
नागपुरात औरंगजेबाच्या कबरीवरून उसळलेल्या हिंदू-मुस्लिम वादाने हिंसक वळण घेतले आहे. वाढत्या तणावामुळे पोलिसांनी संपूर्ण विदर्भ आणि मुंबईत हाय अलर्ट जारी केला आहे.
नागपुरात औरंगजेबाच्या कबरीवरून उसळलेल्या वादाने शहरातील वातावरण चांगलेच तापले आहे. महाल परिसरात हिंदू आणि मुस्लिम गटांमध्ये तणाव वाढल्याने मोठ्या प्रमाणावर हिंसाचार उफाळला. दगडफेक, जाळपोळ आणि रस्त्यांवरील आंदोलनामुळे संपूर्ण परिसर अशांततेच्या विळख्यात सापडला आहे. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी मोठा बंदोबस्त तैनात केली गेली आहे.
नागपुरातील या दंगलीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, नागपूरचे पालकमंत्री आणि वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची तातडीची बैठक पार पडली. या बैठकीत दंगेखोरांविरोधात कठोर कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले. राज्य सरकारने पोलिसांना संपूर्ण अधिकार दिले आहे. समाजकंटकांना शोधून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

प्रशासनाचा बंदोबस्त
नागपुरात उसळलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील अनेक ठिकाणी सतर्कतेचे आदेश देण्यात आले आहेत. विशेषतः पश्चिम विदर्भातील अकोला, खामगाव, अंजनगाव सुर्जी, अचलपूर आणि मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर तसेच मुंबईतील काही संवेदनशील भागांमध्ये पोलिसांना हाय अलर्टवर ठेवण्यात आले आहे.
घटनेच्या पार्श्वभूमीवर वेगवेगळ्या राजकीय नेत्यांनी प्रतिक्रिया द्यायला सुरुवात केली आहे. महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी या हिंसाचारावर तीव्र संताप व्यक्त केला आहे. राज्यातील इतर शहरांमध्येही हा मुद्दा पेटण्याची शक्यता लक्षात घेऊन पोलिसांना सतर्कतेचे आदेश देण्यात आले आहेत.
Nagpur Riot : दंगलीनंतर सायबर सेलचे पूर्ण महाराष्ट्रावर बारीक लक्ष
हिंसाचाराचा वाढता भडका
संपूर्ण महाराष्ट्रात औरंगजेबाच्या कबरीच्या मुद्द्यावरून वातावरण तापले असतानाच नागपुरात या वादाने गंभीर रूप घेतले. दोन गट आमने-सामने आल्याने महाल परिसर रणभूमी बनला. जोरदार घोषणाबाजी सुरू असतानाच अचानक दगडफेक सुरू झाली आणि काही वेळातच जाळपोळ झाली. वाहनांना आग लावण्यात आली, तर काही दुकाने उद्ध्वस्त करण्यात आली.
पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला, मात्र संतप्त जमावाने त्यांच्यावरच हल्ला केला. पोलिसांनी लाठीचार्ज करत जमाव पांगवण्याचा प्रयत्न केला आहे. तरीही, संध्याकाळपर्यंत हिंसाचाराचा भडका अधिकच वाढला.
Nagpur : उपराजधानीत हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर फडणवीसांची तातडीने बैठक
फडणवीसांचे नागपूरकरांना आवाहन
हिंसाचारानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूरकरांना शांततेचे आवाहन केले आहे. नागपूर हे शांतताप्रिय शहर आहे. नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये आणि प्रशासनाला सहकार्य करावे,” असे त्यांनी स्पष्ट केले. मुख्यमंत्री कार्यालयानेही सतत पोलीस प्रशासनाशी संपर्क ठेवत परिस्थितीवर लक्ष ठेवल्याचे सांगितले आहे.
नागपुरात उसळलेल्या या हिंसाचारानंतर मोठ्या प्रमाणावर धरपकड सुरू झाली आहे. पोलिसांनी गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांचा शोध घेण्यासाठी विशेष पथके तैनात केली आहेत. नागपूर शहरातील तणाव शांत करण्यासाठी पोलीस प्रशासन पूर्ण ताकदीने काम करत आहे. तरीही, परिस्थिती नियंत्रणात येईपर्यंत नागरिकांनी सतर्क राहण्याची गरज आहे.