
वादाच्या वावटळीत पुन्हा एकदा नितेश राणेंचं नाव गाजतंय. त्यांच्या वादग्रस्त विधानामुळे राज्याचं सामाजिक तापमान वाढलं असून, भाजपला सफाई देण्याची वेळ आली आहे.
महाराष्ट्राचं राजकारण सध्या पुन्हा एकदा गरम झालं आहे, आणि त्यामागचं कारण म्हणजे भाजप आमदार नितेश राणे यांचं नवं वादग्रस्त विधान. आपल्या ठसकेबाज आणि बेधडक शैलीसाठी प्रसिद्ध असलेले राणे यांनी यंदा ईदसारख्या धार्मिक सणावर वाद निर्माण करत पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी प्रवेश केला आहे. त्यांच्या वक्तव्यामुळे केवळ मुस्लिम समाजात संतापाची लाट उसळली आहे. या वादामुळे भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनाही सफाई देण्याची वेळ आली आहे. पक्षात अंतर्गत अस्वस्थतेचं वातावरण निर्माण झालं आहे.
नितेश राणे यांनी केलेलं विधान साधं नव्हतं. त्यांनी मुस्लिम समाजाला प्रत्यक्ष कुर्बानी न देता ‘आभासी ईद’ साजरी करण्याचा सल्ला दिला. गौवंश हत्या प्रतिबंधक कायद्याचा संदर्भ देत, त्यांनी धार्मिक भावना दुखावतील असे शब्द उच्चारले. परिणामी मुस्लिम समाजात संतापाचा भडका उडाला आहे. अनेक धार्मिक व सामाजिक संघटनांनी त्यांच्या या वक्तव्याला कडाडून विरोध केला असून, हे विधान धार्मिक तेढ वाढवणारं असल्याचा आरोप केला आहे.

राणेंशी सहमत नाही
या पार्श्वभूमीवर नागपूरमध्ये झालेल्या संघटन पर्वाच्या बैठकीदरम्यान पत्रकारांनी भाजपचे प्रदेश कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांना या मुद्द्यावर विचारणा केली. यावर चव्हाण यांनी मोजकच उत्तर दिलं. चव्हाण स्पष्टपणे म्हणाले की, भाजप कोणत्याही धर्माच्या परंपरांमध्ये हस्तक्षेप करणार नाही. आम्ही सर्व धर्मांचा आदर ठेवतो. नितेश राणे यांच्या विधानाशी पक्ष एकमताने सहमत नाही.
रवींद्र चव्हाण पुढे स्पष्ट केलं की, धर्म, जात, परंपरा यामध्ये तेढ निर्माण होईल अशी भाषा कोणताही जबाबदार नेता टाळायला हवी. भाजपची भूमिका ही नेहमीच सर्वसमावेशक आणि सौहार्दपूर्ण राहिलेली आहे. यानंतर त्यांनी अधिक काही न सांगता पत्रकार परिषद लवकरच घेण्याचं आश्वासन देत संवाद संपवला.
सरकारची जबाबदारी
राज्य अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान यांनी तर या प्रकरणावर थेट मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करण्याचा इशारा दिला आहे. राणे यांची शब्दसंपत्ती महाराष्ट्रात अशांतता निर्माण करत आहे. अशा वाचाळ नेत्यावर लगाम घालणं आता सरकारची जबाबदारी आहे, असं ते ठामपणे म्हणाले. त्यांनी हेही जाहीर केलं की आयोगाकडून राणेंना लवकरच अधिकृत नोटीस पाठवण्यात येणार आहे, आणि त्यांच्या विधानांमुळे काही अनुचित घडलं, तर त्याची संपूर्ण जबाबदारी राणेंवरच राहील.
राजकीय वर्तुळातही आता चर्चा सुरू झाली आहे की, नितेश राणेंच्या असंवेदनशील विधानांमुळे भाजपची प्रतिमा मलीन होत आहे. राज्यात धार्मिक ध्रुवीकरण वाढण्याचा धोका आहे. पक्षातील अनेक वरिष्ठ नेते त्यांच्या भूमिकेबाबत संभ्रमात आहेत. एकीकडे भाजप ‘सबका साथ, सबका विकास’चा नारा देतो, तर दुसरीकडे त्याच पक्षातील काही नेते धार्मिक भावना दुखावणारी विधाने करून संपूर्ण प्रयत्नांवर पाणी फिरवतात, अशीही टीका सुरू आहे.
या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर, नितेश राणे यांना वठणीवर आणणं हे भाजपसाठी तातडीचं आव्हान बनलं आहे. कारण ज्या पद्धतीने त्यांनी आपल्या वक्तव्याने वाद निर्माण केला आहे, त्यातून हे स्पष्ट होतं की, अशा राजकारणामुळे केवळ पक्ष नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्राचं सामाजिक वातावरण बिघडण्याची शक्यता आहे, असे बोलले जात आहे.