
सत्ता स्थापन झाल्यानंतर महायुती सरकारवर अनेक आरोप करण्यात येत आहेत. नाना पटोले यांनी पुन्हा टीका करीत मुख्यमंत्र्यांविरोधात हक्कभंग गुन्हा दाखल करू, असा इशारा दिला आहे.
परभणीतील सोमनाथ सुर्यवंशी यांच्या मृत्यूला पोलीस जबाबदार नाहीत, असे सरकार सांगत असताना, त्याच पोलिसांना निलंबित का केले जात आहे? केवळ निलंबन करून हा विषय संपणार नाही, तर संबंधित पोलिस अधिकाऱ्यांना बडतर्फच केले पाहिजे, अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली. तर मुख्यमंत्र्यांवर हक्कभंग आणणार, असेही नाना पटोले म्हणाले.
नागपूर अधिवेशनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुर्यवंशी यांच्या मृत्यूबाबत दिशाभूल करणारी माहिती दिली. शवविच्छेदन अहवालाने स्पष्ट केले असताना की पोलिसांच्या मारहाणीतच सुर्यवंशी यांचा मृत्यू झाला, तरी मुख्यमंत्री त्याला दम्याचा आजार कारणीभूत असल्याचे सांगत आहेत. त्यामुळे काँग्रेस आता त्यांच्याविरोधात हक्कभंग आणणार आहे, अशी माहिती पटोले यांनी दिल्लीत पत्रकारांशी बोलताना दिली.

चौकशी करा
परभणीमध्ये संविधानाच्या अपमानानंतर पोलिसांनी मोठ्या प्रमाणात कोंबिंग ऑपरेशन केले. यात अनेक निरपराधांना बेदम मारहाण करण्यात आली. या कोंबिंग ऑपरेशनचे आदेश नेमके कोणी दिले? हे आदेश मंत्रालयातून आले की पोलीस महासंचालक कार्यालयातून? याचा तपास झाला पाहिजे आणि या आदेशांमागील जबाबदार अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणीही पटोले यांनी केली.
बीड आणि परभणीतील हत्याकांड प्रकरणात सरकारचा दुटप्पीपणा स्पष्ट दिसतो. बीडमध्ये सरपंच संतोष देशमुख यांची हत्या आणि परभणीतील सोमनाथ सुर्यवंशी यांचा मृत्यू झाला. या दोन्ही गंभीर प्रकरणांत सरकार केवळ वेळकाढूपणा करत असल्याचेही नाना पटोले म्हणाले.
ठरवून केले जाते
भाजप आमदार सुरेश धस एका बाजूला मोठमोठे आरोप करत आहेत, तर दुसऱ्या बाजूला सरकार त्यांच्यावर कोणतीही कारवाई करत नाही. आता धस परभणी प्रकरणात पोलिसांना माफी देण्याची भाषा करत आहेत, यावरून हे सर्व आधीच ठरवून केले जात आहे, असा आरोप पटोले यांनी केला. “सरकार मुद्दाम जनतेचे लक्ष खऱ्या प्रश्नांपासून दुसरीकडे वळवत आहे. सुरेश धस केवळ एक चेहरा आहेत, पण हा दुटप्पीपणा संपूर्ण सरकारचाच आहे,” असा घणाघात नाना पटोले यांनी केला.
सरकार सत्यापासून पळ काढतेय का? पोलिसांवर कठोर कारवाई होणार का? की हे प्रकरणही राजकीय मलमपट्टीत संपवले जाणार? याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.