माजी मंत्री आमदार डॉ. परिणय फुके यांच्या नेतृत्वाखाली भंडारा गोंदिया गाळमुक्त धरण योजनेसाठी विशेष कार्यशाळांचे आयोजन करण्यात आले आहे.
पूर्व विदर्भातील कोरडवाहू शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर हसू फुलविणारी एक महत्वाकांक्षी आणि दूरदृष्टी असलेली योजना आता वेग घेत आहे. तलावांची भूमी म्हणून ओळख असलेल्या भंडारा व गोंदिया जिल्ह्यांमध्ये गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार ही योजना आता भक्कम पायावर उभी राहतेय. या उपक्रमामागे माजी मंत्री आमदार डॉ. परिणय फुके यांनी सातत्याने पाठपुरवठा केला आहे. त्यांच्या ज्यांच्या धडाडीने आणि सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे हा उपक्रम आता वास्तवात उतरतो आहे.
तलावांमध्ये साचणाऱ्या गाळामुळे जलसाठ्यांची क्षमताच कमी होत असताना, डॉ. फुके यांनी ही समस्या ओळखून त्यावर कायमस्वरूपी उपाय शोधण्याचा निर्धार केला. पूर्व विदर्भातील 4 हजार 400 मामा तलाव आणि 10 प्रमुख धरणे आहेत. या धरणांमधून दरवर्षी लाखो घनमीटर गाळ काढण्याचा आणि साठवण क्षमतेत लक्षणीय वाढ करण्याचा संकल्प डॉ. फुके यांनी केला आहे. या मोहिमेंतर्गत तलावांचे खोलीकरण, गाळाचे व्यवस्थापन आणि पुनरुज्जीवन यासाठी विज्ञानाधिष्ठित तंत्रज्ञानाचा वापर होणार आहे.
Abhijit Wanjarri : आमदार निधीतून कर्तव्यपूर्ती उपक्रमाचा गावागावात ज्ञानप्रकाश
हरित क्रांतीची शक्यता
योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे सिंचनासाठी अधिक पाणी उपलब्ध करून शेतीचा उत्पादनक्षमता वाढवणे. स्थानिक शेतकऱ्यांना त्याचा थेट लाभ होणार आहे. त्यांची उत्पन्नवाढही सुनिश्चित केली जाणार आहे. माजी मंत्री आमदार डॉ. परिणय फुके यांचे म्हणणे आहे की, ही योजना माझ्या खांद्यावरची जबाबदारी आहे, पण ती जनतेच्या, स्वयंसेवी संस्था, शासकीय यंत्रणा आणि पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या सहकार्याशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. चार वर्षात ध्येय पूर्व करण्याचा संकल्प त्यांनी घेतला आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली आणि भंडारा-गोंदियाच्या पालकमंत्र्यांच्या सहकार्याने ही योजना जलक्रांतीचे मूर्त रूप घेईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. गाळयुक्त शिवार हा उपक्रम केवळ तलावांचे खोलीकरण नव्हे, तर पर्यावरणपूरक दृष्टिकोनातून जलसंपत्तीचे दीर्घकालीन व्यवस्थापन आहे. ही योजना राबवताना स्थानिक कामगारांना रोजगार मिळणार असून, भूजल पुनर्भरण, जैवविविधतेचा विकास आणि शेतीत हरित क्रांतीची शक्यता निर्माण होणार आहे.
संस्थांना सहभागाची संधी
योजनेची अंमलबजावणी अधिक प्रभावीपणे करण्यासाठी दोन कार्यशाळांचे आयोजन करण्यात आले आहे, जिथे संबंधित संस्थांना आणि व्यक्तींना सहभागाची संधी मिळणार आहे. गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार उपक्रमाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी 24 एप्रिल 2025 रोजी गोंदिया जिल्हा नियोजन सभागृहात दुपारी 12 वाजता एक विशेष कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. या कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी असतील.
नियोजित ग्रामपंचायतीचे सरपंच व ग्रामसेवक देखील यात सहभागी होणार आहेत. तालुक्यातील विविध तलावांतील गाळ काढण्याचे सविस्तर नियोजन कार्यशाळेत मांडले जाईल. या बैठकीद्वारे गावागावांतील जलसाठ्यांचे व्यवस्थापन अधिक परिणामकारक पद्धतीने होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. भंडारा जिल्ह्यातील कार्यशाळा 25 एप्रिल 2025 रोजी त्याच वेळेस दुपारी 12 वाजता जिल्हा नियोजन कार्यालयात पार पडणार आहे.
प्रतिनिधींचा सक्रीय सहभाग
कार्यशाळेत संबंधित गावांचे प्रतिनिधी त्यांच्या गावातील तलावांची माहिती घेऊन उपस्थित राहतील, अशी आशा डॉ. परिणय फुके यांनी व्यक्त केली आहे. या योजनेची व्याप्ती मोठी आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांसोबतच एनजीओ, स्वयंसेवी संस्था, आणि तांत्रिक संस्थांनी देखील या उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन माजी मंत्री आमदार डॉ. परिणय फुके यांनी केले आहे. ही योजना सर्वांची आहे. सहभागातूनच यश मिळेल, असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.
