महाराष्ट्र

Chandrapur : देवाभाऊंच्या विभागात नणंद-जाऊचे भांडण

Author

चंद्रपूरमध्ये महावितरण आणि पोलिस विभाग यांच्यात जोरदार संघर्ष पाहायला मिळाला. थकीत वीज बिलामुळे महावितरणने पोलिसांची वीज कापली, तर पोलिसांनी सूड उगवत महावितरण अधिकाऱ्यांच्या गाड्यांचे चालान फाडले

चंद्रपुरात नुकताच एक भन्नाट प्रकार घडला, जिथे मुख्यमंत्र्यांच्या दोन खात्यांनी एकमेकांविरोधात चांगलाच ‘पॉवर’ खेळ रंगवला. महावितरणने थकीत वीज बिलाच्या मुद्द्यावर पोलिसांचे कनेक्शन तोडले, तर पोलिसांनीही आपल्या स्टाईलने उत्तर देत महावितरण अधिकाऱ्यांच्या गाड्यांचे धडाधड चालान फाडले. हा प्रकार म्हणजे अक्षरशः ‘नळावरच्या दोन बायकांच्या भांडणासारखं रंगत गेलं’. ‘तू माझ्या नळावर पाणी भरू दिलं नाही, तर मी तुझ्या बादलीला लाथ मारणारच’ अगदी असंच.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जबाबदारीत असलेल्या दोन महत्त्वाच्या खात्यांनी चंद्रपूरमध्ये एकमेकांवर कुरघोडी करायला सुरुवात केली. महावितरणने पोलिस विभागाला 139 कनेक्शन्स दिले होते, आणि त्यांच्यावर तब्बल 81 लाख रुपयांचं वीज बिल थकीत होतं. महावितरणने कितीही आठवण करून दिली, तरी हे बिल भरण्याचं कुणीही मनावर घेत नव्हतं. त्यामुळे शेवटी त्यांनी गिरनार चौकातील पोलिस वसाहतीला पाणीपुरवठा करणाऱ्या पंप हाऊसचं कनेक्शन तोडलं. आणि मग सुरू झाला खरा तमाशा.

Pratibha Dhanorkar : संघर्षाची साखळी तोडत नेतृत्त्वाच्या शिखरावर

सूडबुद्धीचा खेळ सुरू

वीज तोडल्यानंतर पोलिसांचा पारा चढला. ‘तुम्ही आमची वीज कापता? ठीक आहे, मग आम्हीही तुमच्यावर कारवाई करतो’ अशा थाटात त्यांनी वाहतूक पोलिसांचे पथक महावितरणच्या कार्यालयाबाहेर उभं केलं. बाहेर पडणाऱ्या प्रत्येक अधिकाऱ्याला थांबवून गाडी तपासली जाऊ लागली. अगदी हेडलाइटपासून सीटबेल्टपर्यंत चेकिंग सुरू झालं आणि कोणत्याही कारणावरून चालान फाडायला सुरुवात झाली. महावितरणचे अधिकारी याला ‘बदला’ म्हणत असले, तरी पोलिसांचं म्हणणं वेगळंच होतं आम्ही नेहमीच अशा मोहिमा राबवतो.

Amol Mitkari : दिवाळीच्या दिव्यांमध्ये हरवलेला बाबांची आठवण

दोन बायकांचं भांडण

गल्लीतल्या दोन बायकांच्या भांडणासारखं अगदी हे प्रकरण झालं. एकीने नळावर पाणी भरू दिलं नाही, तर दुसरीने तिच्या बादलीलाच लाथ मारली. इथेही तसंच झालं. महावितरणने वीज कापली, तर पोलिसांनीही ‘आता बघतोच’ म्हणत सारा राडा केला. सरकारी यंत्रणांनी नियमांप्रमाणे काम करायचं सोडून ‘तुला दाखवतोच’ मोडमध्ये जाऊन सूड उगवायला सुरुवात केली.

पोलिसांचा रोष पाहून महावितरणने तोडलेलं कनेक्शन पुन्हा जोडून दिलं. म्हणजे, वीज आली. मात्र थकीत बिल मात्र अजूनही भरलेलं नाही. म्हणजे हे भांडण फक्त दिखावा होता का? सरकारी विभागांना नियमांपेक्षा ‘मी मोठा की तू?’ हे सिद्ध करण्यातच जास्त रस असतो, हे पुन्हा एकदा सिद्ध झालं. आता यातून शिकायचं काय? सरकारी कार्यालयं चालतात, पण कसं, ते कोणालाच माहित नसतं. एकमेकांवर सूड उगवण्यात दोन्ही विभागांना मजा आली, पण वीज बिलाचा विषय तसाच राहिला.

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!