
पावसाळी अधिवेशनात शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवरून राजकारण तापलं आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी बच्चू कडूंवर दुटप्पीपणाचा आरोप करत थेट घणाघात केला.
राज्यातील राजकारणात वाऱ्यांची दिशा बदलतेय. पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर, शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसारख्या जिव्हाळ्याच्या मुद्द्यावरून राजकीय नेत्यांमध्ये चांगलीच जुंपा रंगली आहे. शेतकऱ्यांचे नेहमीच समर्थन करणारे बच्चू कडू यांच्यावर आता सत्ताधारी भाजपचे बडे नेते आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी थेट दुटप्पीपणाचा आरोप केला आहे. बावनकुळे म्हणाले, कर्जमाफीवर आमची गंभीर आणि बांधिलकीची भूमिका आहे. मी स्वतः आणि आमच्या मंत्र्यांनी साडेचार तास मंत्रालयात बसून या प्रश्नावर सखोल चर्चा केली. लवकरच एक समिती गठीत होणार आहे. जी संपूर्ण महाराष्ट्रात फिरून खरी गरज असलेल्या शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी निश्चित करणार आहे. त्यांनी यावेळी दावा केला की, बच्चू कडूंनाही या समितीच्या संदर्भात लेखी पत्र दिलं आहे. सरकारचा संकल्प स्पष्ट आहे की शेतकऱ्यांना मदत करायचीच.
महसूल मंत्र्यांनी नुकतेच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या वक्तव्याला दुजोरा देत आर्थिक विषमतेच्या प्रश्नावर भाष्य केलं. राज्यात अजूनही काही भागात गरिब, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक राहतात. जे अजूनही योजनांपासून दूर आहेत. पंतप्रधान मोदींची ‘सर्वांसाठी घर’ योजना अशा नागरिकांपर्यंत पोहोचली पाहिजे. महसूल विभागानेही यासाठी पुढाकार घेतला आहे. कोणताही नागरिक योजनांपासून वंचित राहणार नाही, यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत, असंही बावनकुळे म्हणाले. त्यांनी सरकारच्या कामगिरीबद्दल समाधान व्यक्त करत सांगितलं की, योजनांची अंमलबजावणी चांगल्या पद्धतीने होत आहे. पक्ष आणि सरकार दोन्ही पातळ्यांवर ही जबाबदारी घेतली जात आहे.

पाऊस शेतकऱ्यांसाठी वरदान
राज्यात अनेक ठिकाणी समाधानकारक पावसामुळे शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंदाचे क्षण फुलले आहेत. विदर्भ, मराठवाडा आणि इतर भागांत सध्या पावसाची स्थिती चांगली आहे. पिकांना आवश्यक तेवढे पाणी मिळत आहे. बावनकुळे म्हणाले, सध्या पावसामुळे कोणताही मोठा नुकसानीचा धोका नाही. मात्र, काही भागात जर नुकसान झालं तरी सरकार त्यासाठी तत्काळ मदत करणार आहे. मात्र खत-बियाण्यांच्या तुटवड्यावर त्यांनी गंभीर चिंता व्यक्त केली. अमरावती आणि भंडारा जिल्ह्यांत साठ्याची पाहणी केली. काही ठिकाणी कृत्रिम तुटवडा निर्माण केला जात आहे. जिथे खरेच पुरवठा कमी आहे, तिथे सरकारने तो वेळेत भरून काढण्याची जबाबदारी घेतली आहे, असं स्पष्ट करत त्यांनी शेतकऱ्यांना आश्वासन दिलं.
कर्जमाफी ही एकच बाब नसून, शेतकऱ्यांच्या सर्वांगीण समस्यांवर उपाययोजना सुरू असल्याचं बावनकुळे यांनी सूचित केलं. एकीकडे बच्चू कडूंवर टीका करताना त्यांनी सत्तेतील पक्षांच्या गंभीर प्रयत्नांची आठवण करून दिली, तर दुसरीकडे योजनांपासून वंचित असलेल्या प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचण्याचं सरकारचं उद्दिष्ट ठामपणे मांडलं. राज्यात पावसाळी अधिवेशन तापत असताना, कर्जमाफीचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आलाय. आता पाहायचं एवढंच, की ही समिती प्रत्यक्षात किती लवकर कामाला लागते आणि शेतकऱ्यांच्या हाती नेमकं काय पडतं.
Yashomati Thakur : भाषेच्या मुद्द्यावर तोंडसुख घेणाऱ्यांची मर्यादा हरवतेय