
शिवसेना नेत्या तथा राज्यसभा उपसभापती नीलम गोरे यांच्या वक्तव्यामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. आता केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनीही यावर प्रतिक्रिया दिली आहे.
शिवसेनेच्या नेत्या आणि राज्यसभा उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्या एका धक्कादायक वक्तव्यामुळे संपूर्ण राज्यात राजकीय खळबळ उडाली आहे. गोऱ्हे यांनी काही दिवसांपूर्वी माध्यमांशी बोलताना “उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत पद मिळवण्यासाठी दोन मर्सिडीज द्याव्या लागतात,” असे वादग्रस्त विधान केले होते. त्यांच्या या वक्तव्याने शिवसेनेच्या अंतर्गत राजकारणावर प्रश्नचिन्ह निर्माण केले असून पक्षात सध्या नव्या वादाला तोंड फुटले आहे. यावरून आता शिवसेना एकनाथ शिंदे गटातील नेते तथा केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी वक्तव्य केलं आहे.
नीलम गोऱ्हे यांचे हे विधान शिवसेनेतील “मनी पावर” आणि “पदासाठी होणारा व्यवहार” यावर थेट प्रकाश टाकणारे मानले जात आहे. मात्र, त्यानंतर त्यांनी आपले वक्तव्य स्पष्ट करताना हे केवळ “हास्यविनोदात केलेले विधान” असल्याचे सांगत विषयावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला.

Nashik Kumbh Mela: शिंदे-फडणवीस संघर्ष शिगेला, पवार मात्र ‘मौनीबाबा’
सूचक इशारा
गोऱ्हे यांच्या या विधानावर प्रतिक्रिया देताना शिवसेना नेते आणि केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी आता नवा वाद निर्माण केला आहे. जाधव म्हणाले की, “मी शिवसेनेचा संस्थापक सदस्य आहे. मला कोणत्याही पदासाठी मर्सिडीज द्यावी लागली नाही. मर्सिडीज कार दिल्याशिवाय इथपर्यंत आली आहे. जाधव यांनी पुढे बोलताना असेही सूचक विधान केले की, “ज्यांच्यावर कोणत्याही आंदोलनात पोलिसांची केस नाही किंवा पक्षासाठी मोठे योगदान नाही, अशा लोकांना मोठी पदे मिळत असतील, तर त्यामागे शंका येणे स्वाभाविक आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे पक्षातील नव्या नेतृत्वावर अप्रत्यक्षपणे टीका केल्याचे बोलले जात आहे.
नीलम गोऱ्हे यांचे विधान आणि प्रतापराव जाधव यांचा इशारा यामुळे शिवसेनेतील अंतर्गत नाराजी पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली आहे. सध्याच्या राजकीय घडामोडींमध्ये शिवसेना शिंदे गटात जुन्या आणि नव्या नेत्यांमध्ये संघर्ष सुरू असल्याचे चित्र आहे. जुने शिवसैनिक आणि आंदोलन करणारे नेते बाजूला राहत आहेत. नव्या नेत्यांना मोठी पदे मिळत आहेत. यामुळे अनेक जुने नेते नाराज असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहेत.
काय म्हणाल्या होत्या गोऱ्हे?
उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत दोन मर्सिडीज कार दिल्याशिवाय कोणतेही मोठे पद देण्यात आले नाही. ही वस्तुस्थिती आहे,” असा आरोप गोऱ्हे यांनी केला होता. बाळासाहेब ठाकरे जिवंत असताना त्यांनी सर्वत्र लक्ष ठेवले. त्यांच्यानंतर शिवसेनेची घसरण सुरू झाली. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले तेव्हा शिवसैनिकांना खूप आनंद झाला. कारण आम्हाला वाटले की बाळासाहेब ठाकरेंच्या मुलाला हे पद मिळाले आहे. पण लवकरच गोष्टी समोर येऊ लागल्या. आमदारांनाही बैठका नाकारण्यात आल्या,” असे नीलम गोऱ्हे म्हणाल्या होत्या.
या प्रकरणावरून शिवसेनेतील अंतर्गत वाद आता उघड होताना दिसत आहे. नीलम गोऱ्हे यांचे विधान हास्यविनोदात असले तरी त्याने पक्षातील “पैशाच्या राजकारणा”ची गंभीर बाजू समोर आणली आहे. आता या वादावर पक्षप्रमुख एकनाथ शिंदे काय भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. शिवसेना नेत्यांमध्ये सुरू असलेली ही जुनी-नवी लढाई आगामी लोकसभा निवडणुकीत पक्षाच्या एकजुटीवर परिणाम करणार का, हे येत्या काही दिवसांत स्पष्ट होईल.