नागपूरच्या कोराडी रोडवरील मॅक्स हॉस्पिटल जवळ शालेय बसचा भीषण अपघात झाला. ज्यात आठ मुले जखमी झाली आणि एकाचा मृत्यू झाला.
12 सप्टेंबर रोजी नागपूरच्या कोराडी रोडवरील मॅक्स हॉस्पिटलजवळ एक भयानक घटना घडली, ज्याने संपूर्ण शहराला हादरवून सोडले. दोन शालेय बसची जोरदार धडक होऊन झालेल्या अपघाताने परिसरात खळबळ उडाली. या भीषण दुर्घटनेत आठ शालेय विद्यार्थी जखमी झाले. तर एका विद्यार्थ्याचा आणि चालकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. मुलांच्या किंकाळ्यांनी आकाश दणाणले. पालकांच्या काळजात धडकी भरली. रस्त्यावर जमलेल्या संतप्त नागरिकांनी प्रशासनाच्या नाकर्तेपणाविरुद्ध आवाज उठवला आणि हा अपघात म्हणजे केवळ एक घटना नसून, दीर्घकाळ चाललेल्या बेफिकिरीचा परिणाम आहे, असा आरोप केला.
घटनास्थळी गोंधळाचे वातावरण पसरले. संतप्त जमावाने रस्त्यावर उतरून ओरिएन्ट कंपनी मुर्दाबादच्या घोषणा देत आंदोलन छेडले. कोराडी रोडवरील रस्त्याच्या कामातील हलगर्जीपणा आणि वाहतूक सुरक्षेकडे दुर्लक्ष यामुळे हा अपघात घडल्याचा नागरिकांचा दावा आहे. रस्त्यावर जमलेल्या गर्दीमुळे वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आणि परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, रस्त्याच्या दुरुस्तीच्या कामातील ढिसाळपणा आणि प्रशासनाच्या बेपर्वाईमुळे हा अपघात घडला. गेल्या काही महिन्यांपासून या मार्गावर सातत्याने अपघात होत असून, प्रशासन मात्र याकडे कानाडोळा करत आहे. या दुर्घटनेनंतर काँग्रेस आमदार विकास ठाकरे यांनी प्रशासनाच्या हलगर्जीपणावर जोरदार टीका केली.
रस्त्याच्या कामाची दिरंगाई
छिंदवाडा रोडवरील उड्डाणपुलावर झालेला हा अपघात अत्यंत दुखद आहे. जखमी विद्यार्थ्यांवर रुग्णालयात उपचार सुरू असून, मी स्वतः डॉक्टरांशी बोलून त्यांच्या प्रकृतीची माहिती घेतली आहे, असे ठाकरे यांनी सांगितले. त्यांनी भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या संथ कामकाजावरही बोट ठेवले. या रस्त्याच्या दुरुस्तीचे काम अत्यंत धिम्या गतीने सुरू आहे. यामुळे नागरिकांना आणि विशेषतः शालेय विद्यार्थ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. मी संबंधित अधिकाऱ्यांना काम तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत, असे ठाकरे यांनी ठणकावून सांगितले. कोराडी रोडवरील रस्त्याच्या कामात सातत्याने होणारी दिरंगाई आणि सुरक्षेकडे दुर्लक्ष यामुळे नागरिकांचा संताप शिगेला पोहोचला आहे.
अपघात म्हणजे प्रशासन आणि कंत्राटदार कंपन्यांच्या बेपर्वाईचा कळस आहे, असे एका स्थानिक नागरिकाने संतप्तपणे सांगितले. गेल्या काही महिन्यांपासून या मार्गावर वारंवार अपघात होत असून, अनेकांचे जीव गेले आहेत. तरीही राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि स्थानिक प्रशासन यांच्याकडून कोणतीही ठोस कारवाई होताना दिसत नाही. या अपघातानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि जमावाला पांगवण्यासाठी बंदोबस्त वाढवला. मात्र, संतप्त नागरिकांनी आमच्या मुलांचे जीव धोक्यात घालणाऱ्यांवर कठोर कारवाई झालीच पाहिजे, अशी मागणी लावून धरली.या घटनेने नागपूरच्या रस्त्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आणला आहे.
पालकांमध्ये भीती आणि संतापाचे वातावरण पसरले असून, प्रशासन आणि पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडून आता कोणती भूमिका घेतली जाणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
