
गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर महावितरणने घरगुती ग्राहकांसाठी मोठी खुशखबर दिली आहे. राज्यातील विजेच्या दरात मोठा बदल करत, एक एप्रिलपासून नवे वीजदर लागू करण्याचा आदेश जारी करण्यात आला आहे.
राज्यातील विजेच्या दरात मोठा बदल करत महावितरणने घरगुती ग्राहकांसाठी एक एप्रिलपासून नवे वीजदर लागू करण्याचा आदेश जारी केला आहे. महाराष्ट्र राज्य वीज नियामक आयोगाकडे सादर केलेल्या प्रस्तावानुसार, घरगुती विजेच्या दरात 10 टक्क्यांनी कपात करण्यात आली आहे. हा निर्णय स्मार्ट मीटर असलेल्या ग्राहकांसाठी लागू होणार आहे. त्यामुळे त्यांना या कपातीचा थेट फायदा होणार आहे. महायुती सरकारच्या निवडणूक जाहीरनाम्यात वीज दर कपातीसंबंधी आश्वासन दिले होते, आणि याचा पहिला टप्पा आता प्रत्यक्षात आणण्यात आला आहे.

महावितरणच्या नव्या आदेशानुसार सकाळी 9 ते सायंकाळी 5 या वेळेत घरगुती विजेच्या वापरावर विशेष सवलत मिळणार आहे. आर्थिक वर्ष 2025-26 मध्ये प्रति युनिट 80 पैसे, 2026-27 मध्ये 85 पैसे, 2027-28 मध्ये 90 पैसे, 2028-29 मध्ये 95 पैसे आणि 2029-30 मध्ये एक रुपया सवलत दिली जाणार आहे. यामुळे राज्यातील लाखो ग्राहकांना दिलासा मिळणार आहे.
https://thelokhitlive.com/important-decision-of-maha-metro-to-prevent-crowd-during-narendra-modi-visit-in-nagpur-district/
मोफत टीओडी मीटर
महावितरणने स्पष्ट केले आहे की, ही सवलत केवळ स्मार्ट मीटर असलेल्या ग्राहकांसाठी लागू असेल. त्यामुळे भविष्यात स्मार्ट मीटर बसवणे अनिवार्य होण्याची शक्यता आहे. कोल्हापूर जिल्हा इरिगेशन फेडरेशनचे अध्यक्ष विक्रांत पाटील यांनी सांगितले की, ग्राहकांकडून वाढलेल्या मागणीनंतर महावितरणला वीजदर कपातीच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
राज्यातील घरगुती वीज ग्राहकांसाठी मोठी सुविधा म्हणून महावितरणकडून मोफत टाइम ऑफ डे (टीओडी) मीटर बसवले जाणार आहेत. यामुळे ग्राहकांना कोणत्या वेळेस किती वीज वापरली गेली याची अचूक माहिती मिळेल, तसेच टीओडी सवलतीचा लाभही घेता येईल.
पाच वर्षे वीजदर स्थिर
मार्च महिन्याच्या अखेरीस चालू आणि थकीत वीजबिल भरण्याच्या सोयीसाठी महावितरणने सुट्टीच्या दिवशीही भरणा केंद्र सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. शनिवार ते सोमवार या कालावधीत कार्यालयीन वेळेत ही केंद्रे कार्यरत असतील. तसेच, थकबाकीदार ग्राहकांनी थकीत बिलाचा भरणा न केल्यास त्यांचा वीजपुरवठा खंडित केला जाणार असल्याचे महावितरणने स्पष्ट केले आहे.महायुती सरकारने आपल्या पहिल्या अर्थसंकल्पातच विजेच्या दरात कपातीची घोषणा केली होती.
निर्णयाच्या अंमलबजावणीसह, राज्यात पुढील पाच वर्षे विजेचे दर स्थिर राहतील, असे महावितरणकडून सांगण्यात आले आहे.महावितरणच्या या महत्त्वपूर्ण निर्णयामुळे वीज ग्राहकांना दिलासा मिळणार आहे. राज्यातील विजेच्या वापरावर सकारात्मक परिणाम होण्याची शक्यता आहे. स्मार्ट मीटर आणि टीओडी मीटरच्या माध्यमातून अधिक योजनाबद्ध वीज वापर करण्यास ग्राहकांना प्रोत्साहन मिळेल, ज्यामुळे दीर्घकालीन ऊर्जा बचतीस चालना मिळेल.गुढीपाडव्याच्या निमित्ताने या निर्णयाची अंमलबजावणी होत असल्याने, ग्राहकांना आर्थिक सुट मिळणार आहे.