वाघाच्या दहशतीने शेतकरी भयभीत, प्रशासनाच्या हलगर्जीपणावर ग्रामस्थ आक्रमक. नाना पटोलेंच्या हस्तक्षेपानंतर कारवाईला वेग.
भंडारा जिल्ह्यातील लाखांदूर तालुक्यात वाघाच्या हल्ल्यात एका शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने संपूर्ण परिसरात संतापाची लाट उसळली आहे. रविवारी संध्याकाळी खैरी/पट शिवारातील शेतात सिंचनासाठी गेलेल्या डाकराम गोपीचंद देशमुख (40) यांच्यावर वाघाने प्राणघातक हल्ला केला. या घटनेमुळे गावकऱ्यांमध्ये भीती आणि असंतोष पसरला आहे. वन विभागाच्या दुर्लक्षामुळे ही दुर्घटना घडल्याचा आरोप करत शेकडो ग्रामस्थांनी तीव्र निदर्शने केली.
गेल्या काही महिन्यांपासून लाखांदूर तालुक्यातील गवराला, डांभेविरली, टेंभरी, विहिरगाव, असोला आणि आसपासच्या गावांमध्ये वाघ मुक्त संचार करत असल्याच्या वारंवार तक्रारी येत होत्या. अनेक पाळीव जनावरांचे बळी गेले आहेत. ग्रामस्थांनी वेळोवेळी वन विभागाला सावध केले होते. मात्र, ठोस उपाययोजना न झाल्याने अखेर एका शेतकऱ्याचा बळी गेला. प्रशासनाच्या निष्काळजीपणावर संतप्त ग्रामस्थांनी आवाज उठवला आणि तातडीने कारवाईची मागणी केली.
प्रशासनाला कठोर आदेश
घटनेची माहिती मिळताच आमदार नाना पटोले यांनी तातडीने खैरी/पट गावाला भेट दिली. शेतकऱ्याच्या कुटुंबीयांचे सांत्वन करत त्यांनी वन विभाग आणि जिल्हा प्रशासनाच्या निष्क्रियतेवर तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली. शेतकऱ्यांच्या सुरक्षेसाठी तातडीने उपाययोजना करण्याचे निर्देश त्यांनी दिले. तसेच, पीडित कुटुंबाला 10 लाखांची आर्थिक मदत व एका सदस्याला सरकारी नोकरी मिळावी, यासाठी पाठपुरावा करणार असल्याचे जाहीर केले.
नाना पटोले यांच्या हस्तक्षेपानंतर प्रशासन खडबडून जागे झाले. दोन वेगवेगळ्या पथकांची स्थापना करून वाघाला जेरबंद करण्यासाठी विशेष मोहिम राबवली जाणार असल्याचे वन विभागाने स्पष्ट केले. तसेच, शेतकऱ्यांच्या सुरक्षेसाठी गस्त वाढवण्याचे आदेश देण्यात आले.
न्यायासाठी मैदानात
शेतकऱ्यांचे जीव धोक्यात टाकणाऱ्या या दुर्घटनेची जबाबदारी प्रशासनाने स्वीकारावी, अशी मागणी करत आमदार पटोले यांनी संबंधित अधिकाऱ्यांची झाडाझडती घेतली. वाघ पकडण्याची प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण न केल्यास अधिकाऱ्यांवर कठोर कारवाईचा इशारा दिला. त्यांच्या ठोस भूमिकेमुळे ग्रामस्थांना दिलासा मिळाला असून, या प्रकरणाचा योग्य तो पाठपुरावा करण्यात येणार आहे.
