भंडाऱ्याचे माजी आमदार चरण वाघमारे यांनी राम मंदिर चोरीप्रकरणी निष्पक्ष चौकशीची मागणी केली. दोषींना राजकीय संरक्षण देऊ नये, अशी सरकारकडे मागणी.
अयोध्या, जिथे राम मंदिर उभारण्यासाठी लढाई झाली, वादविवाद झाले, कोर्ट-कचेऱ्या, आंदोलने आणि भावनांचा महासागर ओलांडला त्या पवित्र भूमीवरच चोरीचा डाग लागल्याची बातमी समोर आल्याने संपूर्ण देशभरातील रामभक्तांच्या मनात खळबळ उडाली आहे. प्रभू श्रीरामांच्या मंदिरातच सुरक्षेची त्रुटी? ही केवळ एक घटना नाही, तर श्रद्धेवर झालेला विश्वासघात आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे भंडारा जिल्हाध्यक्ष व माजी आमदार चरण वाघमारे यांनी या प्रकरणी आवाज उठवला आहे. त्यांनी स्पष्ट शब्दांत मागणी केली की, या चोरीप्रकरणाची निष्पक्ष, पारदर्शक आणि तातडीने चौकशी व्हावी आणि दोषींवर कठोर कारवाई करावी. राम आणि हिंदुत्वाच्या नावाने निवडणुकीत मते मागणारे नेते आता कुठे गेले? असा प्रश्न विचारत वाघमारे यांनी राजकीय मौनावरही टिका केली.
निष्पक्ष चौकशी गरजेची
चरण वाघमारे म्हणाले की, श्रद्धा ही फक्त घोषणेबाजी नाही, ती जबाबदारी आहे. मंदिर हे कोट्यवधी भारतीयांच्या भावनांचे केंद्र आहे. येथे सुरक्षेची गंभीर चूक झाली असेल तर त्याला कोणताही राजकीय आश्रय मिळता कामा नये. खरंच, हे प्रकरण फक्त चोरीचे नाही. हे मंदिराच्या व्यवस्थापन, सुरक्षा यंत्रणा आणि त्यावर नजर ठेवणाऱ्या यंत्रणांच्या कार्यपद्धतीवर मोठा प्रश्नचिन्ह आहे. ज्या मंदिरासाठी देशभरात उत्साहाचे वातावरण होते, त्या मंदिरातच अशी घटना घडणे हे अनेकांसाठी धक्कादायक आहे. रामभक्तांच्या मनात निर्माण झालेली अस्वस्थता आणि संताप याकडे दुर्लक्ष करता येणार नाही.
खरे दोषी शोधा
चरण वाघमारे यांच्या मागणीप्रमाणे, सरकारने तातडीने सखोल चौकशी करून सत्य जनतेसमोर आणले पाहिजे. दोषी कोणीही असो, त्याला कायद्याच्या कठोर कचाट्यात आणावे. याचबरोबर भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी मंदिर परिसराची सुरक्षा व्यवस्था अधिक सक्षम, आधुनिक आणि अपवादरहित करण्याची गरज आहे. राम मंदिर हे केवळ एक धार्मिक स्थळ नाही, तर भारताच्या सांस्कृतिक आणि आध्यात्मिक ओळखीचे प्रतीक आहे. त्याची पावित्र्यता आणि सुरक्षितता अबाधित ठेवणे हे सर्वांची जबाबदारी आहे. आता केवळ शब्द नको, कृती हवी. रामभक्तांची भावना दुखावू नये, यासाठी सरकारला ठोस पावले उचलावी लागतील.
