महाराष्ट्र मराठा आरक्षणाचा वाद अद्यापही शमलेला दिसत नाही आहे. शासकीय निर्णयानंतरही यावर वाद सुरूच आहे.
महाराष्ट्राच्या राजकीय रंगमंचावर सध्या मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आहे. गेल्या काही महिन्यांपासून मराठा समाजाच्या आरक्षणाचा वाद तापत असताना, आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईच्या आझाद मैदानावर पाच दिवसांचे आमरण उपोषण करत आपली मागणी लावून धरली. त्यांच्या या लढ्याला यश मिळाले असून, शासनाने हैदराबाद गॅझेट लागू करण्याचे मान्य केले आहे. मात्र, या यशानंतरही मराठा समाजातील काही प्रश्न अनुत्तरित राहिले आहेत. याच पार्श्वभूमीवर, नागपूरचे राजे मुधोजी भोसले यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे एक वेगळीच मागणी लावून धरली आहे. मराठा समाजाला ओबीसी गटातून नव्हे, तर ‘मराठा’ म्हणून स्वतंत्र आरक्षण द्यावे, अशी आग्रही मागणी त्यांनी पत्राद्वारे केली आहे. मुधोजी भोसले यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेतली आणि आपल्या मागणीचे पत्र सादर केले.
पत्रात त्यांनी मराठा समाजाच्या हक्कांसाठी एक वेगळा दृष्टिकोन मांडला आहे. मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला पाठिंबा देताना भोसले यांनी एक महत्त्वाचा मुद्दा उपस्थित केला आहे. ओबीसीतून आरक्षण मिळाल्याने मराठा समाजाच्या सर्वांगीण हिताला खीळ बसेल का? त्यांच्या मते, जरांगे यांनी मराठ्यांना ओबीसी गटातून आरक्षण मिळवून दिले, पण यातून मराठा समाजाला नेमके काय साध्य झाले? मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये 58 लाख कुणबी नोंदी सापडल्या असल्या, तरी त्यात त्रुटी असल्याचा दावा भोसले यांनी केला आहे. कागदपत्रांच्या पूर्ततेत अडचणी येण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली आहे. ज्यामुळे आरक्षणाचा लाभ मर्यादित मराठ्यांपर्यंतच पोहोचेल.
भविष्याचे हक्क सुरक्षित करा
मराठा समाजाच्या व्यापक हितासाठी भोसले यांनी स्वतंत्र आरक्षणाचा पर्याय पुढे आणला आहे. त्यांच्या पत्रातून एक गोष्ट स्पष्ट होते, मराठा समाजाला एकसंध ठेवण्यासाठी आणि सर्वांना लाभ मिळवून देण्यासाठी ‘मराठा’ हीच ओळख केंद्रस्थानी ठेवली पाहिजे. मराठवाड्यातील 58 लाख कुणबी नोंदींना लाभ मिळाला तरी, उर्वरित अंदाजे 2.5 कोटी मराठ्यांचे भवितव्य काय, असा थेट सवाल त्यांनी मुख्यमंत्र्यांना विचारला आहे. ओबीसी गटातून आरक्षण देण्याऐवजी मराठा समाजाला स्वतंत्रपणे आरक्षण मिळाले, तर हा पेच सुटेल आणि संपूर्ण महाराष्ट्रातील मराठ्यांना त्याचा लाभ मिळेल, असे भोसले यांचे मत आहे.हा मुद्दा मराठा समाजाच्या एकतेसाठी महत्त्वाचा आहे, असे भोसले यांनी पत्रात नमूद केले आहे.
मराठा समाजाला एकाच छत्राखाली आणण्यासाठी आणि त्यांच्या हक्कांचे रक्षण करण्यासाठी स्वतंत्र आरक्षण हा एकमेव पर्याय आहे, असे त्यांचे ठाम मत आहे. जरांगे यांच्या आंदोलनाने मराठा समाजाला एक नवी दिशा दिली. पण भोसले यांच्या मते, स्वतंत्र आरक्षणाची मागणी पूर्ण झाल्यास मराठ्यांच्या भविष्याला खऱ्या अर्थाने बळ मिळेल. या पत्राने मराठा आरक्षणाच्या चर्चेला नवे वळण मिळाले आहे. एकीकडे जरांगे यांच्या आंदोलनाने सरकारला काही मागण्या मान्य करण्यास भाग पाडले, तर दुसरीकडे भोसले यांच्या स्वतंत्र आरक्षणाच्या मागणीने नव्या वादाला तोंड फोडले आहे. आता मुख्यमंत्री फडणवीस आणि शासन यावर काय भूमिका घेते, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. मराठा समाजाच्या या लढ्याला अंतिम यश कधी आणि कसे मिळेल, हे येणारा काळच ठरवेल.
Sudhakar Kohale : विधानसभा गेली, आता पदवीधर मतदारसंघात मारणार बाजी?
