
वाळू माफियांवर लगाम कसण्यासाठी मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे जीवतोड परिश्रम घेत आहेत. परंतु त्यांच्या या प्रयत्नांना यवतमाळातील एका वादग्रस्त लोकप्रतिनिधीनं सुरूंग लावला आहे. या लोकप्रतिनिधीनं पोलिसांच्या मदतीनं वसुली सुरू केली आहे. त्याचं टार्गेटही काही अधिकाऱ्यांना देण्यात आलं आहे.
प्रचंड मोठा व्याप असलेल्या यवतमाळ जिल्ह्यांमध्ये वाळू माफियांवर डोकं वर काढलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे वाळू माफियांची नांगी ठेचण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. पूर्व विदर्भात तर पोलिस आणि महसूल विभागानं माफियांच्या नाकात पाणी घुसवलं आहे. मात्र यवतमाळ जिल्ह्यात एका वादग्रस्त लोकप्रतिनिधीनं मुख्यमंत्री अन् महसूल मंत्र्यांच्या प्रयत्नांना सुरुंग लावला आहे. पुसद, दिग्रस, दारव्हा, घाटंजी या भागानं वेढलेल्या एका परिसरात वाळू तस्करांनी सध्या उच्छाद मांडला आहे. या माफियांच्या मुसक्या आवळण्याऐवजी या लोकप्रतिनिधीनं त्यांना आपला खिसा भरण्याचं माध्यम बनविलं आहे.
पश्चिम विदर्भातील यवतमाळ जिल्हा कापूस उत्पादकांचं क्षेत्र. गेल्या काही वर्षांत या जिल्ह्यात सर्वाधिक शेतकरी आत्महत्या झाल्या. पंतप्रधान बनण्यापूर्वी व पंतप्रधान बनल्यानंतरही अनेकदा नरेंद्र मोदी यवतमाळ जिल्ह्यात येऊन गेले. परंतु यवतमाळच्या भाग्याची रेषा आजही जशीच्या तशीच आहे. त्यामुळंच अलीकडच्या लोकसभा निवडणुकीत मतदारांनी महायुतीकडं पाठ फिरवली. विधानसभा निवडणुकीत मात्र मतदारांनी अनेकांना तारलं. निवडणुकीनंतर राज्यात महायुतीचं सरकार सत्तारूढ झालं. यवतमाळ जिल्ह्यातून एक नव्हे तर तीन आमदारांना मंत्रिपद मिळालं. दोन कॅबिनेट व एक राज्यमंत्री अशी तीन पदं यवतमाळ जिल्ह्याच्या वाट्याल्या आली आहे. त्यामुळं आता यवतमाळचा विकास होणार असं मानलं जात होतं. यवतमाळातील गुन्हेगारी, माफिया राज संपणार असं सांगण्यात येत होतं. परंतु तसं होताना दिसत नाही.

Maharashtra Budget Session : विरोधी पक्षनेत्याच्या खुर्चीवरून गोंधळ
सामान्यांची कंबर ‘तोडू’ नका
महायुतीचं सरकार आल्यापासून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे स्वच्छ, प्रामाणिक व शीस्तबद्ध प्रतिमा तयार करण्याचा प्रयत्न करीत आहे. सेटिंग लावणाऱ्या ओएसडींनाही त्यांनी घरचा रस्ता दाखविला आहे. परंतु यवतमाळ जिल्ह्यातील एका लोकप्रतिनिधीनं वाळू माफियांना आशीर्वाद प्रदान केला आहे. या माफियांना अभय देण्यासाठी आणि त्यांच्याकडून दक्षिणा वसूल करण्याची जबाबदारी या लोकप्रतिनिधीनं काही पोलिस अधिकाऱ्यांना दिली आहे. अर्थात या दक्षिणेतील काही प्रसाद संबंधित अधिकाऱ्यांनाही मिळणार आहे. वाळुच्या तस्करीमुळं सामान्यांच्या घराचं स्वप्न भंगतं असं खुद्द महसूल मंत्री चंद्रखेशर बावनकुळे यांनी नमूद केलं आहे. त्यामुळं सरकारच्या नीतीला आव्हान देत हा लोकप्रिनिधी सामान्यांची स्वप्नच ‘तोडत’ असल्याचं दिसत आहे.
राज्यातील महायुतीचं सरकार अडचणीत आणण्यासाठी अनेकांचे प्रयत्न सुरू आहेत. धनंजय मुंडे, माणिकराव कोकाटे, योगेश कदम यांच्यावरून सरकारवर आधीच आरोप होत आहेत. अशात यवतमाळ जिल्ह्यातील लोकप्रतिनिधीकडून आपला खिसा गरम करण्यासाठी सुरू झालेला प्रकार धक्कादायक मानला जात आहे. अनेक दिवसांच्या विश्रांतीनंतर भाग्य फळफळल्यानं हा लोकप्रतिनिधी आपला खर्चपाणी काढण्यासाठी हा प्रकार करीत असल्याची चर्चा यवतमाळ जिल्ह्यात आहे. महायुती सरकारच्या कडक धोरणांना सुरूंग लावणाऱ्या या लोकप्रतिनिधीला वेळीच आवर घालणे गरजेचे आहे. तीन तीन मंत्री असलेल्या यवतमाळ जिल्ह्यातील नेत्यांनी योग्य सुगावा लागला तर त्यांना ‘चोर की दाढी में तिनका’ लगेच सापडेल असं सांगण्यात येत आहे.