
रेल्वेतून प्रवास करणाऱ्या हजारो लोकांचे प्राण चालक, गार्ड आणि कर्मचाऱ्यांच्या हाती असतात. थोडेही दुर्लक्ष लोकांच्या जीवावर बेतू शकते. परंतु वेळीच सतर्कता दाखविल्यानं अपघात टळतात. अशीच सतर्कता दाखविणाऱ्यांची पाठ मध्य रेल्वेनं थांपटली.
डब्यांमध्ये हजारो प्रवासी घेत रेल्वे रूळांवरून धावत असते. प्रचंड वेगानं धावणाऱ्या या रेल्वेतून प्रवास करणाऱ्यांच्या प्राणाची रक्षा ही रेल्वे विभागाची जबाबदारी असते. रेल्वे कर्मचाऱ्यांच्या ‘टीमवर्क’ मधून हे शक्य होते. अशाच ‘टीमवर्क’चं उत्कृष्ट प्रदर्शन करणाऱ्या कर्मचाऱ्यांची पाठ मध्य रेल्वेकडून थोपण्यात आली. महाप्रबंधक धर्मवीर मीना यांनी वेळीच सतर्कता दाखविणाऱ्या कर्मचाऱ्यांना ‘शाबास रे पठ्ठ्या’ म्हणत त्यांना संरक्षा पुरस्काराने गौरविले. मध्य रेल्वेच्या एकूण 11 कर्मचाऱ्यांना यात समावेश होता. या कर्मचाऱ्यांमध्ये नागपूर विभागातील एकाचा समावेश आहे. मुंबई विभागातील तीन, पुण्यातील चार, सोलापुरातील दोन आणि भुसावळ विभागातील एकाचा समावेश आहे.
रेल्वे कर्मचाऱ्यांची ड्यूटी ‘बॉर्डर’वर उभ्या असलेल्या सैनिकापेक्षा काही कमी नसते. फरक इतकाच असतो की सैनिक सीमारेषेवर लोकांच्या प्राणाचं रक्षण करतो. रेल्वे कर्मचारी देशाच्या सीमेच्या आत राहुन लोकांना सुरक्षित प्रवास उपलब्ध करून देतो. अपघात टाळतो आणि लोकांच्या प्राणाचे रक्षण करतो. ड्युटी करताना दाखवलेल्या सतर्कतेमुळे रेल्वे कर्मचाऱ्यांनी अनेक अपघात टाळले आहेत. याच योगदानासाठी त्यांना महाप्रबंधक धर्मवीर मीना यांनी सन्मानित केले. गौरव पदक, प्रशस्तीपत्र आणि रोख पुरस्कार असं याचं स्वरूप आहे.

वेळीच केला उपाय
मध्य रेल्वेच्या नागपूर विभागातील अविनाश कुमार हे पॉइंट मन म्हणून कार्यरत आहेत. 19 जानेवारी 2025 रोजी एका मालगाडीची ते तपासणी करीत होते. त्यावेळी त्यांना एका वॅगनच्या चाकात काही बिघाड दिसला. त्यांनी वेळीच वरिष्ठांच्या मदतीनं यावर तोडगा काढला. त्यामुळं मोठा अपघता टाळला. भुसावळ विभागातील ट्रॅक मेंटेनर गजानन पाटील यांनाही सन्मानित करण्यात आलं. 25 डिसेंबर 2024 रोजी एका प्रवाशाला धावत्या गाडीतून खाली पडण्यापासून त्यांनी वाचविले. मुंबई विभागातील अरुण कुमार पंडित हे देखील पुरस्काराचे मानकरी ठरले. अरुण कुमार वाशी येथे मास्टर क्राफ्ट्समन आहेत. 14 जानेवारी 2025 रोजी ते नियमित तपासणी करीत होते. यावेही त्यांना रेल्वे रुळाला तडा गेल्याचं आढळनं. वेळीच केलेल्या उपायांमुळं अपघात टळला.
पेन येथे राजन सिंह हे पॉइंट्समन म्हणून कार्यरत आहेत. त्यांनाही रेल्वे रुळाला तडा गेल्याचे दिसले. त्यांनी स्टेशन मास्तरला तत्काळ माहिती दिली. दातीवली येथील दीपक कुमार हे ईलेक्ट्रिक सिग्नल मेंटेनर आहेत. 7 जानेवारी 2025 रोजी त्यांना रेल्वे रुळाला तडा गेल्याचं आढळलं. त्यांनी देखील वेळीच वरिष्ठांना सतर्क केलं. पुणे विभागातील लोको पायलट आर. टी. वाणी यांना रेल्वे रूळांवर एक लहान गॅस सिलिंडर दिसले. सिलिंडर दिसताच त्यांनी तत्काळ रेल्वे थांबवली. पुण्यातील एसी मॅकेनिक धरमचंद मीना आणि बीरबल सिंह यांनीही अशीच सतर्कता दाखविली.
वेळीच आग विझवली
मीना आणि सिंह यांना 8 जानेवारी 2025 रोजी झेलम एक्स्प्रेसमध्ये आग लागल्याचं लक्षात आलं. त्यांनी पाच अग्निशमन यंत्रांचा वापर करून तातडीनं आग आटोक्यात आणली. त्यामुळं असंख्य प्रवाशांचे प्राण वाचले. कोपरगाव येथील इलेक्ट्रिक सिग्नल मेंटेनर सिद्धनाथ कुमार यांनीही अशीच सतर्कता दाखविली. 14 जानेवारी 2025 रोजी कोपरगाव स्टेशनवर ट्रॅक सर्किटमध्ये बिघाड असल्याचं त्यांना लक्षात आलं. त्यांनी तातडीनं दुरूस्ती केल्यानं अपघात टळला. सोलापूर विभागातील तिकिट निरीक्षक लेखराम मीना हे देखील पुरस्काराचे मानकरी ठरले. सिद्धेश्वर एक्स्प्रेसमध्ये कोच कपलिंगला तडा गेल्याचं त्यांना दिसलं. त्यांनी तातडीनं दुरूस्ती केल्यानं अपघात टळला.
गोडगाव येथील सिग्नल प्रणालीतील गंभीर बिघाड झाला होता. ईलेक्ट्रिक सिग्नल मेंटेनर विष्णू बावरी यांनी वेळीच हा बिघाड दूर केला. त्यांचाही सत्कार करण्यात आला. मध्य रेल्वेचे महाप्रबंधक धर्मवीर मीना यांनी या पुरस्कारांचे वितरण केले. रेल्वे कर्मचाऱ्यांनी दाखविलेली सतर्कता आणि धाडस यामुळं अनेकांचे प्राण वाचल्याचे ते म्हणाले. पुरस्कार मिळविणाऱ्या 11 कर्मचाऱ्यांची काम इतर रेल्वे कर्मचाऱ्यांनाही प्रेरणा देईल. रेल्वे प्रवास अधिक सुरक्षित करण्यास मदत करेल, असे ते म्हणाले. मध्य रेल्वेचे अपर महाप्रबंधक प्रतीक गोस्वामी, प्रधान मुख्य संरक्षा अधिकारी चंद्र किशोर प्रसाद आदी यावेळी उपस्थित होते.