
शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे यांनी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केले. या आरोपांमुळे राजकीय वातावरण तापले असताना, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गोऱ्हेंच्या समर्थनार्थ ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल केला.
महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडू लागल्या आहेत. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर थेट आरोप केल्यानंतर शिवसेनेच्या दोन गटांमध्ये वातावरण तापलं आहे. गोऱ्हेंनी केलेला दावा धक्कादायक होता. ठाकरेंच्या गटात दोन मर्सिडिज मिळाल्या की पद मिळतं, या वक्तव्याने राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली. ठाकरे गटाने यावर आक्रमक प्रतिक्रिया देत राज्यभर गोऱ्हे यांच्या विरोधात आंदोलन उभं केलं. मात्र, या सगळ्या गदारोळात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गोऱ्हेंच्या बाजूने कडाडून समर्थन दिलं आणि ठाकरेंवर जोरदार टीका केली.
एकनाथ शिंदेच्या झालेल्या एका कार्यक्रमात त्यांनी खळबळजनक वक्तव्य केले. तिथे शिंदेंनी ठाकरेंवर निशाणा साधत, गोऱ्हेंनी दिल्लीतील एका व्यासपीठावर जे काही म्हटलं, ते काही लोकांना इतकं झोंबलं की त्यांना मिरच्या लागल्या, असा घणाघाती टोला लगावला. त्यांच्या या वक्तव्यामुळे महाराष्ट्राच्या राजकीय वातावरणात अधिकच तापमान वाढलेलं आहे.

Devendra Fadnavis : प्रशासनात पुन्हा बदल्या अन् विरोधकांच्या सुरू चुगल्या
ठाकरेंचा अहंकार डाचतोय
उपमुख्यमंत्री शिंदे यांनी ठाकरे गटाला डिवचत अजूनही त्यांचं पोट दुखतंय असा थेट आरोप केला. आम्ही उठाव केला, तेव्हा रोज आम्हाला शिव्याशाप दिल्या जात होत्या. पण आम्ही कधीही आरोपांना आरोपांनी उत्तर दिलं नाही, आम्ही आमच्या कामातून उत्तर दिलं आणि म्हणून आमचं सरकार यशस्वी ठरलं, असं ते म्हणाले. पुढे बोलताना त्यांनी दावा केला की बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारधारेचं पालन करण्याचं काम स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलं, त्यामुळेच ३७० कलम हटवण्यासारखा ऐतिहासिक निर्णय झाला. देशाची जनता आजही मोदींच्या पाठिशी उभी आहे, असा दावा शिंदेंनी केला.
शिंदेंच्या या वक्तव्यावरून स्पष्ट होतं की ते ठाकरे गटाला कमकुवत करण्याचा कोणताही संधी सोडणार नाहीत. उद्धव ठाकरे यांची शिवसेना आता बळकट राहिलेली नाही आणि त्यामुळेच त्यांचा राजकीय संघर्ष अधिकच उग्र होतोय, अशी टीका केली जात आहे.
शिंदेंचा घणाघाती हल्ला
ठाकरेंवर आणखी एक जहरी टीका करताना शिंदेंनी म्हटलं, आमची देना बँक आहे आणि समोरच्यांची लेना बँक आहे, याचा अर्थ स्पष्ट होता शिंदे गट लोकांना काही देण्याच्या भूमिकेत आहे, तर ठाकरे गट फक्त घेत राहतोय. नीलम गोऱ्हे यांचं नाव घेत ते म्हणाले, महिलांवर अन्याय झाला की धावून जाणाऱ्या पहिल्या महिला म्हणजे नीलम गोऱ्हे. शक्ती विधेयकामध्ये त्यांचं मोठं योगदान आहे. पण जे चांगलं काम करतात, त्यांना ही मंडळी बदनाम करत आहेत, असा आरोप शिंदेंनी केला.
संपूर्ण वादात नीलम गोऱ्हेंनी केलेल्या आरोपांनी ठाकरेंना चांगलाच धक्का दिला आहे. उद्धव ठाकरे यांच्या गोटात या आरोपांमुळे अस्वस्थता पसरली आहे. एकीकडे ठाकरे गट त्यावर आक्रमक आंदोलने करत असताना, दुसरीकडे शिंदे गटाने ही संधी साधून अधिकच जोरदार प्रतिहल्ला चढवलाय.
Amol Mitkari : मंत्र्यांच्या ओएसडीनेच मागितली लाखो रुपयांची लाच
राजकीय भूकंपाची चाहूल
वादाच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या ठाकरे गटावर दबाव वाढलेला दिसतोय. नीलम गोऱ्हे यांच्यासारख्या वरिष्ठ नेत्या जेव्हा बंडखोरी करतात, तेव्हा ती फक्त एक राजकीय खेळी नसते, तर ती पक्षातील अंतर्गत अस्वस्थतेचं दर्शन घडवते. शिवसेनेचा एकेकाळचा अभेद्य गड आता ढासळतोय का? उद्धव ठाकरे यांना आता ही लढाई कशी सांभाळायची, हा मोठा प्रश्न आहे. दुसरीकडे, शिंदे गट मात्र अधिक बळकट होत चालला आहे. या आरोप-प्रत्यारोपाच्या रणधुमाळीत महाराष्ट्राच्या राजकारणात आगामी काही दिवसांत मोठे राजकीय भूकंप येण्याची चिन्हं दिसत आहेत.