
माजी आमदार संग्राम थोपटे यांनी काँग्रेसला रामराम ठोकत भाजपमध्ये जाण्याची घोषणा केली आहे. त्यांच्या या निर्णयावर नाना पटोले यांनी तिखट प्रतिक्रिया दिली आहे.
महाराष्ट्राच्या राजकीय रंगमंचावर हल्ली काहीतरी वेगळं घडतंय. कोणता नेता कुठल्या दिशेने वळणार, कोणत्या पक्षात इन आणि कोणत्या पक्षातून आऊट होणार याचा नेमच लागत नाहीये. महाविकास आघाडीमध्ये फूट पडण्याच्या चर्चा नुकत्याच रंगात आलेल्या असतानाच, आता काँग्रेसलाही जोरदार धक्का बसला आहे. पुण्यातील भोरचे माजी आमदार संग्राम थोपटे यांनी काँग्रेसला रामराम ठोकला आहे. थोपटे यांनी पक्षाबाबत खडखड व्यक्त केल्यानंतर नाना पटोले यांनीही यावर सडेतोड उत्तर दिले आहे.
थोपटेंचा निर्णय केवळ एक राजकीय बदल नसून, हा काँग्रेससाठी खूप मोठा इशारा मानला जात आहे. पत्रकार परिषद घेऊन थोपटे यांनी आपल्या मनातील खदखद स्पष्टपणे मांडली होती. काँग्रेसनेच ही वेळ आणली आहे. काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. नानांनी सांगितलं, ज्या पक्षाने तुम्हाला मोठं केलं, नावारुपाला आणलं, त्याच्यावर आरोप करणं योग्य नाही. जिकडे तुम्ही जाता आहात, तिथे फार अंधार आहे. असं सूचक वक्तव्य करत थोपटे यांना टोला लगावला.

डालवण्यात आले
मला अनेक वेळा डावलण्यात आलं. विरोधी पक्षनेतेपदाची अपेक्षा होती, तीही पूर्ण झाली नाही. पक्षाने संधीच दिली नाही, असं सांगत त्यांनी काँग्रेसवर थेट नाराजी व्यक्त केली. थोपटे यांनी आपल्या योगदानाची आठवण करून देताना सांगितलं की, कसबा विधानसभा पोटनिवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांचा विजय घडवून आणण्यात त्यांची मोठी भूमिका होती. धंगेकर यांचा विजय माझ्यामुळेच शक्य झाला. पण तरीही पक्षाने मला झुकतं माप दिलं. हीच मुख्य खंत आहे, असं ते म्हणाले. त्यांनी स्पष्ट केलं की, हा निर्णय कोणत्याही दबावामुळे नाही तर कार्यकर्त्यांच्या आग्रहामुळे घेतला आहे.
विकासकामांसाठी निर्णय घ्यावा लागतो. माझ्या कार्यकर्त्यांनीच भाजपमध्ये जाण्याची मागणी केली. अनेक बैठकी घेतल्यानंतर आम्ही हा निर्णय घेतला. असं सांगत त्यांनी भाजप प्रवेशाचा मजबूत पायाचा पाया असल्याचं स्पष्ट केलं. थोपटे यांच्या काँग्रेसमधील एक्झिटनंतर पक्षात खळबळ माजली आहे.थोपटे यांचा भाजप प्रवेश काँग्रेससाठी फक्त एक नेता गमावण्याची बाब नाही. तर एक ताकदवान संघटना आणि मतदारसंघातले मजबूत कार्यकर्ते गमावण्याची धोक्याची घंटा आहे.
महाविकास आघाडीमध्ये आधीच शिवसेनेच्या ठाकरे गटाला गळती लागलेली आहे. आता काँग्रेसमधून देखील बंडखोरीचे सूर ऐकायला मिळत आहेत. संग्राम थोपटे यांच्यासारख्या जुन्या आणि ताकदवान नेत्याने काँग्रेसला सोडचिठ्ठी देणं, हे पक्षासाठी केवळ राजकीय धक्का नाही, तर भविष्यातील धोरणांसाठीही एक मोठा संकेत आहे.