व
मुख्यमंत्री फडणवीस पुढे म्हणाले, “ताज ग्रुपच्या हॉस्पिटॅलिटीने जागतिक पातळीवर स्वतःचं वेगळं स्थान निर्माण केलं आहे. जगभरातील अनेक देशांमध्ये ताज हॉटेल्स आहेत, जेथे भारतीय संस्कृतीचा आणि अतिथ्याच्या परंपरेचा उत्कट अनुभव मिळतो. परदेशात असताना ताज हॉटेलमध्ये गेल्यावर आपल्याला भारतातच असल्यासारखं वाटतं.”
यामुळेच, त्यांनी ताज ग्रुपला नागपुरातही एक भव्य हॉटेल उभारण्याचं आवाहन केलं. त्यावर ताज ग्रुपने तात्काळ प्रतिसाद देत ही मोठी घोषणा केली. नागपूरमधील पर्यटन, व्यापार आणि हॉटेल उद्योगासाठी हा एक महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे.
मुख्यमंत्र्यांचे आवाहन
मुख्यमंत्र्यांनी या कार्यक्रमात रतन टाटा यांच्या आठवणींनाही उजाळा दिला. त्यांनी सांगितलं की, “रतन टाटा यांच्या जाण्यापूर्वी जर हे हॉटेल पूर्ण झालं असतं, तर त्यांना याचा अतिशय आनंद झाला असता. कदाचित, आम्हीही काही अडचणी सोडवण्यात कमी पडलो. मात्र, भविष्यात अशा कोणत्याही प्रकल्पांसाठी सरकार ताज ग्रुपच्या पाठीशी उभं राहील.”
मर्यादा ओलांडाल तर परिणाम भोगाल ! Devendra Fadnavis यांचा दोघांनाा इशारा
त्यांनी पुढे असंही म्हटलं की, “मुंबईसारख्या शहराला अशा जागतिक दर्जाच्या हॉटेल्सची अधिक गरज आहे. त्यामुळे ताज ग्रुपने आणखी काही हॉटेल्सच्या उभारणीचा विचार करावा.”
नवा लक्झरी अनुभव
ताज ग्रुपची नागपुरात होणारी ही नवी इनिंग विदर्भाच्या विकासात एक मोठी भर घालेल. हॉटेल उद्योग, पर्यटन आणि व्यवसाय क्षेत्राला नवसंजीवनी मिळेल. नागपूरकरांना आता जागतिक दर्जाच्या आलिशान ताज हॉटेलमध्ये राहण्याचा, उत्तम जेवणाचा आणि सेवांचा आनंद लवकरच अनुभवता येणार आहे.
नागपूरच्या वाढत्या गरजा आणि पर्यटनाच्या संधी ओळखून घेत ताज ग्रुपने घेतलेला हा निर्णय भविष्यात या शहराच्या आकर्षणात आणखी वाढ करेल. नागपूरकरांसाठी हे निश्चितच एक अभिमानास्पद क्षण आहे.