
महाराष्ट्राच्या अस्मितेचा बुलंद आवाज आणि परखड भूमिका मांडणारे राज ठाकरे यांनी मनसेच्या 19 व्या वर्धापनदिनानिमित्त कार्यकर्त्यांना नव्या संघर्षाची दिशा दिली. शिवतीर्थावर गुढीपाडव्याला होणाऱ्या मेळाव्यासाठी त्यांनी रणशिंग फुंकत महाराष्ट्राच्या भविष्यासाठी ठाम निर्धार व्यक्त केला.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या 19 व्या वर्धापनदिनानिमित्त राज ठाकरे यांनी आपल्या महाराष्ट्र सैनिकांना उत्साहाने संबोधित करत पक्षाच्या भविष्यासाठी महत्त्वाचे संदेश दिले. चिंचवडमधील रामकृष्ण मोरे सभागृहात झालेल्या या कार्यक्रमात त्यांनी महाराष्ट्राच्या राजकीय परिस्थितीवर रोखठोक भूमिका मांडली आणि पक्षाच्या पुढील वाटचालीसाठी महत्त्वाच्या घोषणा केल्या.
राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने गेल्या एकोणविस वर्षांत संघर्ष, विजय आणि काही आव्हानं अनुभवल्या. मात्र, आजही हा पक्ष ठाम उभा आहे, कारण मनसेचं राजकारण हे केवळ सत्तेसाठी नाही, तर महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या जे सत्ताकारण सुरु आहे, त्यावर त्यांनी थेट प्रहार केला. सत्ता आणि मतांसाठी समाजात तेढ निर्माण करणाऱ्या प्रवृत्तींचा त्यांनी तीव्र शब्दांत समाचार घेतला.

जिजाऊंच्या प्रेरणेचा मंत्र
राज ठाकरे यांनी जागतिक महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर महिलांच्या योगदानाचा गौरव करताना राजमाता जिजाऊ यांचे उदाहरण दिले. जिजाऊंनी लहानपणापासूनच स्वराज्याची संकल्पना रुजवली आणि शिवरायांना स्वराज्य स्थापनेसाठी घडवलं. आजच्या महिलांनीही जिजाऊंप्रमाणे धैर्याने आणि स्वाभिमानाने वाटचाल करावी, असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला. महिला सबलीकरण केवळ घोषणांपुरते मर्यादित न राहता ते प्रत्यक्षात उतरले पाहिजे, असे मत त्यांनी मांडले. महाराष्ट्राच्या परंपरेत कर्तृत्ववान स्त्रियांची मोठी परंपरा आहे, पण सध्याच्या राजकीय वातावरणात हे मूल्य बाजूला पडत चालले आहे. जिजाऊ, अहिल्याबाई होळकर, सावित्रीबाई फुले यांच्यासारख्या कर्तृत्ववान स्त्रियांपासून प्रेरणा घेत पुढे जाण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली.
संघटनेची बांधणी
राज ठाकरे यांनी पक्षातील कार्यकर्त्यांना संघटनेची नवी दिशा देण्याचा निर्धार व्यक्त केला. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने जय-पराजय पाहिला, पण पक्षातील माणसं का एकत्र राहतात? याचं गमक त्यांनी स्पष्ट केलं. कारण हा पक्ष सत्तेसाठी नाही, तर महाराष्ट्राच्या हितासाठी उभा आहे. राजकीय फेरीवाल्यांवर टीका करताना त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितलं की, मनसेमध्ये पक्षाशी प्रामाणिक असलेले कार्यकर्तेच टिकतील. पक्षातील प्रत्येक पदाधिकाऱ्याची जबाबदारी ठरवली जाईल, आणि कामचुकारपणा सहन केला जाणार नाही. दर पंधरा दिवसांनी कामाचा आढावा घेतला जाईल, आणि जो जबाबदारी पार पाडणार नाही, त्याला पदावर राहू दिले जाणार नाही.
गुढीपाडव्याच्या मेळाव्यासाठी घोषणा
राज ठाकरे यांनी गंगा स्वच्छतेच्या मुद्द्यावरून सरकारच्या निष्क्रियतेवरही टोला लगावला. राजीव गांधी यांच्यापासून गंगा स्वच्छ करण्याची घोषणा ऐकतोय, पण आजही ती तशीच आहे,असं म्हणत त्यांनी केंद्र सरकारच्या योजनांवर टीका केली. श्रद्धा आणि अंधश्रद्धेतील फरक ओळखायला हवा आणि महाराष्ट्र सैनिकांनी वैज्ञानिक दृष्टिकोन स्वीकारायला हवा, असा महत्त्वाचा संदेश त्यांनी दिला. ३० मार्चला गुढीपाडव्याच्या दिवशी शिवतीर्थावर मोठा मेळावा होणार असून, तेथे मनसेचा पुढील संघर्षाचा निर्धार स्पष्ट केला जाईल. गुढीपाडव्याला दांडपट्टा फिरवणारच, असं ठामपणे सांगत त्यांनी आगामी रणनितीचा इशारा दिला.
इतिहासाची जाणीव
कार्यक्रमात प्रसिद्ध विचारवंत सदानंद मोरे यांनी मराठी जनतेला इतिहासाची जाणीव करून दिली. मराठ्यांचा इतिहास हा अभिमानाचा आहे, पण आज आपण तो विसरत चाललो आहोत. जदुनाथ सरकार यांनी म्हटल्याप्रमाणे, मराठी माणसाने काही चुका सुधारल्या तर पुढील शंभर वर्षांत तो जगातील सर्वात वैभवशाली समाज ठरेल. राज ठाकरे यांनीही यावर भर देत,आपल्या पूर्वजांनी जे कर्तृत्व गाजवलं, ते विसरू नका. आपण पुन्हा संघटित झालो, तर महाराष्ट्राचं वैभव पुन्हा उभं राहील, असा सशक्त संदेश दिला.
मनसेचा उत्साह
वर्धापनदिन सोहळ्यात मनसे कार्यकर्त्यांचा जोश आणि आत्मविश्वास स्पष्ट दिसत होता. राज ठाकरे यांनी आगामी काळातील पक्षाच्या धोरणांची रूपरेषा आखली. आणि कार्यकर्त्यांना नव्या उमेदीने कामाला लागण्याचे आवाहन केले. गुढीपाडव्याच्या मेळाव्यात मनसेचा पुढील मार्ग अधिक ठळक होणार आहे. महाराष्ट्राच्या अस्मितेचा झेंडा उंचावत पुन्हा नव्या जोमाने पुढे जाण्याचा निर्धार राज ठाकरे आणि मनसेने व्यक्त केला आहे