महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी नागपूर जिल्ह्यातील दुय्यम निबंधक कार्यालयाची अचानक पाहणी केली. जिथे प्रशासनातील गंभीर त्रुटी उघडकीस आल्या.
महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची जोरदार तयारी सुरू आहे. सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने निवडणुकीचा मार्ग मोकळा झाल्याने प्रत्येक राजकीय पक्षाने कंबर कसली आहे. मोर्चेबांधणी, शक्तिप्रदर्शन, नेत्यांचे पक्षांतर आणि बैठकींचा सिलसिला जोरात सुरू आहे. या सगळ्या गडबडीत नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सावनेर तालुक्यातील दुय्यम निबंधक कार्यालयाला अचानक भेट देऊन प्रशासकीय कारभाराचा जणू एक्स-रेच काढला आहे. सावनेरव मधील या कार्यालयात बावनकुळे यांनी पाऊल टाकताच भोंगळ कारभार उघड झाला. दुय्यम निबंधक अधिकारी गायब, कर्मचाऱ्यांच्या हजेरी पुस्तिकेत नावे आणि स्वाक्षऱ्यांचा अभाव आणि ओळखपत्रांशिवाय कर्मचारी कार्यरत.
विशेष म्हणजे, कार्यालयाशी कसला संबंध नसलेल्या अनधिकृत व्यक्ती मोकाट फिरताना दिसल्या. या सगळ्या गोंधळामुळे उपस्थित नागरिकांनी आपल्या तक्रारींचा पाढाच मांडला. सेवेची निकृष्ट गुणवत्ता, पारदर्शकतेचा अभाव आणि कर्मचाऱ्यांची उद्धट वागणूक याबाबत तीव्र नाराजी व्यक्त झाली. या गंभीर परिस्थितीची दखल घेत बावनकुळे यांनी तातडीने पावले उचलली आहे. त्यांनी राज्याच्या नोंदणी महानिरीक्षकांशी फोनवरून संपर्क साधून चौकशीचे आदेश दिले. याशिवाय, जिल्हाधिकारी आणि स्थानिक पोलीस उपअधीक्षकांना नागरिकांच्या तक्रारी गांभीर्याने घेऊन त्वरित कारवाई करण्याचे निर्देश दिले.
दुर्दैवी अपघाताची शोककळा
भेटीवेळी आमदार आशिष देशमुख नागपूर ग्रामीण जिल्हाध्यक्ष मनोहरराव कुंभारे, भाजपा युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष पियुष बुरडे आणि इतर मान्यवरांसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. बावनकुळे यांच्या या धडक कारवाईमुळे प्रशासकीय यंत्रणेत खळबळ उडाली असून, कार्यालयातील गैरप्रकारांना आळा बसण्याची आशा निर्माण झाली आहे. नागपूर जिल्ह्यातील धापेवाडा येथे वीज पडून झालेल्या एका हृदयद्रावक दुर्घटनेने संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे. या दुर्दैवी अपघातात वंदना प्रकाश पाटील, त्यांचा मुलगा ओम प्रकाश पाटील आणि शेतातील मदतनीस निर्मला रामचंद्र पराते यांचा मृत्यू झाला. ही घटना इतकी दुखद होती की, परिसरातील प्रत्येकाच्या मनाला चटका लावून गेली.
दुर्घटनेची माहिती मिळताच महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी तातडीने मृतांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. त्यांनी कुटुंबीयांचे सांत्वन करत मृतांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. या भेटीवेळी त्यांच्यासोबत नागपूर ग्रामीण जिल्हाध्यक्ष मनोहर कुंभारे, प्रदेश कार्यकारिणी सदस्य डॉ. राजवी पोद्दार, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांच्यासह अनेक स्थानिक नागरिक उपस्थित होते. बावनकुळे यांनी कुटुंबीयांना धीर दिला आणि शासकीय स्तरावर सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले. नागपुरात एकीकडे निवडणुकीची धामधूम आणि दुसरीकडे प्रशासकीय कारभारातील उणिवा आणि दु:खद घटना यामुळे सध्या वातावरण तणावपूर्ण आहे. बावनकुळे यांच्या या भेटीमुळे प्रशासकीय यंत्रणेला खडबडून जाग येण्याची अपेक्षा आहे.
