
हसन मुश्रीफ यांनी वाशिम जिल्ह्याच्या पालकमंत्रीपद सोडल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. या निर्णयामुळे महायुतीतील अंतर्गत संघर्ष आणि सत्तासमीकरणांचे नवे नाट्य उघड झाले आहे.
महायुती सरकारमधील राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री हसन मुश्रीफ यांनी अचानक वाशिम जिल्ह्याच्या पालकमंत्रीपद दिला आहे. या अनपेक्षित घटनेमुळे महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. महत्त्वाचे आर्थिक निर्णय घेतले जात असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या काळातच मुश्रीफ यांनी हा निर्णय घेतल्याने त्यामागे वेगळे राजकीय गणित असल्याची चर्चा सुरू झाली आहे.
वाशिम जिल्ह्यात बंजारा समाजाचे मोठे वर्चस्व असताना आणि जिल्ह्याच्या जबाबदारीसाठी संजय राठोड किंवा इंद्रनील नाईक यांचे नाव चर्चेत असताना, सर्वांना धक्का देत महायुती सरकारने हसन मुश्रीफ यांना ही जबाबदारी दिली होती. मात्र, आता लांबचा प्रवास शक्य नसल्याचे कारण पुढे करत त्यांनी या पदाचा त्याग केला आहे. या निर्णयाने सरकारच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

Mahayuti : देवाभाऊ मंत्र्यांना म्हणाले; चांगलं ‘बिहेव्ह‘ करा
पद सोडण्याचा बहाणा
हसन मुश्रीफ यांचा मतदारसंघ आणि वाशिम जिल्हा यांच्यात मोठे भौगोलिक अंतर आहे. मात्र, ही बाब आधीच माहीत असताना त्यांना पालकमंत्री करण्यात आले. आता प्रवासाचा मुद्दा पुढे करत पद सोडणे म्हणजे केवळ राजकीय नाट्य आहे, असे राजकीय तज्ज्ञांचे मत आहे. हा राजीनामा महायुतीतील अंतर्गत संघर्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटांतर्गत मतभेदांचे स्पष्ट संकेत देत आहे.
नवा पालकमंत्री कोण
हसन मुश्रीफ यांच्या निर्णयानंतर वाशिम जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदासाठी नवे नाव ठरवण्याची घाई महायुती सरकारला लागली आहे. शेजारील यवतमाळ जिल्ह्याचे आमदार इंद्रनील नाईक यांना वाशिमची जबाबदारी मिळावी, अशी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची मागणी आहे. मात्र, महायुतीतील सत्ता समीकरणे पाहता दत्ता भरणे यांनाही ही जबाबदारी मिळू शकते.
निर्णयामागे मोठे गुपित
महायुती सरकारमध्ये सुरू असलेल्या गोंधळाचा फटका थेट वाशिम जिल्ह्याच्या विकासाला बसण्याची शक्यता आहे. पालकमंत्री बदलण्याच्या खेळामुळे महत्त्वाचे निर्णय आणि विकासकामे थांबण्याचा धोका निर्माण झाला आहे. एकीकडे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असताना अशा प्रकारचा अनपेक्षित निर्णय घेणे म्हणजे जिल्ह्याच्या प्रशासकीय व्यवस्थेची थट्टा केल्यासारखे आहे. हसन मुश्रीफ यांनी दिलेले कारण अनेकांना पटलेले नाही. महायुतीतील अंतर्गत मतभेद, पक्षांतर्गत असंतोष आणि काही दबावगटांचा प्रभाव यामुळेच त्यांनी पद सोडल्याचे बोलले जात आहे. हा निर्णय महायुतीच्या अस्थिरतेचे द्योतक आहे आणि भविष्यात याचे गंभीर परिणाम होऊ शकतात.
महायुतीसाठी नवा पेच
सद्य घडामोडींमुळे महायुती सरकार पुन्हा एकदा अडचणीत आले आहे. सरकारची कार्यपद्धती, निर्णयक्षमता आणि अंतर्गत संघर्ष यामुळे राज्याच्या राजकारणात अनिश्चिततेचे वातावरण तयार झाले आहे. हसन मुश्रीफ यांचा निर्णय हा केवळ एका जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाचा विषय नसून, महायुतीतील अंतर्गत कलहाचे स्पष्ट संकेत आहेत. आता वाशिम जिल्ह्याला नवा पालकमंत्री मिळेल, पण त्यासाठी किती राजकीय सौदेबाजी होईल, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.