महाराष्ट्र

Mahayuti : घ्या रे बा… सत्ताधारी आमदारानेच मान्य केले विरोधकांचे आरोप

Sanjay Gaikwad : वक्तव्य केलं अन् गेलं सरकार अडचणीत

Author

मुख्यमंत्री ‘माझी लाडकी बहीण’ योजनेवरून आता सरकारच्याच आमदारांकडून नाराजी व्यक्त होऊ लागली आहे. शिवसेना (शिंदे) गटाचे संजय गायकवाड यांनी थेट विधान करत ही योजना राज्याच्या आर्थिक अडचणीस कारणीभूत ठरत असल्याचे वक्तव्य केले आहे.

आपल्या बेधडक शैली आणि अजब-गजब वक्तव्यांनी कायम चर्चेत राहणारे शिवसेना (शिंदे गट) आमदार संजय गायकवाड यांनी पुन्हा एकदा सरकारला अडचणीत टाकणारे वक्तव्य केलं आहे. ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेमुळे संपूर्ण राज्य संकटात सापडल्याचं स्पष्ट करत गायकवाड यांनी थेट आरोप केला की, या योजनेमुळे कोणत्याच योजनांना निधी मिळालेला नाही आणि विकासकामे ठप्प झाली आहेत.

संजय गायकवाड म्हणाले, लाडकी बहीण योजना ही राज्यासाठी जणू एक आर्थिक भूकंप ठरली आहे. तिचा परिणाम इतका व्यापक आहे की, कर्मचाऱ्यांचे पगारही वेळेवर होत नाहीत. विकासकामे ठप्प झाली आहेत आणि कोणत्याही आमदाराला जाहीर केलेला निधी अद्याप मिळालेला नाही. सद्या राज्याची आर्थिक स्थिती विरोधकांकडून ‘नाजूक’ असल्याचं वारंवार सांगितलं जात आहे. या पार्श्वभूमीवर गायकवाड यांनी विरोधकांचे मत अंशतः मान्य करत, हो, राज्य संकटात आहे. परंतु ते संकट लाडक्या बहिणींमुळे निर्माण झालं आहे. विरोधक खोटं बोलत नाहीत, असंही कबूल केलं.

Congress : सोनिया गांधींची प्रकृती खालावली

विकास थांबला

गायकवाड पुढे म्हणाले, राज्याच्या अर्थसंकल्पात सव्वालाख कोटी रुपयांची तूट आहे. याचा थेट परिणाम पायाभूत सुविधांपासून ते कर्मचाऱ्यांच्या पगारांपर्यंत जाणवतो आहे. ही चूक जुलै-ऑगस्टपर्यंत सावरण्याचा सरकारचा प्रयत्न आहे, मात्र सध्या परिस्थिती खरोखरच गंभीर आहे. या वक्तव्याचा आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आमदार निधी. या अधिवेशनात जाहीर झालेला निधी कोणत्याही आमदाराला मिळालेला नाही. फक्त शिवसेना (शिंदे) नव्हे, तर सर्वच पक्षांच्या आमदारांना निधी दिला गेलेला नाही, असं सांगत त्यांनी संपूर्ण यंत्रणेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केलं.

लाडक्या बहिणींचा सन्मान

सर्व आमदारांना निधी मिळाला नसतानाही कोणीही यावर खुलेआम बोलत नाही. यावर संजय गायकवाड म्हणाले, सर्वजण गप्प आहेत. कुणालाही काही न मिळालं तरी लाडक्या बहिणींना काही म्हणू नका, असाच सूर आहे. परंतु, याचा बोजा आता राज्याच्या हिशोबावर स्पष्टपणे जाणवत आहे. राज्य सरकारच्या प्रतिष्ठित आणि लोकाभिमुख ‘लाडकी बहीण’ योजनेच्या अंमलबजावणीमुळे संपूर्ण राज्य आर्थिक अडचणीत सापडलं असल्याचा ठपका खुद्द सत्ताधारी पक्षाच्या आमदारानेच ठेवला आहे, हे नक्कीच गंभीर बाब आहे. संजय गायकवाड यांचे हे वक्तव्य केवळ एक असंतोष नाही, तर सरकारच्या आर्थिक धोरणांवर थेट प्रश्न उपस्थित करणारा ‘आर्थिक झणझणीत टोला’ ठरत आहे.

Ramesh Chennithala : उत्सव होता विधानसभेचा, खून झाला लोकशाहीचा

मिळाला होता इशारा

संजय गायकवाड यांनी पुन्हा एकदा सरकारलाच गोंधळाच्या भोवऱ्यात ढकलण्याचं राजकीय कवित्व सादर केलं आहे. त्यांच्या या वाचाळ शैलीने पूर्वीही पक्षश्रेष्ठींना बऱ्याचदा तोंडाला मास्क लावावा लागला होता. “जरा जपून बोला” असा इशारा त्यांना आधीही मिळाला होता. पण गायकवाड यांच्या राजकीय व्यक्तिमत्त्वात धुमसत असलेली ‘बेधडक बिनधास्तपणा’ हीच त्यांची खास ओळख असल्यामुळे, त्यांनी पुन्हा वादग्रस्त विधान करून सरकारच्या छाताडावर जणू शब्दांचा बाण घुसवला आहे. त्यामुळे आता त्यांच्या या विधाने पक्षात आणि सरकारमध्ये कोणते वादळ निर्माण करतात, याकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.

Nana Patole : निवडणूक आयोग नव्हे, हे तर भाजपा आयोग

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!