अमरावतीत अवैध हुक्का पार्लर आणि एमडी, गांजा तस्करी उघडकीस आली आहे. पोलिसांनी अनेक आरोपींना अटक करून मोठ्या प्रमाणात ड्रग्ज जप्त केले.
महाराष्ट्राच्या गल्लीपासून ते विधानसभेच्या सभागृहापर्यंत आजकाल एकाच विषयाची चर्चा रंगत आहे. एमडी, कोकेन आणि अमली पदार्थांच्या तस्करीची गुंतागुंतीची साखळी. राज्यभरात तरुण पिढी या विषारी जाळ्यात अडकत चालली आहे. सामाजिक स्वास्थ्यावर त्याचा घातक परिणाम होत आहे. गेल्या काही महिन्यांत अमली पदार्थ सेवन व तस्करीच्या घटनांनी कायदा-सुव्यवस्थेचे आव्हान अधिक तीव्र केले आहे. पोलिसांनी अनेक ठिकाणी छापेमारी करून आरोपींना पकडले, मात्र न्यायालयीन प्रक्रियेनंतर बहुतेक आरोपी जामिनावर सुटून पुन्हा त्याच व्यवसायात उतरतात.
गुन्हेगारीच्या या साखळीला तोडण्याचा पोलिसांचा प्रयत्न सुरू असतानाच अमरावतीत दोन महत्त्वाच्या कारवायांनी पुन्हा एकदा धोक्याचा इशारा दिला आहे. दोन दिवसांपूर्वी अमरावती गुन्हे शाखेच्या पथकाने रॅलिज प्लॉट परिसरातील एका घराच्या छतावर चालणाऱ्या अवैध हुक्का पार्लरवर धाड टाकली. काफिला नावाने ओळखला जाणारा हा पार्लर प्रमेंद्र ओमप्रकाश शर्मा हा काही दिवसांपासून चालवत होता. मध्यरात्रीपर्यंत येथे तरुणांची गर्दी वाढून परिसरातील व्यापाऱ्यांसह रहिवाशांच्या नाराजीचे कारण ठरत होती.
सामाजिक जागरूकतेचे महत्त्व
धाडीत एमडी (मेफेड्रॉन), गांजा आणि विदेशी मद्य जप्त करण्यात आले. याच दरम्यान, नागपुरी गेट पोलिसांनी सईद खान शरीफ खान या तस्कराला अटक केली. त्याच्याकडून 60.51 ग्रॅम एमडी जप्त झाले. ज्याची किंमत तब्बल 3 लाख 2 हजार रुपये आहे. या दोन कारवायांनी अमली पदार्थांचा शहरात वाढता प्रभाव उघडकीस आणला आहे. अमली पदार्थांच्या वाढत्या संकटाला आळा घालण्यासाठी शहर पोलीस आयुक्तालयाने ऑपरेशन वाईप आउट मोहीम सुरू केली आहे. 17 ऑगस्टपर्यंत जनजागृतीपर कार्यक्रमांच्या माध्यमातून नागरिकांना अमली पदार्थांचे धोके, कायदेशीर शिक्षा आणि पोलिसांना माहिती देण्याची प्रक्रिया समजावून सांगितली जात आहे.
गत आठ महिन्यांत शहरात सात ठिकाणी मोठ्या प्रमाणावर कारवाई करण्यात आली आहे. यात 105 आरोपींना अटक झाली असून, तब्बल 92 लाख रुपयांहून अधिक किमतीचे अमली पदार्थ जप्त झाले आहेत. ही आकडेवारीच परिस्थितीचे गांभीर्य दर्शवते. पोलिसांचे स्पष्ट आवाहन आहे की, कोणीही अमली पदार्थांचे सेवन करत असेल किंवा त्यांचा व्यापार करत असेल, तर नागरिकांनी तत्काळ हेल्पलाइनवर माहिती द्यावी. माहिती देणाऱ्याचे नाव पूर्णतः गुप्त ठेवले जाईल आणि योग्य ते बक्षीसही देण्यात येईल.सामाजिक घडामोडींवर सजग असलेल्या प्रत्येक नागरिकाचा सहभाग या लढ्यात महत्त्वाचा आहे. कारण ही केवळ कायदा-सुव्यवस्थेची समस्या नाही, तर एका पिढीचे भविष्य वाचवण्याची लढाई आहे. पोलिसांचे प्रयत्न आणि समाजाची जागरूकता एकत्र आल्यासच ड्रग्जमुक्त महाराष्ट्राचे स्वप्न प्रत्यक्षात उतरेल.
