
लोकशाहीच्या रक्षणासाठी संघर्ष करणाऱ्या लोकतंत्र सेनानींना योग्य सन्मान मिळावा, यासाठी भाजपा नेते आणि आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी सरकारकडे ठोस मागणी केली आहे.
आणीबाणीच्या काळात भारताच्या लोकशाहीच्या रक्षणासाठी संघर्ष करणाऱ्या लोकतंत्र सेनानींना अधिक सन्मान मिळावा, यासाठी भाजपा नेते आणि बल्लारपूर विधानसभा क्षेत्राचे आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी राज्य सरकारकडे ठोस मागणी केली आहे. त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिलेल्या निवेदनाद्वारे, या सेनानींच्या सन्मान निधीत भरीव वाढ करण्याची विनंती केली आहे.
सुधीर मुनगंटीवार यांनी आपल्या निवेदनात स्पष्ट केले आहे की, 1975 च्या आणीबाणीच्या काळात देशातील असंख्य राष्ट्रभक्तांनी प्रचंड हालअपेष्टा सोसत लोकशाही वाचवण्यासाठी लढा दिला. या सेनानींनी तुरुंगवास पत्करला, कुटुंबीयांपासून दूर राहण्याची वेदना सहन केली आणि आपल्या प्राणांचीही पर्वा न करता देशासाठी संघर्ष केला. त्यामुळे आज लोकशाही टिकून आहे. अशा सेनानींना आर्थिक मदत आणि सन्मान देणे हे केवळ सरकारचे कर्तव्यच नाही, तर ही देशप्रेमींच्या त्यागाची योग्य दखलही ठरेल.

महाराष्ट्रातही निर्णय घ्यावा
सुधीर मुनगंटीवार यांनी राजस्थान सरकारने घेतलेल्या निर्णयाचा दाखला देत, महाराष्ट्र सरकारनेही तत्काळ पावले उचलावीत, अशी मागणी केली आहे. राजस्थानमध्ये लोकतंत्र सेनानी सन्मान निधी म्हणून पेन्शन वीस हजार रुपये करण्यात आली आहे. आरोग्य चिकित्सा सहाय्य म्हणून चार हजार रुपये दरमहा दिले जातात. महाराष्ट्रात सध्या 4 हजार 103 लोकतंत्र सेनानी सन्मान निधीस पात्र आहेत. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारनेही सन्मान निधीत वाढ करावी, अशी त्यांनी आग्रही मागणी केली आहे. लोकशाहीच्या रक्षणासाठी लढलेल्या या सेनानींचा त्याग आणि संघर्ष अजरामर आहे. आज अनेक लोकतंत्र सेनानी वृद्ध झाले आहेत. त्यांना आर्थिक व आरोग्यसंबंधी मदतीची गरज आहे. त्यांच्या योगदानाची योग्य दखल घेऊन सरकारने त्यांना भरीव आर्थिक मदत करणे आवश्यक आहे.
लोकतंत्र सेनानींसाठी बांधिलकी
सुधीर मुनगंटीवार यांनी नेहमीच राष्ट्रहित आणि लोकशाहीसाठी कार्य केले आहे. या मुद्द्यावरही त्यांनी आपल्या ठाम भूमिकेची पुनरावृत्ती करत, लोकतंत्र सेनानींसाठी सरकारने त्वरित निर्णय घ्यावा, अशी ठाम मागणी केली आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रातील अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले गेले असून, लोकशाही बळकट करण्यासाठी त्यांनी सतत योगदान दिले आहे. राज्यभरातील लोकतंत्र सेनानी आणि त्यांचे कुटुंबीय सुधीर मुनगंटीवार यांच्या या पुढाकाराचे स्वागत करत आहेत. या मागणीला समाजातील विविध घटकांकडूनही सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे.राज्य सरकारनेही लवकरच योग्य निर्णय घेण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.