महाराष्ट्र

Nagpur : मेघे, ठाकूर यांच्याविरोधात नोटीस

Maharashtra Assembly Election : विजयाच्या गुलालावर कायद्याची छाया

Author

नागपूरच्या राजकीय रणभूमीत निवडणूकीनंतरही खळबळ उडवणाऱ्या घडामोडी घडत आहेत. हिंगणा व काटोलमधील भाजप आमदारांना न्यायालयाने नोटिस बजावली आहे.

महाराष्ट्र विधानसभा निवडणूकीनंतर नागपूर जिल्ह्याच्या राजकारणात एक मोठा वळण घेणारा घटनाक्रम घडला आहे. हिंगणा आणि काटोल या दोन महत्त्वाच्या विधानसभा मतदारसंघातील भाजपचे आमदार समीर मेघे आणि चरणसिंग ठाकूर यांना मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने नोटीस बजावली आहे. विधानसभा निवडणूकीच्या निकालानंतर दाखल करण्यात आलेल्या निवडणूक याचिकांमुळे आता नागपूरच्या राजकारणात नव्या घडामोडींना सुरुवात झाली आहे.

दोन्ही आमदारांना तीन आठवड्यांच्या आत आपले उत्तर दाखल करण्याचे आदेश खंडपीठाने दिले आहे. या संपूर्ण प्रक्रियेकडे राजकीय आणि कायदेशीर वर्तुळाचे लक्ष लागले आहे. सत्ताधारी भाजपसाठी महत्त्वाचे ठरलेले हे दोन्ही आमदार आता न्यायालयीन प्रक्रियेत अडकले आहेत.

Devendra Fadnavis : पितृछत्र नसलेल्या बुलढाण्यातील बालिकेसाठी सीएम बनले देवदूत

वर्चस्वासाठीचा कायदेशीर संघर्ष

 

हिंगणा मतदारसंघातील भाजप आमदार समीर मेघे यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे पराभूत उमेदवार आणि माजी मंत्री रमेशचंद्र बंग यांनी निवडणूक याचिका दाखल केली आहे. मेघेंनी सलग तिसऱ्यांदा विजय मिळवत भाजपचा बालेकिल्ला अधिक बळकट केला असला तरी, या विजयावर आता न्यायालयीन प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. निवडणूक प्रक्रियेत नियमांचे उल्लंघन झाल्याचा ठपका ठेवत, बंग यांनी ही याचिका दाखल केली आहे. निवडणूकीच्या पारदर्शकतेवर बोट ठेवत पुन्हा निवडणूक घेण्याची मागणीही त्यांनी याचिकेत केली आहे.

काटोल मतदारसंघात भाजपचे आमदार चरणसिंग ठाकूर यांच्याविरोधात सलील देशमुख यांनी निवडणूक याचिका दाखल केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचे सुपुत्र असलेल्या सलील देशमुख यांनी स्थानिक राजकारणात एक नवे वळण आणले आहे. विधानसभा निवडणूकीत काटोलमध्ये ही लढत अत्यंत चुरशीची होती. एका बाजूला देशमुख घराण्याचा राजकीय वारसा, तर दुसऱ्या बाजूला ठाकूर यांचे स्थानिक जनाधार होते. या लढतीत ठाकूर यांनी 38 हजार 816 मताधिक्याने विजय मिळवला असला, तरी आता ही लढत न्यायालयात सुरू आहे.

Bhandara :  वाळू तस्करीला बसणार लगाम; प्रशासनाचे छापे

निवडणूकीनंतरही धगधगणारे समीकरण

 

नागपूर जिल्ह्याच्या 12 विधानसभा मतदारसंघांमध्ये भाजपने दमदार कामगिरी केली. मात्र, निवडणूकीनंतर सुरू झालेली ही न्यायालयीन प्रक्रिया सत्ताधारी पक्षासाठी नवा पेच निर्माण करणारी आहे. हिंगणा आणि काटोल हे दोन्ही मतदारसंघ भाजपसाठी अत्यंत मोलाचे मानले जातात. याठिकाणी मिळालेला विजय राज्याच्या राजकीय समीकरणांवर परिणाम करणारा ठरतो. त्यामुळे आता मेघे आणि ठाकूर या दोन उमेदवारांनी काय उत्तर दिले जाईल, हे भविष्यातील राजकीय समीकरणांवर मोठा प्रभाव टाकू शकते.

महायुतीच्या विजयाचा जल्लोष शांत झालेला असतानाच, या याचिका पक्षासाठी चिंतेचा विषय ठरू शकतात. मेघे आणि ठाकूर हे दोघेही स्थानिक आणि पक्षस्तरावर प्रभावी नेतृत्व मानले जातात. या न्यायालयीन प्रक्रियेचा त्यांच्यावर आणि त्यांच्या पक्षाच्या आगामी निवडणूक रणनीतीवर दूरगामी परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही. राजकारणात विजय ही शेवटची पायरी नसते, तर सुरू होणाऱ्या नव्या प्रवासाची सुरुवात असते. हिंगणा आणि काटोलमध्ये सुरू झालेला हा कायदेशीर प्रवास भविष्यातील राजकीय दिशा निश्चित करणार आहे.

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!