
भारतीय जनता पक्षाने सहा एप्रिल रोजी आपला 46 स्थापना दिवस उत्साहात साजरा केला. या निमित्ताने नागपुरात भाजप कार्यालयाचे भूमिपूजन करण्यात आले
संघाच्या भूमीत भाजपचा स्थापना दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. या खास सोहळ्याला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी हजेरी लावली. भारतीय जनता पक्षाला 46 वर्षे पूर्ण झाली आहे. या निमित्ताने नागपुरातील नवीन कार्यालयाच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम पार पडला.जकारणात नेता आणि कार्यकर्त्यांमधील नाते हे फक्त संघटनात्मक नसून ते कौटुंबिक असले पाहिजे, असे स्पष्ट मत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केले.
उपराजधानी नागपूर येथे भारतीय जनता पक्षाच्या नवीन कार्यालयाच्या पायाभरणी समारंभात बोलतांना गडकरी म्हणाले, नेत्याने पक्ष आणि कार्यकर्त्यांना आपल्या कुटुंबासारखे मानले पाहिजे. जसे पालक आपल्या मुलांवर प्रेम करतात, तसेच नेत्यांनी आपल्या कार्यकर्त्यांवर प्रेम केले पाहिजे. त्यांच्या या विधानाने पक्षाच्या कार्यकर्त्यांना मोठी प्रेरणा मिळाली. या ऐतिहासिक क्षणी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, आमदार प्रवीण दटके आणि पक्षातील अनेक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

भाजपचा इतिहास
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की राष्ट्र प्रथम हे आमचे तत्व आहे. ही आमची विचारधारा आहे. 6 एप्रिल 1980 रोजी भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भाजपची स्थापना केली होती. सुरुवातीच्या काळात पक्षाला फार मोठे यश मिळाले नाही. 1984 मध्ये झालेल्या पहिल्या राष्ट्रीय निवडणुकीत भाजपला केवळ दोन जागा मिळाल्या होत्या. मात्र, अटलबिहारी वाजपेयी आणि लालकृष्ण अडवाणी यांच्या नेतृत्वाखाली पक्षाने सातत्याने प्रगती केली.
भाजपने नव्वदच्या दशकात आघाडी सरकारच्या माध्यमातून आपले अस्तित्व सिद्ध केले. त्यानंतर 2014 मध्ये नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली पक्षाने ऐतिहासिक बहुमत मिळवले आणि आजतागायत केंद्रात सत्तेत आहे. कार्यकर्त्यांचे महत्त्व अधोरेखित करताना गडकरी म्हणाले, नेत्यांसाठी पक्ष हे कुटुंबासारखे असते आणि कार्यकर्त्यांमुळेच पक्ष यशस्वी होतो. आज ज्या उंचीवर पक्ष आहे, त्यामागे असंख्य कार्यकर्त्यांचे समर्पण आणि त्याग आहे.
Harshwardhan Sapkal : कृषिमंत्र्यांवर काँग्रेसचा संतापाचा भडका
विरोधकांना प्रतिउत्तर
गडकरींनी विरोधकांनी भाजप आणि संघाच्या विरोधात पसरवलेल्या चुकीच्या माहितीवरही भाष्य केले. काँग्रेसने जनसंघ, भाजप आणि आरएसएसला चुकीच्या प्रकारे सादर करण्याचा प्रयत्न केला. मात्र, आम्ही या अफवांना प्रत्युत्तर दिले आणि आमचा पक्ष जातिवादी नाही, हे सिद्ध केले. आमचा पक्ष जात, धर्म यापलीकडे जाऊन देशाच्या विकासावर भर देतो. भाजप कार्यकर्ते हीच आमची ओळख आहे. कोणतीही व्यक्ती तिच्या जातीमुळे महान ठरत नाही, तर तिच्या कार्यामुळे ठरते, असेही त्यांनी स्पष्ट केले.