
महिला सक्षमीकरणाचा बुलंद आवाज आणि सामाजिक न्यायासाठी लढणाऱ्या निर्भीड नेत्या म्हणजे नीलम गोऱ्हे. त्यांच्या संघर्षमय वाटचालीने हजारो महिलांना नवी उमेद आणि दिशा दिली आहे.
महाराष्ट्राच्या राजकारणात एक कणखर, अभ्यासू आणि निर्भय नेतृत्व म्हणून नीलम गोऱ्हे यांची ओळख आहे. महिलांच्या सशक्तीकरणासाठी आणि सामाजिक न्यायासाठी त्यांचा लढा नेहमीच आघाडीवर राहिला आहे. विधान परिषदेच्या उपसभापती पदावर असताना त्यांनी महिलांविरोधातील अन्यायाला वाचा फोडत प्रभावी धोरणं राबवली. त्यांची राजकीय वाटचाल ही संघर्षमय असूनही अत्यंत प्रेरणादायी आहे.
महिला दिनाच्या निमित्ताने, त्यांच्या सामाजिक आणि राजकीय योगदानाचा गौरव करण्याची ही योग्य संधी आहे. एका डॉक्टरपासून राजकीय नेत्या होण्यापर्यंतचा त्यांचा प्रवास केवळ विलक्षणच नाही, तर तो अनेक महिलांसाठी प्रेरणादायी आहे.

स्त्रियांसाठी अढळ पाठिंबा
नीलम गोऱ्हे यांनी केवळ राजकारणासाठी नव्हे, तर सामाजिक बांधिलकीतून आपली ओळख निर्माण केली. त्यांनी स्त्री आधार केंद्र या संस्थेची स्थापना करून महिला सक्षमीकरणाची चळवळ अधिक व्यापक केली. घरगुती हिंसाचार, लैंगिक शोषण, हुंडाबळी यांसारख्या गंभीर प्रश्नांवर त्यांनी ठोस उपाययोजना सुचवल्या आणि प्रशासनाला उत्तरदायी ठेवलं. गुजरात आणि महाराष्ट्रातील भूकंपग्रस्त, दुष्काळग्रस्त आणि बॉम्बस्फोटातील पीडित कुटुंबीयांना मदत करत त्यांनी संवेदनशील नेतृत्वाचं उदाहरण दिलं. महिलांना न्याय मिळावा म्हणून त्यांनी हजारो तक्रारींवर पाठपुरावा केला आणि सरकारला कठोर कायदे अमलात आणण्यास भाग पाडलं.
शिवसेनेमध्ये प्रवेश केल्यानंतर नीलम गोऱ्हे यांनी स्वतःचं वेगळं स्थान निर्माण केलं. त्यांची अभ्यासू वृत्ती, निर्भीडपणा आणि संघटन कौशल्य यामुळे त्या शिवसेनेच्या महिला नेतृत्वाचा एक मजबूत स्तंभ बनल्या. त्यांनी पक्षाच्या माध्यमातून महिलांच्या प्रश्नांवर लढा देत, त्यांच्या सुरक्षिततेसाठी धोरणात्मक बदल घडवून आणले. पुणे जिल्हा संपर्क प्रमुख म्हणून काम करताना त्यांनी अनेक युवक आणि महिलांना संघटित करून त्यांना राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात पुढे आणण्याचं काम केलं.
विधानपरिषदेत दमदार नेतृत्व
नीलम गोऱ्हे चार वेळा विधान परिषद निवडणुकीत विजयी झाल्या. त्या महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापती पदावर प्रभावीपणे कार्यरत आहेत. त्यांनी महिलांविरोधातील गुन्ह्यांच्या तक्रारींसाठी तातडीने कृती करण्याच्या सूचना दिल्या. महिला पोलिस स्टेशनची संख्या वाढवण्यासाठी आणि लैंगिक अत्याचारविरोधी कायद्यांची अंमलबजावणी कठोर करण्यासाठी त्यांनी सातत्याने पाठपुरावा केला. महिला सबलीकरण, दलित हक्क, पंचायत राज यासारख्या क्षेत्रांत त्यांनी योगदान देत, सामाजिक न्यायासाठी झुंजार नेतृत्व केलं. महिला सुरक्षेसाठी आयटी धोरण, बालसंवर्धन गृहातील सुधारणा आणि तृतीयपंथीयांसाठी आरक्षण या मुद्द्यांवर त्यांनी ठोस भूमिका घेतली.
नीलम गोऱ्हे यांच्या वक्तृत्वात आक्रमकता आणि सुस्पष्टता आहे. प्रवक्त्या म्हणून त्यांचं योगदान लक्षणीय आहे. त्या प्रत्येक मुद्द्यावर अभ्यासपूर्वक आणि ठोस भूमिका मांडतात.त्यांच्या राजकीय प्रवासात त्यांनी अनेक पक्षांमध्ये काम केलं, पण शिवसेनेत आल्यावर त्यांनी आपली ओळख अधिक प्रभावीपणे निर्माण केली. महिलांसाठी लढणाऱ्या नेत्या म्हणून त्यांना महाराष्ट्रभर ओळखलं जातं.
महिला सक्षमीकरणाचा लढा
नीलम गोऱ्हे यांनी महिला सक्षमीकरण हे केवळ शब्दांत नाही, तर प्रत्यक्ष कृतीत आणण्यासाठी उचललेली पावलं ही ऐतिहासिक ठरली आहेत. त्यांनी विधवा महिलांसाठी विशेष योजना आणण्यास भाग पाडलं, महिलांच्या रोजगारासाठी लघुउद्योगांना चालना दिली आणि बचतगटांच्या माध्यमातून आर्थिक स्वावलंबन वाढवण्यासाठी सरकारला धोरण बदलण्यास प्रवृत्त केलं. नीलम गोऱ्हे या महाराष्ट्राच्या राजकारणात एक महत्त्वाचा स्तंभ आहेत. महिलांचे हक्क, सामाजिक न्याय आणि लोकशाहीसाठी त्यांनी घेतलेली भूमिका भविष्यात आणखी ठोस परिणाम घडवणारी ठरेल. त्यांच्या कणखर नेतृत्वामुळे त्या महिला दिनी केवळ प्रेरणास्थान नव्हे, तर संघर्षशील नेत्या म्हणून गौरविल्या जात आहेत.