
पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात दहशतवाद्यांनी काही नागरिकांना जबरदस्तीने कलमा वाचायला लावल्याची माहिती समोर आली होती. या घटनेवर माजी खासदार नवनीत राणा यांनी रोखठोक प्रतिक्रिया दिली आहे.
नेहमीच आपल्या रोखठोक, ठाम आणि बेधडक भूमिकांसाठी चर्चेत राहणाऱ्या अमरावतीच्या माजी खासदार नवनीत राणा यांनी पुन्हा एकदा आपली ठसठशीत छाप सोडली आहे. पहलगाम येथे नुकत्याच घडलेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली होती. या घटनेने पुन्हा एकदा देशाच्या सुरक्षेचा, धार्मिक अस्मितेचा आणि राजकीय विचारांचा मुद्दा तापवला आहे. अशा पार्श्वभूमीवर नवनीत राणा यांनी स्पष्ट आणि निर्भीड मत व्यक्त करत विरोधकांनाही फटकारलं आहे. नवनीत राणा म्हणाल्या, आम्ही डोक्यावर गोळ्या झेलू, पण कधीही कलमा वाचणार नाही. आमच्या विचारांना काहीजण चिरडू पाहतात, पण आम्ही झुकणारे नाही.
भाजप हा विचारधारा असलेला पक्ष आहे. आम्ही सर्व धर्म, सर्व जातींच्या सोबत आहोत, पण विचारांवर ठाम आहोत. अमरावतीमधील एका कार्यक्रमात त्या बोलत होत्या. यावेळी व्यासपीठावर राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळेही उपस्थित होते. नवनीत राणा यांनी जोर देऊन सांगितले की, एक आमदार निवडून आणणेही कठीण होतं. पण आज त्या जिल्ह्यात भाजपचे पाच आमदार निवडून आले आहेत. हे परिवर्तन फक्त मतांनी नव्हे, विचारांनी घडतं. त्या म्हणाल्या की बकरी ईदच्या दिवशी गाईंची कत्तल थांबवली पाहिजे. हिंदू अस्मितेला ठेच पोहोचवणाऱ्या प्रथा थांबवाव्या लागतील. आज विचारासाठी लढण्याची वेळ आली आहे.

भगव्याची गरज आहे
व्यक्ती नव्हे, विचार महत्त्वाचा आहे, असं त्या ठासून सांगतात. राणांनी विरोधकांवरही निशाणा साधत म्हटलं, जो खुदको बड़े समजते है, त्या नेत्यांना जनतेने आता घरी बसवलं आहे. कमळासोबत भगवा लागला पाहिजे असा राजकीय संदेशही त्यांनी दिला. राजकारणात भगव्या विचारांमुळेच परिवर्तन घडत असल्याचं त्या अधोरेखित करत आहेत. काही दिवसांपूर्वी नवनीत राणा यांना पाकिस्तानहून जीवे मारण्याची धमकी मिळाल्याचं वृत्त समोर आलं होतं. तू काही दिवसांची मेहमान आहेस. तुझं संपवून टाकू, अशा शब्दांत धमकी देण्यात आली होती. राणांनी खार पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पोलीस तपास सुरू आहे.
नवनीत राणा यांचे पती रवी राणा यांनाही अशाच स्वरूपाचे धमकीचे कॉल आल्याचं समजतं. या पार्श्वभूमीवर नवनीत राणा म्हणाल्या, मी एका माजी सैनिकाची मुलगी आहे. देशासाठी काहीही करण्यास तयार आहे. पाकिस्तानला कळायला हवं भारत हा पाकिस्तानचा बाप आहे, बापच राहील. त्यांचं हे वाक्य सभागृहात टाळ्यांचा गजर घेवून गेलं. हल्ल्याच्या वेळी दहशतवाद्यांनी लोकांना विचारले, तुम्ही हिंदू आहात की मुसलमान? मुसलमान असाल, तर कलमा वाचा. यावर प्रतिक्रिया देताना राणा म्हणाल्या, आमच्या तोंडात बंदुकीची नळी लावली तरी आम्ही कलमा वाचणार नाही. आम्ही जय श्रीरामचा नारा देऊ.
आमचं रक्त या देशासाठी सांडू, पण झुकणार नाही. नवनीत राणांचा हा ठाम आणि आक्रमक पवित्रा आगामी राजकीय घडामोडींमध्ये महत्त्वाची भूमिका बजावू शकतो. त्यांच्या वक्तव्याने पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात खळबळ माजवली असून, यावरून येत्या काळात नवे आरोप-प्रत्यारोप सुरू होण्याची शक्यता नाकारता येत नाही.