
महाराष्ट्राचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होत आहे. या अर्थसंकल्पात सामान्य जनतेच्या हितासाठी निर्णय घेण्यात येतील, असा विश्वास मंत्री आशिष जयस्वाल यांनी व्यक्त केला.
महाराष्ट्र राज्याच्या विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होत आहे. संपूर्ण राज्याचे लक्ष या अर्थसंकल्पाकडे लागले आहे. केंद्र सरकारने यंदा लोककल्याणकारी आणि सर्वसामान्य जनतेच्या हिताचा अर्थसंकल्प सादर केला आहे. त्या धर्तीवर राज्य सरकारही जनतेला दिलासा देणारा, आश्वासक आणि समृद्धीचा मार्ग दाखवणारा अर्थसंकल्प सादर करणार, असा विश्वास अर्थ राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी व्यक्त केला आहे.
विधानसभा निवडणुकीत प्रचंड बहुमत महाराष्ट्राच्या जनतेने महायुतीला दिलं. त्यामुळे जनतेचा विश्वास महायुती सरकारवर आहे. जी आश्वासने आम्ही जनतेला दिली आहेत, ती या अर्थसंकल्पातून टप्प्याटप्प्याने पूर्ण करणार आहोत. त्यातील सामान्य जनतेच्या अपेक्षा पूर्ण करणार आहोत. ज्या पद्धतीने गेल्या अडीच वर्षात विकासकामे करून आम्ही लोकांची मने जिंकली, त्याच पद्धतीने कामे करून या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून जनतेच्या हृदयात आपले स्थान कायम ठेवू, असे आशिष जयस्वाल म्हणाले.

रोजगार निर्मितीला गती
राज्यात विविध क्षेत्रांसाठी नवीन महामंडळे स्थापन करण्यात आली आहेत. त्यामार्फत मोठ्या प्रमाणावर रोजगारनिर्मिती होणार आहे. लघु आणि मध्यम उद्योगांना चालना देण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे. नवीन महामंडळांच्या माध्यमातून शेतकरी, महिला, युवक आणि मागासवर्गीय घटकांना आर्थिक पाठबळ मिळेल. राज्यातील जनतेसाठी महत्त्वाकांक्षी योजना आणि सामाजिक विकासावर भर देणारा हा अर्थसंकल्प असेल, असे आशिष जयस्वाल यांनी सांगितले.
मागील वर्षी सुरू करण्यात आलेली लाडकी बहीण योजना यशस्वी ठरली आहे. लाखो महिलांना आर्थिक मदत मिळाल्यामुळे त्यांना दिलासा मिळाला आहे. महिलांच्या आर्थिक स्वावलंबनासाठी ही योजना प्रभावी ठरली असल्याचे जयस्वाल यांनी सांगितले.
सामान्य माणसासाठी अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आली आहे. सामान्य माणूस हा महाराष्ट्र सरकारच्या योजना आणि निर्णयांचा केंद्रबिंदू राहणार आहे. राज्य सरकार लोकहिताची बांधिलकी पाळूनच अर्थसंकल्प सादर करेल, असा विश्वास आशिष जयस्वाल यांनी व्यक्त केला.
जनतेच्या आशा वाढल्या
राज्यातील शेतकरी, महिला, बेरोजगार युवक आणि गोरगरीब जनतेसाठी या अर्थसंकल्पातून मोठी घोषणा होईल, अशी आशा व्यक्त केली जात आहे. केंद्र सरकारच्या अर्थसंकल्पात सामान्य नागरिकांसाठी अनेक योजना जाहीर झाल्या आहेत. त्या योजनांना पूरक आणि राज्याच्या गरजा लक्षात घेऊनच महाराष्ट्राचा अर्थसंकल्प तयार करण्यात येत आहे.
राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन पुढील काही दिवस चालणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सरकार जनहिताचे निर्णय घेणार, अशी अपेक्षा नागरिकांमध्ये आहे. राज्यभरातून या अर्थसंकल्पाकडून मोठ्या अपेक्षा आहेत. आता सर्वांच्या नजरा राज्याच्या अर्थसंकल्पाकडे लागल्या आहेत.