
प्रदेशाध्यक्षपद मिळवल्यानंतर हर्षवर्धन सपकाळ यांनी महायुती सरकारवर टीका करण्याचा सपाटा लावला आहे. त्यांनी पुन्हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या घोषणेवरून सरकारवर निशाणा साधला आहे.
वीज बिलात 10 टक्के कपात करणार, असा मोठा गाजावाजा करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील जनतेला दिलासा देण्याचे नाटक केले. नंतर त्या घोषणेला मागे घेत जनतेला एप्रिल फुल बनवले, असा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे. जनतेच्या भावनांशी खेळ करून, निवडणूकपूर्वी आश्वासनांची खैरात करणाऱ्या भाजप युती सरकारने सत्ता मिळताच मागे फिरण्याची जुनी सवय कायम ठेवल्याची टीका त्यांनी केली.
टिळक भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना सपकाळ म्हणाले की, 28 मार्च रोजी खुद्द मुख्यमंत्री आणि ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 1 एप्रिलपासून राज्यातील वीज दरात 10 टक्के कपात केली जाईल अशी घोषणा केली. परंतु प्रत्यक्षात 1 एप्रिललाच महावितरणने वीज नियामक आयोगात याचिका दाखल करून ही दर कपात स्थगित केली. त्यामुळे हे सर्व पूर्वनियोजित ढोंग होते आणि सामान्य जनतेची चेष्टा करण्याचा प्रकार आहे. या प्रकारातून भाजप युती सरकारची निर्णय क्षमता, नियोजनशून्यता आणि फसव्या घोषणांची पारदर्शकता उघड झाली आहे, असे सपकाळ म्हणाले.

Devendra Fadnavis : न्याय व सुरक्षा मजबूत करण्याच्या दिशेने महाराष्ट्राचे निर्णायक पाऊल
स्मार्ट मीटरचा स्फोटक परिणाम
सपकाळ यांनी पुढे सांगितले की, राज्यातील जनतेवर स्मार्ट मीटरच्या माध्यमातून मोठा आर्थिक भार लादला जात आहे. या मीटरमुळे वीज बिल 30 ते 40 टक्क्यांनी वाढले आहे. गरीब आणि मध्यमवर्गीय ग्राहकांची आर्थिक कोंडी होत आहे. एकीकडे महागाईने होरपळणाऱ्या जनतेला दिलासा देण्याऐवजी, अधिकचे भार लादून फडणवीस सरकार जनतेची क्रूर थट्टा करत आहे, असा आरोप त्यांनी केला.
भाजप-शिवसेना युतीने निवडणुकीदरम्यान शेतकऱ्यांना हमीभाव, कर्जमाफी, लाडकी बहिण योजना अशा विविध आकर्षक घोषणा केल्या. मात्र सत्ता मिळाल्यानंतर या सर्व आश्वासनांपासून त्यांनी पाठी फिरवली. अर्थमंत्री अजित पवार यांनी 31 मार्चपर्यंत शेतकऱ्यांना कर्ज फेडा असे सांगत सरकारकडे निधी उपलब्ध नसल्याचे जाहीर केले. “हे म्हणजे शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्यासारखे आहे. सत्तेच्या लालसेपोटी दिलेली आश्वासने आता धुळीस मिळवली जात आहेत,” अशी खरमरीत टीका सपकाळ यांनी केली.
फसव्या घोषणांची खैरात
सपकाळ यांनी भाजप सरकारवर घोषणांची खैरात, अंमलबजावणीत फारकत, अशी टिका करत सांगितले की, कोणतेही आर्थिक नियोजन नसताना त्यांनी मोठमोठ्या वल्गना केल्या. मात्र सत्तेत आल्यानंतर प्रत्यक्ष कृतीत ते अपयशी ठरले. पैशाची सोय नाही हे माहिती असूनही, जनतेच्या भावना भडकवून मते मिळवण्यासाठी घोषणांचा स्फोट करणं ही फसवणूक नाही तर काय? असा सवाल त्यांनी केला.
हर्षवर्धन सपकाळ यांनी जनतेला आवाहन करत सांगितले की, या सरकारने वारंवार जनतेचा विश्वासघात केला आहे. त्यांच्या खोट्या घोषणा ओळखून भविष्यात योग्य निर्णय घेणे हेच शहाणपणाचे ठरेल. त्यांनी भाजप युती सरकारच्या धोरणांचा खरपूस समाचार घेत, जनतेच्या हितासाठी काँग्रेस पक्ष सतत सजग राहील, असा पुनरुच्चार केला.