
विदर्भातील ज्येष्ठ भाजप नेते व माजी विधान परिषद सदस्य डॉ. रामदास आंबटकर यांचे चेन्नई येथे अल्पशा आजाराने निधन झाले.
विदर्भात भाजप व विद्यार्थी परिषदेसाठी आयुष्य समर्पित करणारे, माजी विधान परिषद सदस्य डॉ. रामदास आंबटकर यांचे 30 एप्रिल रोजी चेन्नई येथे अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. वयाच्या साठीत असलेल्या या निष्ठावान नेत्याने एक सच्चा कार्यकर्ता म्हणून जीवन जगले. त्यांच्या निधनाने विदर्भाच्या सामाजिक व राजकीय क्षेत्राला मोठा धक्का बसला आहे. विदर्भातील संघटन कार्यासाठी झटणाऱ्या आंबटकर यांनी अनेक दशकांपासून विद्यार्थी परिषद व भाजपमधून कार्य सुरु ठेवले होते . त्यांचा राजकीय प्रवास केवळ पदांपुरता मर्यादित नव्हता, तर तो एक विचारांची चळवळ होता.
संघटन, समर्पण आणि सादगी यांचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे डॉ आंबटकर होते. विद्यापीठात विद्यार्थ्यांच्या हितासाठी आवाज उठवणाऱ्या डॉ. आंबटकर यांचे नेतृत्व अनेक विद्यार्थ्यांना प्रेरणा देणारे ठरले. विद्यार्थी परिषदेपासून सुरू झालेला त्यांचा प्रवास संघटन मंत्री, सरचिटणीस आणि विधान परिषद सदस्य पदापर्यंत पोहोचला. विदर्भात भाजपचे कार्यसंघ बळकट करण्यासाठी त्यांनी अविरत मेहनत घेतली होती. कुशल संघटक म्हणून त्यांनी संघटनातील नवे कार्यकर्ते तयार केले, संघ विचारधारेसाठी समर्पित तरुणांचा भक्कम पाया तयार केला होता.

Chandrashekhar Bawankule : स्वातंत्र्य दिनापासून डिजिटल सेवांचे स्वातंत्र्य
संघटनासाठी समर्पित आयुष्य
साधी राहणी, कार्यकर्त्यांप्रती प्रेम, आणि संघात्मक कौशल्य या त्रिसूत्रांमुळे रामदासजी हे विदर्भातील लाडके नेते ठरले. त्यांच्या मृत्यूने केवळ एक नेता हरवलेला नाही, तर एक विचारशील मार्गदर्शक हरपला आहे. त्यांचे वडील देखील संघाशी संबंधित होते. मात्र संघावर बंदी आल्यावर त्यांनी आंदोलनात भाग घेतला आणि शासकीय नोकरी गमावली. यानंतर आंबटकर कुटुंबाने संघ व संघटनासाठी संपूर्ण आयुष्य समर्पित केले. 2018 मध्ये चंद्रपूर-वर्धा-गडचिरोली झालेल्या चुरशीच्या विधान परिषद निवडणुकीत त्यांनी काँग्रेसच्या इंद्रकुमार सराफ यांचा केवळ 37 मतांनी पराभव केला होता.
एकूण 510 मतांच्या कोट्यातून त्यांनी पहिल्या पसंतीच्या मतांद्वारे विजय संपादन केला. या विजयामध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ठोस पाठिंबा होता. त्यांच्या संघटन क्षमतेची दखल घेत, पक्षाने त्यांना विधान परिषदेत पाठवले होते. डॉ. रामदास आंबटकर हे हिंदुत्ववादी विचारांचे समर्थक होते. मात्र विरोधक त्यांच्यावर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांशी विसंगती दाखवत टीका करत होते. बाबासाहेबांनी रामावर अविश्वास दर्शवणाऱ्या प्रतिज्ञा केल्या, आणि रिडल्स इन हिंदुइझममध्ये रामाच्या चारित्र्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते.
Chief Justice of India : द्रौपदी मुर्मूंच्या सहीने गवई सरन्यायाधीश
राजकीय वर्तुळात शोकलहर
त्यांच्या निधनाने संपूर्ण राजकीय वर्तुळात शोकाची लाट पसरली आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माजी मंत्री आमदार डॉ. परिणय फुके तसेच माजी खासदार सुनील मेंढे यांनी डॉ. रामदास आंबटकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे. अनेकदा आंबटकरांना वैचारिक द्वंद्वांना सामोरे जावे लागले. वडनेर (ता. हिंगणघाट, जि. वर्धा) येथील मूळ रहिवासी असलेले डॉ. आंबटकर गेली अनेक वर्ष भाजपमध्ये कार्यरत होते. त्यांनी विदर्भात भाजप व विद्यार्थी परिषद यांच्या मुळे अधिक घट्ट केली. त्यांच्या निधनाने एक अखेरचा अध्याय संपला, पण त्यांच्या विचारांची ज्योत अनेक कार्यकर्त्यांच्या मनात पेटती राहील.