
उद्धव ठाकरे आणि शिंदे गटातील राजकीय संघर्ष आणखी तीव्र झाला आहे. शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी उद्धव ठाकरेंवर थेट आरोप करत त्यांना महाराष्ट्राच्या राजकारणातून संपवण्याची शपथ घेतली आहे.
महाराष्ट्राचं सततचं बदलत जाणार राजकारण हे आता नित्याचा झालाय. मात्र दरवेळी वेगळा झटका बसने हेही स्वाभाविकच आहे. महाराष्ट्राचे राजकारण म्हणजे सतत बदलणाऱ्या समीकरणांचे अखाडे. सत्तांतर, बंडखोरी, आणि निष्ठांतर यामुळे येथे राजकीय नाट्य रंगत असते. सध्या राज्यात शिवसेनेच्या दोन गटांमधील संघर्ष, भाजपची डावपेचात्मक रणनीती, आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील फूट यामुळे महाराष्ट्राच्या सत्तासमीकरणात मोठी उलथापालथ होत आहे. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला जणू काही कुणाची नजरच लागली आहे. एकापाठोपाठ एक निष्ठावान कार्यकर्ते ठाकरे गटाला रामराम ठोकून एकनाथ शिंदे यांच्या गटात प्रवेश करत आहेत, त्यामुळे पक्षाच्या भविष्यासंदर्भात नवे प्रश्न निर्माण झाले आहेत. पुढील काही महिने महाराष्ट्राच्या राजकारणासाठी निर्णायक ठरणार आहेत.
महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या जो काही रणकंदन सुरू आहे, त्यात शिवसेना शिंदे गटाच्या एका नेत्याने थेट उद्धव ठाकरेंना ‘उद्ध्वस्त’ करण्याची शपथ घेतली आहे. शिवसेना सोडून गेलेल्या आणि शिंदे गटात सामील झालेल्या अनेक नेत्यांनी आधीही उद्धव ठाकरेंवर घणाघात केले आहेत, पण ही टीका करणारे रामदास कदम यांनी ज्या शब्दांत ठाकरेंच्या नेतृत्वावर टीका केली आहे, ती नक्कीच धक्कादायक आहे. त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, ‘मी उद्धव ठाकरेंना संपवणारच. अन्यथा माझं नाव रामदास कदम नाही’.

ठाकरे विरुद्ध कदम
नुकत्याच झालेल्या नगरपंचायतीतील बदलांमुळे ठाकरे गटाला जबरदस्त हादरा बसला आहे. तब्बल 14 नगरसेवकांनी उद्धव ठाकरेंचा गट सोडून शिंदे गटात प्रवेश केला. हे ऑपरेशन फत्ते करताच रामदास कदम आणि गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी उद्धव ठाकरेंच्या भूमिकेवर थेट हल्लाबोल केला. उद्धव ठाकरेंनी माझ्या मुलाच्या राजकीय कारकीर्दीचा बळी द्यायचा प्रयत्न केला. पण आता मीच त्यांना राजकारणातून हद्दपार करणार, असे जळजळीत शब्द कदम यांनी उच्चारले.
रामदास कदम यांच्या या घणाघाती वक्तव्याने महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ माजली आहे. राजकीय विरोध असतो, पण थेट असा ‘उद्ध्वस्त’ करण्याचा निर्धार करणे, ही महाराष्ट्राच्या राजकीय परंपरेत दुर्मिळ बाब आहे. ठाकरेंचा राजकीय पाया हलवण्यासाठी कदमांनी जी भूमिका घेतली आहे, ती भविष्यात मोठी राजकीय उलथापालथ घडवू शकते.
बाळासाहेबांची शिवसेना कुठे
रामदास कदमांनी उद्धव ठाकरेंना केवळ टीकेचे लक्ष्य केले नाही, तर त्यांना ‘नीच राजकारण करणारा नेता’ असे संबोधले. ‘या जगात असा एकही पक्षप्रमुख नसेल, जो आपल्या पक्षातील आमदाराला संपवण्याचा विचार करेल, पण उद्धव ठाकरे यांच्यासारखा खालच्या पातळीला गेलेला नेता दुसरा कोणीही नाही,’ असे जहरी आरोप त्यांनी केले.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या काळात कधीही शिवसेनेत अशी परिस्थिती नव्हती, असा दावा करत कदम यांनी उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. ती शिवसेना ही बाळासाहेबांची खरी शिवसेना होती, पण उद्धव ठाकरेंनी तिची संपत्ती आपल्या फायद्यासाठी वापरली आणि शेवटी पक्षाचा चक्काचूर केला, अशी घणाघाती टीका त्यांनी केली.
राजकीय कोंडी
उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वावर पक्षांतर्गतच मोठ्या प्रमाणात असंतोष आहे. त्यांच्या नेतृत्वावर शिंदे गटाकडून सातत्याने टीका होत आहे, पण आता त्यांच्या गटातील नेते आणि कार्यकर्तेही ठाकरेंना सोडून जात आहेत. हा घटनाक्रम पाहता उद्धव ठाकरे स्वतःला सावरू शकतील का, हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.
रामदास कदम यांचे वक्तव्य म्हणजे राजकीय रणधुमाळीची नांदी आहे. उद्धव ठाकरे यांना राजकीय पटलावरून नामशेष करण्याचा निर्धार शिंदे गटाने केला आहे. आता पुढील काही दिवसांत महाराष्ट्राच्या राजकारणात आणखी काही धक्कादायक घटना घडू शकतात.